लोकमत ‘स्पर्धेच्या जगात’ लेखमालेचे सोलापूरात प्रकाशन
By appasaheb.dilip.patil | Published: July 29, 2017 11:15 AM2017-07-29T11:15:00+5:302017-07-29T11:15:18+5:30
सोलापूर दि २९ : विद्यार्थ्यांनी भविष्याकडे बघताना विशाल दृष्टिकोन तर ठेवावाच लागतो, पण मानवी मूल्यांची शिस्त, ध्येय, उत्साह, आत्मविश्वास आणि स्वत:शीच स्पर्धा करणे या पंचसूत्रीचा अंगीकार करून स्वत:ला घडवावे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २९ : विद्यार्थ्यांनी भविष्याकडे बघताना विशाल दृष्टिकोन तर ठेवावाच लागतो, पण मानवी मूल्यांची शिस्त, ध्येय, उत्साह, आत्मविश्वास आणि स्वत:शीच स्पर्धा करणे या पंचसूत्रीचा अंगीकार करून स्वत:ला घडवावे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले.
लोकमतच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या ‘स्पर्धेच्या जगात’ या अंकाचे प्रकाशन आज भारती विद्यापीठात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी लोकमतचे संपादक राजा माने, सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे, भारती विद्यापीठाचे प्राचार्य रणशृंगारे आदी उपस्थित होते.
आजच्या स्पर्धेच्या जगातही विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी आणि घडण्यासाठी भरपूर क्षेत्रे आहेत. डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्रात स्पर्धा आहे. तेव्हा ही क्षेत्रे वगळता इतर कोणत्या क्षेत्रात आपण चांगले योगदान देऊ शकतो, याचा ठाम निर्णय विद्यार्थ्यांनी स्वत: घ्यावा, असे सांगून राजेंद्र भारुड म्हणाले की, आयुष्यात आपण आपले ध्येय प्रथम निश्चित केले पाहिजे. जे करायचे ते चांगलेच करायचे हे निश्चित केले पाहिजे.
ते पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे तेवढी महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. आपल्या अंगी त्यासाठी शिस्त असली पाहिजे, केवळ सोयीचे म्हणून कोणतीही गोष्ट न स्वीकारता आव्हान म्हणून स्वीकारली पाहिजे.
---------------------------
शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी
आपल्या कॉलेजमधील पहिल्या दिवसाची आठवण सांगताना राजेंद्र भारुड म्हणाले की, पहिल्या दिवशी स्लीपर घालून आलेल्या माझ्याकडे अनेकांनी कुत्सित नजरेने पाहिले. त्यामुळे मी सर्वात शेवटच्या बाकावर जाऊन बसलो. पण त्याच वेळी ठरवले की, एक ना एक दिवस आपण सन्मानाने यांच्यासोबत पुढे बसायचे. हीच महत्त्वाकांक्षा, जिद्द आपल्याला आयुष्यात यशस्वी करून गेली.