सोयरिक करा; मानपान ठरवून घ्या ! कºहाडात काँगे्रस मेळाव्यातील सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:36 PM2019-03-13T23:36:10+5:302019-03-13T23:40:17+5:30
राष्ट्रवादीबरोबरच्या घरोब्याचा यापूर्वीचा अनुभव चांगला नाही. आता नव्याने सोयरिक करायची असेल तर जरूर करूया; पण नुसतं लग्न ठरवून उपयोग नाही. याद्या तर कराव्याच लागतील; पण मानपान सन्मान
प्रमोद सुकरे ।
कºहाड : राष्ट्रवादीबरोबरच्या घरोब्याचा यापूर्वीचा अनुभव चांगला नाही. आता नव्याने सोयरिक करायची असेल तर जरूर करूया; पण नुसतं लग्न ठरवून उपयोग नाही. याद्या तर कराव्याच लागतील; पण मानपान सन्मान ठरवून घ्या ! त्यांच्या वरवरच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असाच सूर जिल्हा काँॅग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आला.
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी कºहाडात झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी विरोधातील ‘राग’ आपल्या भाषणातून आळविला. आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर याचे साक्षीदार होते.
पाटणच्या हिंदुराव पाटील यांनी ‘आघाडी धर्म फक्त आम्हीच पाळायचा का?’ असे म्हणत विषयाला तोंड फोडले तर ‘आघाडीतला मित्रपक्षच आम्हाला जमेल तेथे आडवायचं काम करतोय,’ असं खटावच्या विवेक देशमुख यांनी सांगितले. कºहाडच्या बंडानानांनी ‘राष्ट्रवादीच आपला खरा शत्रू आहे,’ असे सांगत आपल्या हातातून जिल्ह्यातील सत्ता का निटसली? याचा अभ्यास करण्याचा सल्ला देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली तर अजितराव पाटलांनी ‘तुमचं नांगरल्यावर आमचंही नांगरायचं आहे,’ हे राष्ट्रवादीकडून ठरवून घ्या, असे सांगितले. तर धैर्यशील कदमांनी दिवंगत शिवाजीराव देशमुखांना राष्ट्रवादीने अपमानास्पदपणे सभापतिपदावरून कसे काढले, याची आठवण करून दिली.
वाईच्या विराज शिंदेंनी लोकसभेला ‘तुमचं ऐकतो; पण विधानसभेला विरोधकांचा बदला घेण्याची मोकळीक द्या,’ अशी मागणी केली. तर शिवराज मोरे म्हणाले, ‘आमच्या मित्रपक्षाला ‘नवरा मेल्याचं दु:ख नाही; पण सवत विधवा होतेय,’ याचा आनंद वाटतोय, याचं काय करायचं?’ असा सवाल केला. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनीही ‘विधानसभेला किमान ४ मतदारसंघ जिल्ह्यात काँॅग्रेसला मिळाले पाहिजेत,’ असे मत मांडले. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या भाषणात आघाडी धर्म पाळायची गरज कार्यकर्त्यांना पटवून दिली.
उपकारकर्त्यांना विसरू नका !
वाईच्या मदन भोसलेंचे नाव न घेता आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘कोणाला कोणत्या पक्षात जायचं आहे त्यांनी जरूर जावे; पण उपकारकर्त्यांना विसरू नका. ज्या कारखान्यांवर तुम्ही मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलविताय, त्याला पृथ्वीबाबांनी मंजुरी दिली होती. हे लक्षात ठेवा. तेव्हा उगाच टीका करायच्या भानगडीत पडू नका.’
त्यांच्या जाण्याने काय नुकसान होणार?
मदन भोसले भाजपात गेले, त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे किती नुकसान झाले? असा प्रश्न मेळाव्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना केला. त्यावर ते म्हणाले, ‘भोसले गत १० वर्षे काँगे्रसमध्ये किती सक्रिय होते? हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने काय नुकसान होणार आहे? असा सवाल त्यांनी केला. असं एखाद्याच्या जाण्याने जिल्हा भाजपमय होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
म्हणून पवारांना माघार घ्यावी लागली
काँग्रेसची ताकद काय आहे, याची जाणीव राष्ट्रवादीला झाली आहे. जयाभाऊ अन् रणजितदादांनी नुसती माढा मतदार संघातील काँगे्रस कार्यकर्ते व नाराजांची एक बैठक घेतली तर थोरल्या पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, असे फलटणच्या जयकुमार शिंदे यांनी सांगितले. शिवाय सातारा राष्ट्रवादीला तर माढा काँग्रेसला घ्या, अशी मागणी केली.
‘राष्ट्रवादी’वाले तरी कुठं ‘खूश’ आहेत !
उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी जिल्ह्यातील सगळे राष्ट्रवादीवाले तरी कुठे खूश आहेत? असा चिमटा अजित पाटील-चिखलीकर यांनी बोलताना काढला; पण आता इलाज नाही. नशिबात आहे ते भोगलं पाहिजे, असे म्हणताच उपस्थितांच्यात हशा पिकला. तर तोच धागा पकडत उदयनराजे आपल्याला परके नाहीत. राष्ट्रवादीत राहून ते आपलंच काम करीत असल्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी बोलताना सांगितले.