सुरेश खाडेंनी सांगलीचा मंत्रीपदाचा दुष्काळ संपवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 06:02 PM2019-06-16T18:02:33+5:302019-06-16T18:02:56+5:30

उद्योजक ते भाजपचे मंत्री व्हाया रिपाइं

Suresh Khadeni ends Sangli's ministerial drought! | सुरेश खाडेंनी सांगलीचा मंत्रीपदाचा दुष्काळ संपवला!

सुरेश खाडेंनी सांगलीचा मंत्रीपदाचा दुष्काळ संपवला!

Next

- श्रीनिवास नागे

सांगली : वर्षानुवर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात ‘हेवीवेट’ मंत्रीपदे सांभाळणाऱ्या सांगलीला २०१४ च्या निवडणुकीत चार आमदार निवडून येऊनही भाजपने सुरुवातीला मंत्रीपद दिले नव्हते. नंतर सदाभाऊ खोत यांच्या रूपाने केवळ एक राज्यमंत्रीपद मिळाले. मंत्रीपदाचा हा दुष्काळ संपणार कधी, असा सवाल विचारणाऱ्या सांगली जिल्ह्याला अवघ्या तीन महिन्यांसाठी का होईना सुरेश खाडे यांच्या रूपाने मंत्रीपद मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना खूश केले आहे.


मोजूनमापून पण रोखठोक बोलणे, धूर्तपणा, लोकांची नस ओळखण्यातील चतुराई ही सुरेश खाडे यांची गुणवैशिष्ट्ये. उद्योग-व्यवसायात जम बसलेला असतानाही ते राजकारणात आले. सांगली जिल्ह्यातील जतमधून एकदा आणि आणि मिरज येथून सलग दोनवेळा त्यांनी आमदारकीवर मोहोर उमटवली आहे. 


तासगाव तालुक्यातील पेड हे त्यांचे मूळगाव. जन्म १ जून १९५८ रोजीचा. गरीब चर्मकार कुटुंबात जन्मलेल्या सुरेश खाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत दहावीपर्यंत शिक्षण घेऊन आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला. व्यवसायाच्या शोधात दत्ता व अशोक या भावांसोबत मुंबईला गेले. समुद्रात तेल उत्खनन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीच्या निर्मिती व्यवसायात खाडे बंधूंनी जम बसविला. दास ऑफशोअर या कंपनीची स्थापना केली. दत्ता, अशोक आणि सुरेश या तिन्ही भावांच्या नावांच्या आद्याक्षरावरून ‘दास’चे नामाभिधान झाले.


या कंपनीमार्फत तेल उत्खननासाठी लागणाऱ्या सामग्रीची निर्मिती, स्काय वॉकची उभारणी करण्यात येते. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधण्याचा मान ‘दास’नेच पटकावला आहे. खाडे बंधूंनी दुबईतही उद्योग सुरू केला आहे. 


व्यवसायात यश मिळविल्यानंतर सुरेश खाडे यांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. रिपाइंच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २००४ मध्ये जत राखीव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुकीची तयारी केली. तेव्हा ते जत येथील डफळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. जतचे तत्कालीन काँग्रेसचे आमदार उमाजी सनमडीकर यांना तत्कालीन काँग्रेस नेते विलासराव जगताप यांनी जोरदार विरोध केला होता. खाडे यांनी जगतापांच्या मध्यस्थीने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करून जतसाठी भाजपची उमेदवारी मिळविली. जगताप यांनी उघडपणे प्रचार करून खाडे यांना निवडून आणले आणि जिल्ह्यात प्रथमच जतमध्ये भाजपचा आमदार विजयी झाला! 


२००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत जत विधानसभा मतदारसंघ खुला होऊन मिरज मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपने खाडे यांना मिरजेतून उमेदवारी दिली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरजेतूनही खाडे यांनी ५४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. पुढे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 


शेती, नाटक, संगीत व विठ्ठलभक्ती यात खाडे यांना विशेष रूची. पंढरीच्या प्रत्येक वारीला ते विठ्ठलचरणी हजेरी लावतात. पेड येथील शेतीची, द्राक्षबागेची देखभाल करण्याचीही त्यांना आवड आहे. त्यांचे तासगाव येथे स्वत:चे कोल्ड स्टोअरेज आहे. श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 


विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विरोधात असतानाही खाडे यांनी २००९मधील निवडणुकीपेक्षा दहा हजार जादा मताधिक्याने विजय मिळवला. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या दंगलीमुळे, ‘दंगलीमुळे निवडून आलेला आमदार’ असा विरोधकांनी केलेला प्रचार खोडून काढत त्यांनी एकतर्फी विजय नोंदवला. विरोधातील सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली! दहा वर्षे आमदार म्हणून काम करीत असताना विधिमंडळ समिती सदस्य, पंचायत राज समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले. राष्ट्रीय चर्मकार संघाचे सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत.


दणदणीत विजय
सुरेश खाडे यांना विधानभेच्या २०१४मधील निवडणुकीत मिरज मतदारसंघातून ९३७९५ मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रा. सिद्धार्थ जाधव यांना २९७२८ मतांवर समाधान मानावे लागले होते. सुमारे ६४ हजार मतांनी खाडे यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

Web Title: Suresh Khadeni ends Sangli's ministerial drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.