मूल शाळेत दंगा करतं, भांडतं?-घरात तुम्ही त्याच्याशी तसंच तर वागत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:18 PM2017-08-21T16:18:51+5:302017-08-21T16:48:29+5:30
पालकांचं मुलांशी वागणं, मूल घरात आनंदी असणं त्याच्या सोशल होण्यात मोठी भूमिका बजावतं.
घरातलं पालकांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं परस्परांवर असलेलं नसलेलं प्रेम, भांडणं, चर्चा, निकोप वातावरण, मोकळेपणा यासार्याचा मुलांच्या वागण्यावर, मनावर परिणाम होतो हे तर उघड आहे. पण आता एक नवीन अभ्यास सांगतो आहे की, घरातलं हेच वातावरण मुलं शाळेत घेऊन जातात आणि इतर मुलांशी आणि शिक्षकांशी बोलताना, भांडताना, जमवून घेताना त्यासार्याचा फार मोठा परिणाम मुलांवर होत असतो. नॉर्वेअन विद्यापीठाच्या सायस आणि टेक्नॉलॉजी शाखेंतर्गत मानसशास्त्रात पीएचडीचा अभ्यास करणार्या बीट डब्ल्यू हेगन यांचा एक महत्वाचा अभ्यास अलिकडेच प्रसिद्ध झाला आहे.
त्यात हेगम म्हणतात की, मुलं शाळेत बरंच काही शिकतात हे मान्य. शाळेत शिकण्यासाठीच आपण त्यांना पाठवतो. पण तिथं ते कसं जमवून घेतात याचा पाया घरातच घातला जातो. ज्या काळात घरात मुलांचं आईबाबांशी, भावंडांशी, नातलगांशी पटतं, त्यांना सुरक्षित वाटतं तेव्हा ते शाळेत मित्रांशी, शिक्षकांशी उत्तम वागतात. त्याचा रॅपो चांगला असतो, ते प्रेमानं सगळ्यांत मिसळतात. त्याकाळात त्यांच्यातलं लव्ह हार्मोन उत्तम काम करतं. मात्र तसं नसेल तर मुलं शाळेत दंगा करतात, मारामार्या करतात, अभ्यासात लक्ष नसतं, शिक्षकांशी पटत नाही. त्यामुळे घरात मुलांना सुरक्षित वाटणं, प्रेम मिळणं, आनंदी राहणं हे त्यांच्या सोशल होण्यात मोठं फायदेशीर ठरतं, असं हा अभ्यास सांगतो.