असं प्रेम लोक का करतात?... जगण्याची नवी दृष्टी देणाऱ्या तीन गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 04:34 PM2018-08-10T16:34:34+5:302018-08-10T17:11:16+5:30

आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती सामान्यतः आपल्याला आवडतेच. किंवा कदाचित त्याचं ते प्रेम करणं आवडत असेल. असं म्हणतात की, जगातील कोणतीच भावना आणि पर्यायाने कोणतंच नातं एकतर्फी असत नाही; मग ते शत्रुत्व का असे ना! समोरच्याचा त्यात सक्रीय वा निष्क्रिय सहभाग असतोच असतो.

Love beyond words : These three stories will give new vision to life | असं प्रेम लोक का करतात?... जगण्याची नवी दृष्टी देणाऱ्या तीन गोष्टी

असं प्रेम लोक का करतात?... जगण्याची नवी दृष्टी देणाऱ्या तीन गोष्टी

googlenewsNext

>> संकेत सातोपे

आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती सामान्यतः आपल्याला आवडतेच. किंवा कदाचित त्याचं ते प्रेम करणं आवडत असेल. असं म्हणतात की, जगातील कोणतीच भावना आणि पर्यायाने कोणतंच नातं एकतर्फी असत नाही; मग ते शत्रुत्व का असे ना! समोरच्याचा त्यात सक्रीय वा निष्क्रिय सहभाग असतोच असतो. प्रेमाबाबत आणखी एक गृहीतक आपल्या डोक्यात पक्कं बसलंय, ते म्हणजे आपली काळजी घेणाऱ्या किंवा आपली सरबराई करणाऱ्याच्या आपण प्रेमात असतो. पण एव्हढ्यात पाहण्यात आलेलं एक नाटक, एक चित्रपट आणि एक घटना, यांनी या सरधोपट गृहितकाचा पुनर्विचार करण्यास बाध्य केलं.

त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम; दोघंही सुस्थित, लग्नही ठरल्यात जमा. एकदा आईस्क्रीम खायला म्हणून बाहेर गेले आणि रस्ता ओलांडताना अपघात झाला. आता ती पुन्हा उभी राहू शकणार नाही. तरीही हा रोज सकाळी तिच्या घरी जातो. तीच सगळं करतो आणि मग ऑफिस.. हे असं कित्येक वर्षं चाललंय. ठाणे- डोंबिवली परिसरातीलच ही घटना असल्याचं एका मैत्रिणीच्या तोंडून ऐकलं.

दरम्यान ‘मी बीफोर यू’ हा चित्रपट पाहण्यात आला. लुईजा- एक वेंधळी मुलगी, जिला सांडल्याविना चहाचा पेलाही भरता येत नाही. अशात एका अब्जाधीशाकडे तिला नोकरीची संधी मिळते. वील हा साधारण तिशीतला तरुण, जो एका अपघाताने कायमचा अंथरुणाला खिळला आहे. त्याच्या मानेखालील शरीराच्या संवेदना नाहीशा झाल्या आहेत. त्याने स्वित्झर्लंडमध्ये इच्छा मरणासाठी अर्ज केला आहे आणि काही महिन्यांतच तो स्वतःला सन्मानाने संपविण्यासाठी युकेतून तिथे जाणार आहे. तोवर त्याची हरप्रकारे काळजी घ्यायची, त्याच्यासोबत बोलायचं, त्याच्या आयुष्यात इतका रस निर्माण करायचा की, त्याने इच्छामरणापासून परावृत्त व्हावे. हे काम त्या वीलच्या आई-वडिलांकडून या चुळबुळ्या- गोंडस लुईजाला देण्यात आलं आहे. जे ती पार पाडू शकेल याची शाश्वती अन्य कुणाला सोडा, खुद्द तिलाही नाहीये. पण ती काम सुरू करते आणि अवखळ- अल्लड मुलीचे रूपांतर एका धीरगंभीर स्त्रीमध्ये होतं. कालपर्यंत तिची काळजी घ्यावी लागत होती, आज ती एका उठूही न शकणाऱ्या रुग्णाचा सांभाळ समर्थपणे करते. पुढे तिची काळजी घेणाऱ्या प्रियकराला दूर करून ती या अपंगाच्या प्रेमात पडते. पण त्याची संपत्ती, पैसा नाकारते.

सध्या रंगभूमीवर गाजणारं ‘अनन्या’ हे नाटकही काहीसं याचं धाटणीचं. अपघातात हात गमावल्या अनन्याशी संसार करायला तयार झालेला जय.. अनन्याच्या प्रेमात पडलेला असाच मोकळा -ढाकळा, काहीसा बेफिकीर मुलगा.

या तिन्ही गोष्टींमध्ये प्रेमात पडणाऱ्यांनी समोरच्या व्यक्तीची मोठ्ठी जबाबदारी आपसूक स्वीकारली आहे. किंवा या जबाबदारीमुळेच ते समोरच्याच्या प्रेमात पडले आहेत. म्हणजे आपली काळजी घेणारा नव्हे, तर आपल्याला जो त्याची काळजी घेऊ देणार आहे; त्याच्या प्रेमात या व्यक्ती आकंठ बुडाल्या आहेत. आणि समोरच्याने स्वतःची काळजी घेऊ दिल्याबाबत, त्याच्याप्रति कृतज्ञ आहेत. बरं, हे सगळं त्यांनी केवळ एक कर्तव्य या भावनेतून केलं असतं, तर त्यातली सगळी उत्स्फूर्तताच निघून गेली असती. त्यात नित्योपचाराचा रुक्षपणा आला असता. प्रेम भावनेसाठी लागणारा रसरशीतपणाही नष्ट झाला असता. महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तींना यातून काही सामाजिक मोठेपण मिळणार आहे किंवा त्यांच्यावर ही जबाबदारी कुणी लादली आहे, असंही नाही. मग काय आधार असतो या प्रेमाला?

याचं उत्तर स्वामी विवेकानंदांच्या एका वाक्यात सापडतं, ‘दानाने याचक नव्हे, तर दाता उपकृत होतं असतो.’ याचकासाठी दानाच मोल त्या वस्तुपुरतचं, पण दात्याला मात्र दानाची भावना खूप काही देऊन जाते. घेण्यात नव्हे, तर देण्यात खरी मजा आहे, हे आपण लहानपणापासून ऐकतो, त्याच कारण हेच.

लहान बाळाचे किती लाड करतो आपण! ते बाळ क्षणात विसरूनही जातं; पण आपल्याला मात्र त्याचे केलेले लाड आणि त्यातून मिळालेला आनंद कायम लक्षात राहतो. हेच याबाबतीत होत असेल ना! कशा-कश्याचाही विचार न करता एखाद्यावर जीव तोडून प्रेम करणं, ही मनाला एक वेगळीच उंची गाठून देणारी भावना आहे. तसं प्रेम ज्याला जमलं, तो भौतिक- व्यवहार्य सुखाच्या विचारांतून त्याच्याही नकळत मुक्त होतो. देव या संकल्पनेवर निरतिशय प्रेम करणं, हीसुद्धा अशीच उन्नत करणारी भावना आहे. ते जमलं, तो खरा भाग्यवंत.. म्हणूनच तुकोबा म्हणतात ना की, ‘बहुत सुकृतांची जोडी म्हणूनि विठ्ठल आवडी.’

याचं आणखी एक अंग म्हणजे, माझी आणि फक्त माझीच एखाद्याला अत्यंत गरज आहे, ही मानवी जीवनातील सर्वांत सुखावह आणि माझी कुणालाच गरज नाही, ही सर्वांत दुःखद भावना आहे. मुलं-बाळं त्यांच्या संसारात रमली की, म्हातारी माणसं एकटी पडतात, निराश होतात. त्याचं प्रमुख कारण,  माझी आता कुणालाच आवश्यकता नाही, या भावनेतच आहे. एक वेळ माझी कुणालाच फिकीर नाही, या भावनेसह माणूस जगू शकेल, पण मी फिकीर करावी, असं कुणीच नसताना आयुष्य ढकलणं कर्मकठीण…
प्रत्येकाला जगण्यासाठी एक अशी जबाबदारी लागतेच, जिच्यासाठी तो जीव ओवाळून टाकील. ती जर प्रेमापोटी, स्वेच्छेने स्वीकारण्याची संधी मिळाली, तर त्यासारखं सुख नाही. ही प्रेमळ जबाबदारीच माणसाला समंजस बनवते आणि वाट्टेल ते धाडस करायला सिद्ध करते. प्रचंड मस्तीखोर मुल त्याच्यापेक्षा लहान मुलांसोबत खेळताना जबाबदारीने वागतं. युद्धच्या वेळी देशाला आपली गरज आहे म्हटल्यावर बहुतांश नागरिक जबाबदारीने वागतात. वाट्टेल तो त्याग करायला, प्रसंगी जीव द्यायला तयार होतात. पण तेच शांततेच्या काळात खुशाल अप्पलपोटे होतात. 

आपल्यावर कुणीतरी प्रेम करणं आपल्याला आवडतं;  त्यापेक्षा आपलं प्रेम करणं कुणालातरी आवडतंय, खुलवतयं या संवेदना अधिक आनंददायी आहेत. अगदी रतीसुखातसुद्धा स्त्रिला पूर्ण तृप्त करू शकण्यात पुरुषाला धन्यता- पुरुषार्थ वाटतो आणि ते तो करू शकला नाही, तर अतृप्तीही जाणवते, असं म्हणतात. एकंदरीत काय कुणाच्यातरी आयुष्यात आपल्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याविना त्याचं पानही हलणार नाहीये, ही जगातली सगळ्यात गोड भावना आहे. ती मिळवण्यासाठी कुणी पैसे मोजतं, तर कुणी आयुष्य!

Web Title: Love beyond words : These three stories will give new vision to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.