निसर्गाच्या देणगीत मानवी हस्तक्षेप, वर बंधारे घातल्याने आंबोलीतील धबधबे प्रवाहहीन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 09:14 PM2018-06-24T21:14:34+5:302018-06-24T21:19:42+5:30

निसर्गाची देणगी असलेले आंबोलीतील धबधबे सध्या मानवी हस्तक्षेपाच्या कचाट्यात सापडल्याने पाऊस पडूनही हे धबधबे प्रवाहीत होत नसल्याची तक्रार स्थानिकांची आहे.

Due to the human intervention of the donation of nature, the Ambalali waterfalls flow without blowing | निसर्गाच्या देणगीत मानवी हस्तक्षेप, वर बंधारे घातल्याने आंबोलीतील धबधबे प्रवाहहीन

निसर्गाच्या देणगीत मानवी हस्तक्षेप, वर बंधारे घातल्याने आंबोलीतील धबधबे प्रवाहहीन

Next

 - अनंत जाधव  

सावंतवाडी - निसर्गाची देणगी असलेले आंबोलीतील धबधबे सध्या मानवी हस्तक्षेपाच्या कचाट्यात सापडल्याने पाऊस पडूनही हे धबधबे प्रवाहीत होत नसल्याची ओरड स्थानिकांची आहे. जेथून धबधब्यांचे पाणी पडते, त्यांच्यावरच वनविभागाने बंधारे घातल्याने हे पाणी बंधा-यातच अडल्याने खाली येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकारावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जर बंधा-यामुळे पाणी अडत असेल तर ते बंधारे काढायला लावू, असे स्पष्ट केले आहे.
आंबोली घाट हा ब्रिटिशकालीन आहे. तसेच हे धबधबेही नैसर्गिक असून, निर्सगाची अतिउत्तम देणगीच मानली जात आहे. गेली अनेक वर्षे हे धबधबे प्रवाहित होत आहेत. या धबधब्यातून पडणारे पाणी हे चौकुळमधून प्रवाहित होत असते. तेथे वनविभाग दरवर्षी या पाण्याच्या प्रवाहात अडथळे ठरत असलेल्या गटारांमध्ये कचरा साठत असेल तो काढणे तसेच गटारातील माती काढणे असे प्रकार करत असतात. त्यामुळे चौकुळमध्ये मोठा पाऊस झाला की धबधबे प्रवाहित होत असतात.
सध्या आंबोली व चौकुळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडत नसला, तरी सुरूवातीच्या काळात मोठा पाऊस आंबोली व चौकुळ परिसरात कोसळला. त्यामुळे नक्कीच हे धबधबे कोसळले पाहिजे होते. पण अद्यापपर्यंत हवे तसे धबधबे प्रवाहित झाले नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्थानिक दुकानदारांची ओरड होती. पण त्यांच्याकडे कोण लक्ष देत नव्हते. म्हणून रविवारी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता या धबधब्याच्यावर मोठ्या प्रमाणात बंधारे घालण्यात आल्याचे दिसून येत आहे.
वनविभागाने हे बंधारे घातले आहेत. पण हे धबधबे घालण्यामागे वनविभागाचा उद्देश साफ आहे. त्यांना बंधाºयात बारमाही पाणी साठवायचे असून, ते बारमाही पाणी साटले तर कायमस्वरूपी धबधबे सुरू राहातील आणि पर्यटकही आकर्षित होतील, असे वाटत होते. पण निसर्गाच्या देणगीत मानवी हस्तक्षेप झाला तर ते चालत नाही याचीच प्रचिती आता सर्वांनी आली आहे.
मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला नसला तरी धबधबे पडण्याएवढा पाऊस आंबोली व चौकुळमध्ये कोसळला आहे. पण आता मुख्य धबधब्यातून ज्या पध्दतीने पाणी पडायला पाहिजे होते, तेवढे पाणी पडत नसल्याने पर्यटकही नाराज झाले आहेत. आंबोलीत येणारा पर्यटक हा धबधब्याच्या खाली आंघोळ करण्यासाठी येत असतो. त्यातून त्यांना आनंद मिळत असतो. पण यावर्षी या आनंदावर सुरूवातीच्या काळात तरी विरजण पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, या सर्व प्रकाबाबत स्थानिक व्यापारी तसेच दुकानदारांना विचारले असता काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलक्या प्रतिकिया दिल्या. यात वर जर बंधारे घातले तर पाणी कोठून पडणार आणि वनविभागाला कोण सांगणार, असे सांगितले. या बंधाºयात पाणी साठणार तेव्हा ते खाली येणार, असेही काहींचे मत होते. त्यामुुळे आता निसर्गाच्या देणगीत हस्तक्षेप केल्यास काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहारण असून, वनविभागाने याचा बोध घेणे गरजेचे आहे. अन्यथा हे निसर्गाचे देणे लुप्त होण्यास वेळ लागणार नसल्याचेच यातून दिसून येत आहे.

निसर्गाच्या देणगीत हस्तक्षेप चुकीचाच : साळगावकर
जे धबधबे कोसळत आहेत हे निसर्गाचे वरदान आहे. मात्र वनविभागाने त्यात हस्तक्षेप करू नये. काही जुन्या माणसांकडून माहिती घेतली पाहिजे होती आणि नंतरच त्यावर निर्णय घेतला पाहिजे होता. अन्यथा येथील पर्यटनही नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, असे मत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. त्यांनीही रविवारी आंबोलीला भेट देत नाराजी व्यक्त केली आहे.

वेळ पडल्यास बंधारे काढण्यास सांगू : केसरकर 
जर बंधाºयामुळे आंबोतील धबधबे कोसळत नसतील तर वनविभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करून बंधारे काढायला लावू. बारमाही धबधबे कोसळले पाहिजेत. आंबोली सतत पर्यटक आले पाहिजेत, यासाठीच हे बंधारे घातले आहेत, असे मत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

दरवर्षीच्या तुलनेत पाणी प्रवाह कमी :पर्यटक
वर्षा पर्यटनासाठी आम्ही दरवर्षी आंबोलीत येतो. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याचा प्रवाह कमी आहे. जून महिना संपत आला तरी धबधब्यांचा प्रवाह वाढला नाही. त्यामुळे नेमके काय झाले याचा शोध वनविभागाने घेणे गरजेचे आहे, असे मत पर्यटक दीपाली हरमलकर यांनी व्यक्त केले.

पाणी अडवण्याचा फायदा वन्यप्राण्यांना : वनविभाग
नव्याने बंधारे घातले आहे हे सत्य आहे. मात्र ते बंधारे भरल्यानंतर पाणी नेहमीप्रमाणे वाहणा-या पाण्यावर मोठ्या प्रमाणात माती वाहून जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी अडवण्याचा फायदा जंगलातील प्राण्यांना होणार आहे. तसेच जास्त काळ टिकण्यासाठी त्याचा फायदा होईल.

Web Title: Due to the human intervention of the donation of nature, the Ambalali waterfalls flow without blowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.