रामराज्यात महाभारत

By सचिन जवळकोटे | Published: June 24, 2018 10:41 PM2018-06-24T22:41:10+5:302018-06-24T22:42:38+5:30

Mahabharat in Ramrajya | रामराज्यात महाभारत

रामराज्यात महाभारत

Next

सातारनामा
सचिन जवळकोटे
फलटणच्या राजेंनी अधूनमधून साताऱ्यात यावं. विश्रामगृहात किंवा डीसीसीच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये बसून साताºयाच्या राजघराण्यातील दुश्मनीची खुंटी हलवून बळकट करावी, ही आजपर्यंतची परंपरा... परंतु काल साताºयाचे राजे थेट फलटणमध्ये घुसले. फलटणच्या राजघराण्यातील दुश्मनांना भेटून जणू युद्धाचं रणशिंग फुंकलं. गेल्या काही दशकांतील फलटणच्या पोलादी साम्राज्याला हादरे देणारी ही घटना होती. साताºयाचं राजयुध्द फलटणच्याही रणांगणावर लढविता येऊ शकतं, याची चुणूक दाखविणारी भाषा होती. रामराज्यातही महाभारत घडविणारी ही खेळी होती.
निंबाळकरांचा टिळा..!
साताºयाचे राजे फलटणमध्ये ‘सुशांत’च्या घरी गेले, तेव्हा त्यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांना टिळाही लावण्यात आला. आता, आगामी युध्दासाठी त्यांना शुभेच्छा होत्या की फलटणच्या राजकारणाला कुण्या एका निंबाळकर घराण्याचाच टिळा लागलेला नाही, ते दाखविण्याची सूचकता होती, हे त्यांनाच ठाऊक. खरंतर, फलटणच्या सारीपाटावर ‘सुशांत’ ही छोटीशीच प्यादी. मात्र, छोटीसी चींटीभी पड सकती है हाथी को भारी. कधीकाळी फलटणच्या राजेंना पुण्याहून इथं आणण्यात धनुभाऊंसोबत बीकेभाऊंचाही मोठा वाटा. पंचवीस वर्षांपूर्वी चिमणरावांचं साम्राज्य उलथवून टाकण्यात ‘सुशांत’च्या वडिलांनी पुढाकार घेतलेला. प्रस्थापितांना बाजूला सारण्याचा त्यांना अनुभव दांडगा. तेव्हा भविष्यात ‘सुशांत’च्या माध्यमातून फलटणमध्ये चमत्कार घडविण्याच्या त्यांच्या स्वप्नांना मिळू शकते साताºयाच्या राजेंची साथ, म्हणूनच राजेंच्या भाळी कदाचित निंबाळकरांचा टिळा !
२००९ च्या माढा भेटीचा रिटेक..
साताºयातील थोरल्या राजेंची फलटण मोहीम तशी अकस्मात नव्हती. पालिकेत राजेंची वकिली करणाºया बनकरांच्या आप्तेष्टांचा फलटणमध्ये विवाह सोहळा होता. मात्र, या सोहळ्याला राजेंसोबत पाच-पन्नास गाड्यांचा ताफा जमला अन् फलटणच्या रस्त्यांवरून रोंगावत फिरला. फलटणकरांना क्षणभर आपण सातारकर असल्याचाच भास झाला.. यानंतर सुरू झाल्या राजेंच्या वादग्रस्त भेटीगाठी. बिच्चारे बनकर जिथं जातील, तिथं वाद का निर्माण होतो, हे एक गुपितच रावऽऽ. असो.
राजेंनी हिंदुरावांची भेट घेतली. रणजितदादांचा पाहुणचार घेतला. सह्याद्रीसोबत चर्चा केली. सुशांतच्याही घरी फलटणच्या राजकारणाचा कानोसा घेतला. ही सारी मंडळी फलटणमधील राजेंच्या कट्टर विरोधातली. त्यामुळं आजपावेतो ‘डीसीसी’वर बसून साताºयातील राजेंच्या विरोधकांना उचकावयाचं काम जसं मोठ्या तन्मयततेनं केलं गेलं, तसंच फलटणमधील विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयोगही मोठ्या आपुलकीनं साधला गेला.
हीच खेळी २००९ मध्येही साताºयाच्या राजेंनी माढ्यात जाऊन केली होती. दुश्मनाच्या टापूत जाऊन तोफगोळे टाकले की आपल्या साम्राज्यातला वेढा तत्काळ तुटतो, याचा त्यांना त्यावेळी खूप चांगला प्रत्यय आला होता. यामुळंच की काय, साताºयाच्या राजेंची ’फलटण मोहीम’ सोशल मीडियावर गरजू लागल्यानंतर फलटणच्या राजेंची प्रतिक्रिया अत्यंत सावध होती. ‘तुम्हीच खासदारकी लढवा... तुम्हीच निवडून या,’ ही भाषा आजपर्यंतच्या त्यांच्या आक्रमक स्वभावाला क्रॉस करणारी होती.
राजेंच्या भेटीमुळं ‘टीआरपी’
वाढला की ‘डिलिंग रेट’ ?
फलटणचे राजे तसे खूप मुत्सद्दी अन् धोरणी.. म्हणूनच राज्यात सत्ता नसतानाही सत्ताधाºयांच्या मांडीला मांडी लावून खुर्चीवर बसण्याचा मान त्यांना दोनवेळा मिळालेला. एकीकडं फलटणचा विकास साधताना दुसरीकडं विरोधकांनाही भकास करण्याचं तंत्र त्यांनी अचूकपणे साधलेलं. त्यासाठी ‘साम, दाम, दंड अन् भेद’ या चारही अस्त्रांचा पुरेपूर वापर केलेला. आजपावेतो त्यांचे अनेक विरोधक पोलीस ठाण्यात हजेरी लावूनच कुजले. संपले. असं का घडलं, हेही शेवटपर्यंत नाही समजलं... मात्र, ‘फलटणच्या खाकीचा रिमोट वाड्यावरून हलतो,’ हा आरोप अनेकवेळा झालेला. अनेकांना ‘फलटणमध्ये बिहार’चा साक्षात्कार झालेला; कारण इथल्या भुरट्या गुंडांना पोसणारे राजकीय गुंडच म्हणे गबरगंड बनलेले.
...एकीकडं फलटणची ही राजकीय काळी बाजू असली तरी दुसरीकडं तालुक्याला पाणी पाजणारा आधुनिक भगीरथ; अशीही याच राजेंची वेगळी प्रतिमा. त्यामुळंच त्यांच्या विरोधात आबदून-आबदून विरोधक थकले. काहीजण त्यांच्या वळचणीला गेले, तर काहीजण आपापल्या कामधंद्याला लागले. रणजितदादाही टोटल ‘प्रोफेशनल’ बनले. स्टेजवर टीकाटिपण्णी करणारे अ‍ॅन्टी चेंबरमध्ये ‘डिलिंग कम् मीटिंग’ घेण्यात रमले. फलटणमधील राजे विरोधक आजही कदमांच्या वाड्याकडं मोठ्या अपेक्षेनं बघत असले तरी पित्याइतकी धमक अद्याप लेकरात नाही म्हणे. ‘सह्याद्री’च्या कोवळ्या मिसरुडांना अजून अनेक अनुभवांची गरज. त्यामुळं, साताºयाचे राजे फलटणमध्ये ‘पिकनिक’ करून आले तरी सध्या ‘एन्टरटेनमेंट’शिवाय हाती काही पडणार नाही, हीच विरोधकांची भावना. मात्र, एक नक्की. राजेंच्या भेटीमुळं अनेकांचा ‘पॉलिटिकल टीआरपी’ वाढला. याला कुणी खासगीत ‘रेट’ म्हणत असतील, तर आम्ही काय बोलावं? कारण शेवटी सारी राजघराणी म्हणे आतून एकच.
लिटर,क्रेझ अन्प्रतिमा
आज फलटणच्या राजेंचं जे काही वर्चस्व, ते त्यांच्या पाणी नियोजनामुळं. डोंगर-दºया पोखरून त्यांनी शेवटच्या टोकापर्यंत पाणी खेचून आणलेलं. फलटणच्या राजेंना पाण्यासाठी जसा संघर्ष करावा लागला, तशी वेळ साताºयाच्या राजेंवर आली नाही. आजपावेतो या राजेंना ‘पाण्याची गरज’ भासली नसावी. असो.
‘दिवसभर लिटरवर असणाºयांनी आम्हाला शिकवू नये,’ असा प्रतिटोला फलटणच्या राजेंनी लगाविलाय. मायणीचे डॉक्टर कधी बॅरलची भाषा करतात तर साताºयाचे बाबाराजे बादलीची उपमा देतात. खाजगी जीवनातला एक ‘वीक पॉर्इंट’ सार्वजनिक राजकारणात किती त्रासदायक ठरू शकतो, याचंच हे जिवंत उदाहरण.
कºहाडात नुकताच थोरातांचा जंगी विवाह सोहळा झाला. तिथं सातारा अन् सांगली जिल्ह्यातली राजकीय दिग्गज मंडळी उपस्थित राहिलेली. पृथ्वीबाबा कºहाडकर अन् जयंतराव इस्लामपूरकर आपापल्या कार्यकर्त्यांसह आलेले. मात्र, ज्यावेळी साताºयाच्या राजेंची ‘एन्ट्री’ झाली, तेव्हा सारा माहोलच बदलून गेला. राजेंभोवती अवघ्या तरुणाईचा गराडा पडला. एखाद्या नेत्याभोवती किती गर्दी होऊ शकते, याचा अनुभव बाकीचे सारे नेते घेत होते. खरंतर, ही ‘राजेंची क्रेझ’ होती की खूप दिवसांनी घडणाºया ‘दुर्मीळ दर्शनाची उत्सुकता’ होती, हे बिच्चाºया मतदारांनाच माहीत.

Web Title: Mahabharat in Ramrajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.