चारचाकी पलटी होऊन एक ठार, सहा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 11:19 AM2019-05-01T11:19:51+5:302019-05-01T11:20:03+5:30
सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चितळी गावाच्या हद्दीत चारचाकी गाडी पलटीहून विलास राजाराम खरात ( वय ५२ ) (सध्या, रा. मुंबई, रा. भिकवडी ता. खानापूर जि. सांगली) हे जागीच ठार झाले...
- संदीप कुंभार
मायणी : मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गावर मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चितळी गावाच्या हद्दीत चारचाकी गाडी पलटीहून विलास राजाराम खरात ( वय ५२ ) (सध्या, रा. मुंबई, रा. भिकवडी ता. खानापूर जि. सांगली) हे जागीच ठार झाले, तर इतर सहा जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, खरात कुटुंबीय मुंबई येथून भिकवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे मुळगावी सुट्टी व यात्रेनिमित्त चारचाकी गाडीने येत असताना आज बुधवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चितळी गावाच्या हद्दीत मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गावर गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला बांधावर तीन ते चार पलट्या घेऊन पलटी झाली.
यामध्ये विलास राजाराम खरात ( वय ५२, सध्या रा. मुंबई, रा. भिकवडी ता. खानापूर जि. सांगली) हे जागीच ठार झाले. जितेंद्र विलास खरात, संगीता विलास खरात, अंकिता विलास खरात, निकिता रोहन कांबळे, रोहन कांबळे व रुचिता रोहन कांबळे सर्व राहणार भिकवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे .
सदर घटनेच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व घटना पंचनामा करण्यात आला असून, मृत विलास खरात यांचे मृतदेह शवविच्छेदन (कलेढोण ता.खटाव) येथील कुटीर रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .
चौकट :- मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्ग असूनही हा मार्ग एकेरी व खड्डा खड्ड्याचा असल्याने वर्षातून अनेक वेळा या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले असले तरी संबंधित विभागाकडून या मार्गाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे हा मार्ग दुहेरी होत चांगला हवा अशी मागणी होत आहे.