ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 05:31 PM2018-09-18T17:31:03+5:302018-09-18T17:36:15+5:30

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे  काम प्रगतीपथावर असून कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ब्रिटिशकालीन पूल पुढील वर्षअखेरपर्यंत इतिहासजमा होणार आहेत.

 The British Bridge will be housed in history. The work of four-laning of the Mumbai-Goa highway in progress | ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर

ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर

Next
ठळक मुद्दे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावरब्रिटीश शासनाने १९३० मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर १९३४ ते १९४३ पर्यंत या पुलांची कामे पूर्ण

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे  काम प्रगतीपथावर असून कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ब्रिटिशकालीन पूल पुढील वर्षअखेरपर्यंत इतिहासजमा होणार आहेत. त्याजागी नवीन सिमेंट काँक्रीटच्या पुलांची उभारणी होणार आहे. सन १९३४ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पूल वाहतुकीस खुले झाले होते. त्यानंतर गेली ८४ वर्षे या पुलांवरून कित्येक टन अवजड वाहतूक सुरू आहे. ब्रिटिशकाळात उभारलेले हे पूल समर्थपणे सेवा बजावत आहेत.

मुंबई ते गोव्यापर्यंत दळणवळणाच्या मूलभूत सुविधांची उभारणी करताना तत्कालीन ब्रिटीश शासनाने १९३० मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर १९३४ ते १९४३ पर्यंत या पुलांची कामे पूर्ण झाली. या पुलांमुळे रस्तामार्गे वाहतुकीला चालना मिळाली. त्याचबरोबर समुद्र किनारी असलेल्या बंदरातून बोट तसेच अन्य मार्गाने होणारी वाहतूक बंद झाली.

रस्ते तसेच पूल उभारले गेल्यामुळे  मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात  नांदगाव, तळेरे, कणकवली, ओरोस, कसाल आदी छोट्या मोठ्या नव्या बाजारपेठा उदयास आल्या. तसेच कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शहरांचेही महत्त्व वाढले.
कणकवली शहरालगत  गडनदी आणि जानवली नदीवरील पुलांची कामे १९३० मध्ये सुरू झाली. यातील जानवली पुलाला त्यावेळी १ लाख ३७ हजार ६६९ रुपये खर्च आला होता. तर गडनदी पुलाचे बांधकाम १ लाख २६ हजार रुपयांमध्ये पूर्ण झाले. दोन्ही पुलांवरून १९३४ मध्ये वाहतूक सुरू झाली. महत्त्वाची बाब म्हणजे महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पुलाचा अपवाद वगळता गडनदी आणि जानवली नदीसह महामार्गावरील इतर ब्रिटिशकालीन पूल मागील ८४ वर्षात अवजड वाहने आणि अनेक पूर झेलूनही मजबूत राहिले आहेत.

उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना
आॅगस्ट २०१६ मध्ये पुरात सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेल्यानंतर महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे शासनाने निश्चित केले. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात नवीन पुलांची कामे झाल्यानंतर जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत. महामार्ग चौपदरीकरणातील अपूर्ण पुलांची कामे डिसेंबरअखेर पूर्ण केल्यानंतर कणकवली शहरालगत गडनदी, जानवली, कसाल येथील जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत. त्यामुळे  उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असलेले हे पूल इतिहासजमा होणार आहेत.
चौकट
काळाच्या ओघात आठवणी नष्ट होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन खारेपाटण पुलाचे बांधकाम सन १९४६ ते ४७,  पियाळी पुलाचे बांधकाम सन १९४१,  जानवली पुलाचे बांधकाम १९३४, कणकवली गडनदी पूल सन १९३४,  कसाल पूल १९३४, पीठढवळ पूल १९५७,  बांबर्डे पूल बांधकाम १९३८ साली करण्यात आले आहे. या पुलांशी निगडीत अनेक आठवणी असून जुन्या जाणत्या लोकांकडून त्या ऐकायला मिळतात. हे पूल पाडल्यानंतर काळाच्या ओघात या आठवणी नष्ट होणार असल्याची हुरहूर अनेक नागरिकांना लागून राहिली आहे. तशी प्रतिक्रिया ते व्यक्त करताना दिसत आहेत.



 

Web Title:  The British Bridge will be housed in history. The work of four-laning of the Mumbai-Goa highway in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.