वेगळ्या विषयावर भाष्य करणारा यंग्राड

By प्राजक्ता चिटणीस | Published: July 5, 2018 05:46 PM2018-07-05T17:46:59+5:302023-08-08T19:28:38+5:30

एक वेगळा विषय यंग्राड या चित्रपटात हाताळण्यात आला असून या चित्रपटात विक्या, बाप्पा, अंत्या आणि मोन्या या चौघांच्या मैत्रीची आणि त्यांच्या आयुष्याची गोष्ट दिग्दर्शक मकरंद माने यांनी मांडली आहे.

yangrad marathi movie review | वेगळ्या विषयावर भाष्य करणारा यंग्राड

वेगळ्या विषयावर भाष्य करणारा यंग्राड

Release Date: June 07,2018Language: मराठी
Cast: चैतन्य देवरे, जीवन करळकर, सौरभ पाडवी, विठ्ठल पाटील आणि शिव वाघ
Producer: विठ्ठल पाटील, गौतम गुप्ता, गौरव गुप्ता, मधु मंटेनाDirector: मकरंद माने
Duration: 132 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

रस्त्यावरच्या उनाड मुलांकडे पाहून अनेकवेळा आपण दुर्लक्ष करतो. ही मुले कधीच सुधारू शकत नाही असेच आपल्याला वाटत असते. पण या मुलांचे देखील एक आयुष्य असते. काही वेळा चुकीच्या पद्धतीने त्यांना फसवले गेलेले असते आणि त्यांना देखील जगण्याचा हक्क असतो हा विचार आपण कधीच करत नाही. याच उनाड मुलांच्या आयुष्यावर बेतलेला यंग्राड हा चित्रपट आहे. 
विक्या (चैतन्य देवरे), बाप्पा (जीवन करळकर), अंत्या (सौरभ पाडवी) आणि मोन्या (शिव वाघ) असे चार मित्र असतात. टवाळक्या करणे, मजामस्ती करणे एवढेच त्यांचे आयुष्य असते. बल्लाळ सुर्वे या राजकारण्यासाठी लोकांना धमकवून पैसे गोळा करायचे काम देखील ते करत असतात. पण याच दरम्यान विक्की तेजू (शिरीन पाटील) च्या प्रेमात पडतो. विक्की उनाडक्या करणारा, लोकांना धमकवून त्यांच्याकडून पैसे घेणारा मुलगा आहे हे कळल्यावर ती त्याच्या प्रेमास नकार देते. त्यामुळे विक्की आणि त्याचे मित्र त्यांचा हा वाईट धंदा सोडून चांगले आयुष्य जगायचे ठरवतात. पण त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कशाप्रकारे कलाटणी मिळते, या सगळ्यातून ही मुले बाहेर पडतात का, आपले आयुष्य नव्याने जगण्याची त्यांना संधी मिळते का यांसारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हा चित्रपट पाहायला नंतरच मिळतील.
एक वेगळा विषय यंग्राड या चित्रपटात हाताळण्यात आला असून या चित्रपटात विक्या, बाप्पा, अंत्या आणि मोन्या या चौघांच्या मैत्रीची आणि त्यांच्या आयुष्याची गोष्ट दिग्दर्शक मकरंद माने यांनी खूपच चांगल्याप्रकारे मांडली आहे. या चित्रपटाचा पूर्वाध खूपच रटाळ आहे. चित्रपटात काहीच घडत नसल्याचे आपल्याला जाणवते. केवळ या चौघांच्या उनाडक्या, विक्की-तेजू यांचे प्रेमप्रकरण येवढेच आपल्याला मध्यांतरापर्यंत पाहायला मिळते. पण मध्यांतरानंतर चित्रपटाला चांगलाच वेग मिळतो. चित्रपटात पुढे काय होणार याची उत्सुकता नक्कीच लागते. या चित्रपटात येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतात. चित्रपटात चैतन्य देवरे, जीवन करळकर, सौरभ पाडवी, विठ्ठल पाटील आणि शिव वाघ यांनी चांगले काम केले आहे. शशांक शेंडे यांच्या भूमिकेला तितकासा वाव मिळाला नसला तरी त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. चित्रपटात अनेक गाणी असली तरी एकही गाणे ओठावर रुळत नाही. तसेच चित्रपटाच्या शेवटी असणाऱ्या गाण्यात किंवा नृत्यात तितकासा दम नसल्यासारखे जाणवते. चित्रपटाची लांबी काहीशी जास्त आहे. पण असे असले तरी एकंदरीत हा चित्रपट मनोरंजन करतो. 

Web Title: yangrad marathi movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.