रत्नागिरी, गुहागर व कणकवली-देवगड विधानसभेच्या जागेवर भाजप करणार दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:53 AM2019-05-28T11:53:05+5:302019-05-28T11:55:29+5:30

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीनंतर भाजप, संघ परिवाराने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीत सेना - भाजप ...

BJP to claim Assembly seat, | रत्नागिरी, गुहागर व कणकवली-देवगड विधानसभेच्या जागेवर भाजप करणार दावा

रत्नागिरी, गुहागर व कणकवली-देवगड विधानसभेच्या जागेवर भाजप करणार दावा

Next
ठळक मुद्देविधानसभेच्या जागेवर भाजप करणार दावारत्नागिरी, गुहागर व कणकवली-देवगड विधानसभा लढवाव्यात

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीनंतर भाजप, संघ परिवाराने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीत सेना - भाजप युती झाल्यास रत्नागिरी, गुहागर व कणकवली - देवगड हे युती म्हणून भाजपच्या वाटणीला आलेले विधानसभा मतदारसंघ भाजपने परत घ्यावेत. या जागा सर्वशक्तिनिशी लढवाव्यात, अशी मागणी येथील संघ परिवाराच्या समन्वय समितीच्या स्थानिक प्रमुखांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप या जागांवर दावा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे भाजप व संघ परिवाराने लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेतील बदल, पक्ष विस्तार याबाबत विचार करून निर्णय घेण्यासाठी समन्वय समितीची ही बैठक रत्नागिरीत घेण्यात आली. या बैठकीला भाजपच्या सर्व विंग्जचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. मात्र, संघ परिवाराच्या समन्वय समितीच्या या सभेबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप - सेना युती होती. राज्यात या युतीने घवघवीत यश संपादन केले आहे. आता विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिवसेना व भाजप यांची युती होती. गेल्या लोकसभा निवडणुकीतही युती होती. मात्र, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. त्यामुळे सेना व भाजप उमेदवार निवडणुकीत आमने सामने उभे ठाकल्याने मतांचे विभाजन झाल्याचे पुढे आले.

तरीही राज्याची सत्ता भाजप व सेनेकडेच आली. मात्र, त्यावेळच्या निवडणुकीत सेना - भाजपमध्ये टोकाचे आरोप झाले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांची मने दुखावली होती. यावेळी मात्र युती कायम ठेवण्याची भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. समन्वय समितीच्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भाजप पदाधिकारी, कार्यकारिणी, विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी यांचा कार्यकाल संपलेला आहे. मात्र, निवडणुका समोर असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पक्षांतर्गत निवडणुका आता विधानसभा निवडणुकीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र, पक्षसंघटनेत काही बदल करायचेच असतील तर संबंधितांची प्रभारी म्हणून निवड होऊ शकते, यावरही चर्चा झाली. त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भाजप सर्वसमावेशक पक्ष म्हणून लोकांपुढे यावा, यासाठी प्रयत्न होणार आहेत. पक्ष संघटना अधिक भक्कम करण्यावर सभेत भर देण्यात आला. तसेच भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याशी संबंधित कामांना जिल्ह्यात गती दिली जाणार आहे. या कामातून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरीकडे लक्ष

भाजप जिल्हाध्यक्ष ,जिल्हा सरचिटणीस, कार्यकारिणी सदस्य यांचा कार्यकाल संपलेला आहे. त्यामुळे या पदांवर कोणाची निवड होऊ शकते, याचा अंदाजही घेतला जात आहे. मात्र, या पदांवर विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच निर्णय होणार आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचा कारभार त्यांच्याच माध्यमातून हाकला जाणार आहे.

सेना जागा सोडणार?

गेल्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती तुटली. त्यानंतर राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सेनेतर्फे रत्नागिरीतून निवडणूक लढवून त्यांनी विजयही संपादन केला. यावेळी विधानसभेसाठी युती झाली तर मूळ भाजपच्या वाट्याची रत्नागिरी ही जागा असल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: BJP to claim Assembly seat,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.