सांगलीत काँग्रेस नेत्यांचा एकजुटीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:03 AM2018-04-26T00:03:36+5:302018-04-26T00:03:36+5:30

The determination of unity of Congress leaders in Sangli | सांगलीत काँग्रेस नेत्यांचा एकजुटीचा निर्धार

सांगलीत काँग्रेस नेत्यांचा एकजुटीचा निर्धार

Next


सांगली : पक्षांतर्गत नेत्यांमधील गटबाजी कृष्णा नदीच्या पात्रात बुडवून एकसंधपणे महापालिका निवडणूक लढविण्याची जोरदार मागणी बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षीय बैठकीत केली. त्याची गंभीर दखल घेत काँग्रेस नेत्यांनीही गटबाजीला तिलांजली देत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.
येथील कच्छी जैन भवनात महापालिका क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, काँग्रेसच्या राष्टÑीय कार्यकारिणी सदस्या जयश्रीताई पाटील, महापौर हारुण शिकलगार, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, पक्षाचे प्रभारी प्रकाश सातपुते, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापालिकेचे गटनेते किशोर जामदार उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील यांनी या बैठकीत सर्वच नेत्यांना एकत्रीत आणले. तरीही कार्यकर्त्यांनी पक्षातील गटबाजीवरच आक्षेप नोंदविले. कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून व्यासपीठावरील नेत्यांनी, महापालिका निवडणुकीत आम्ही सारे नेते एकत्र राहू, असे सांगून, एकजुटीने काम करण्याचे आश्वासन दिले.
विश्वजित कदम म्हणाले की, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम आणि मदनभाऊ पाटील या दोन दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत महापालिकेची निवडणूक होत असल्याने काँग्रेसची सर्वच नेतेमंडळी निवडणुकीबाबत गंभीर आहेत. या दोन्ही नेत्यांचे महापालिका जिंकण्याचे स्वप्न साकार करायचे आहे. आपसात मतभेद करण्याची ही वेळच नाही. प्रभागनिहाय आम्ही लवकरच भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. त्यावेळी काँग्रेसमधील सर्वच नेते एकत्र दिसतील. महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने जाणीवपूर्वक काही लोक काँग्रेसअंतर्गत गटबाजीबद्दल अफवा पसरवित आहेत. कार्यकर्त्यांनीही अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये. नेत्यांमध्ये मतभेद आहेत, असे भासवून कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्नही करू नये. असे प्रकार खपवून घेणार नाही.
जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये आता कोणतेही वाद नाहीत. दोन मोठ्या नेत्यांच्या निधनानंतर महापालिकेची निवडणूक आता कार्यकर्त्यांची लढाई बनली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या या नेत्यांसाठी एकसंधपणे लढायचे आहे. कोणावरही अन्याय आम्ही होऊ देणार नाही.
प्रकाश सातपुते म्हणाले की, संपूर्ण राज्याचे लक्ष आता सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. महाराष्टÑाच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाल्यानंतरही काँग्रेसचा बालेकिल्ला असणाºया नांदेड महापालिकेत काँग्रेस जिंकली. आता सांगली महापालिकेच्या निवडणुकीतही काँग्रेसचाच विजय निश्चित आहे. त्यासाठी नेत्यांनी एकसंधपणे लढावे, असे मलाही वाटते.
पृथ्वीराज पाटील म्हणाले की, महापालिकेची निवडणूक सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढली जाणार आहे. त्यामुळेच त्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. लोकशाही मानणारा आपला पक्ष आहे. येणाºया महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसची सत्ता अबाधित ठेवताना शहरातील उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
हाफिजभार्इंचा विसर नको!
एका कार्यकर्त्याने उपस्थित नेत्यांचे स्टेजवरील फलकाकडे लक्ष वेधले. मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे कॉँग्रेसच्या यशात मोठे योगदान आहे. तरीही व्यासपीठावरील फलकावर त्यांचे छायाचित्रही नाही, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. पृथ्वीराज पाटील यांनी लगेचच प्रतिसाद देत पुन्हा अशी चूक होणार नसल्याचे स्पष्ट केले.
पाणीपुरवठा प्रकल्पाचे २ रोजी उद्घाटन

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते २ मे रोजी सांगली दौºयावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत माळबंगला येथील ७० एमएलडीच्या नव्या पाणीप्रकल्पाचे उद्घाटन व सभा होणार आहे. त्यानंतर ३ रोजी कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती विश्वजित कदम यांनी दिली.

Web Title: The determination of unity of Congress leaders in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.