चैन पडेना आम्हाला... दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:34 AM2018-09-25T03:34:41+5:302018-09-25T03:34:55+5:30

जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी १० दिवसांच्या १५० सार्वजनिक, १ हजार ७१६ घरगुती बाप्पांच्या मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

Raigad Ganesh Visarjan News | चैन पडेना आम्हाला... दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप

चैन पडेना आम्हाला... दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप

googlenewsNext

अलिबाग - जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी १० दिवसांच्या १५० सार्वजनिक, १ हजार ७१६ घरगुती बाप्पांच्या मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. डीजेवर न्यायालयाने कडक निर्बंध लावल्यामुळे ढोल-ताशांच्या गजरासह पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गेले दहा दिवस बाप्पाच्या आगमनाने वातावरण चांगलेच भक्तिमय बनले होते. विविध सार्वजनिक मंडळांनी राष्ट्रहिताचे तसेच देशप्रेम जागवणारे देखावे उभे केले होते. भजन, कीर्तनासह सांस्कृतिक कार्यक्रमाची दहा दिवस चांगलीच रेलचेल अनुभवाला मिळाली. कोकणामध्ये बाप्पाचा पाहुणचार करण्यासाठी आलेले चाकरमानी देखील गौरी-गणपतींना निरोप देऊन माघारी परतले होते.
मिरवणुकीमध्ये डीजे लावण्याबाबत उच्च न्यायालयाने ठणकावल्यामुळे डीजेचा आवाज ऐकू आला नाही.
अलिबागच्या समुद्रकिनारी सायंकाळी सहानंतर बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनास सुरुवात झाली. त्यावेळी बाप्पाची ज्या वाहनांवरून मिरवणूक काढण्यात येणार होती ती वाहने हार, फुलांसह विद्युत रोषणाईने चांगलीच सजवली होती. ढोल- ताशा, बँजो पथकाच्या तालावर आबालवृद्धांसह महिलाही थिरकताना दिसत होत्या. मिरवणुकीतील बँजो पथक वैशिष्ट्यपूर्ण तालामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते, तर वारकरी संप्रदायाने टाळ-मृदंगाच्या तालावरील लयबद्ध भजने सादर केली.
समुद्रकिनारी निर्माल्य कलश ठेवण्यात आला होता. त्यामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानसह अलिबाग नगर पालिकेने ठेवलेल्या कलशाचा समावेश होता. मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रात्री १२.३० वाजेपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. वाद्यांना विश्रांती बारा वाजताच देवून नियमांचे पालन गणेशभक्तांनी स्वेच्छेने केले. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही खवय्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

१०९७ गणेशमूर्तींचे विसर्जन

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : तालुक्यात १०९७ गणेशमूर्तींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. नेरळमध्ये पुष्पवृष्टी तर कर्जत सार्वजनिक गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून करण्यात आले. पावसाने दडी मारल्याने विसर्जनात कोणतीही बाधा आली नाही. तसेच कर्जत पोलीस ठाण्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन सोमवारी करण्यात आले.
तालुक्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक १२, घरगुती ४२४, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक एक, घरगुती ६३२, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक एक, घरगुती २७, अशा एकूण १०९७ गणेशमूर्तींचे ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात विसर्जन करण्यात आले.
रायगड जिल्ह्यामध्ये नेरळ गणेश घाट येथील गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. गणेश घाट परिसर विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांनी झळाळून गेलेला असताना विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश मूर्तीवर करण्यात येणारी पुष्पवृष्टी आणि रात्री उशिरापर्यंत चालणारा गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन सोहळ्यासाठी घाटावर व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी प्रकाशमान झाला होता. येथील ब्रिटिशकालीन धरण काठोकाठ भरलेले असल्याने कोणताही अपघात होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी पाण्यामध्ये होडी घेवून तयार होते. कर्जत व नेरळ येथील मुस्लीम बांधव गणेश विसर्जन करण्यासाठी जाणाºया मंडळांच्या पदाधिकाºयांचे स्वागत करताना दिसत होते. नेरळ येथे गणेशमूर्तींचे विसर्जन सर्व कर्मचारी होडीमध्ये गणेशमूर्ती घेवून खोल पाण्यात विसर्जित करण्याचे काम करीत होते.

पारंपरिक पद्धतीने
रंगला सोहळा
रेवदंडा : गेले दहा दिवस लाडक्या गणरायांचे आगमन घरोघरी झाल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया या तालावर नाचत ढोल-ताशांच्या गजरात गणपती सोहळा पारंपरिक पद्धतीने समुद्रकिनारी, तलावात, नदी काठावर उत्साहात पार पडला. अनेक ठिकाणी आतषबाजी करण्यात आली. रविवारी रात्री दहापर्यंत विसर्जन सोहळा रंगला होता. सजवलेल्या हातगाड्या, वाहने, पालखीतून मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आल्या.

नेरळमध्ये गणेश घाटावर ५00हून अधिक मूर्तींचे विसर्जन
नेरळ : ढोल-ताशाचा गजर आणि टाळ मृदंगाचा भक्तिमय संगम, फटाक्यांची आतषबाजी आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात नेरळमध्ये गणरायाला भाविकांनी भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. नेरळ येथील गणेश घाटावर घरगुती ५00 हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या भक्तांचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात येत होते. नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील विसर्जन सोहळ्यासाठी गणेश घाट हा विद्युत रोषणाईने लखलखून निघाला होता.
नेरळ सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निर्माल्य आणि प्लॅस्टिक गणेश भक्तांकडून जमा करून स्वच्छता मोहीम राबविली. विसर्जनाच्या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नेरळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नेरळ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक ढवळे, शिंदे, मोहिते, तडवी यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाच्या ठिकाणी आणि गणेश घाटावर बंदोबस्तासाठी रात्री मिरवणूक संपेपर्यंत उपस्थित होते.

महाडमध्ये जयघोष


महाड : ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात ढोल-ताशांच्या आणि खालू बाजाच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाडमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांंच्या विसर्जन मिरवणुका सायंकाळी निघाल्या होत्या. रात्री उशिरा या मंडळांंसह अनेक घरगुती गणरायांचे विसर्जन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व मिरवणुकांचे नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी स्वागत केले. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.
सर्व विसर्जन घाटांवर नगरपरिषदेने निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवले होते. साळीवाडा नाका येथे सर्व गणेश मंडळांंच्या मिरवणुकांचे मुस्लीम बांधवांनी स्वागत करीत राष्ट्रीय एकात्मकतेचे दर्शन घडवले.

गडब येथे विसर्जन
वडखळ : दहा दिवसांचा पाहुणचार आटोपून सकल गुणांचा अधिपती गणनायकाने रविवारी भक्तांचा निरोप घेतला.
संध्याकाळी ४ नंतर मंगल आरती आटोपून, तलावात, विर्सजनस्थळाकडे बाप्पांच्या वाजतगाजत मिरवणुका निघाल्या. पूजा, आरत्यांचा जल्लोष, भजन, नाचगाणी, गप्पाटप्पा, पाहुण्यांची वर्दळ, घरात गोडधोड पदार्थ, फराळ, नवीन कपडे, पत्त्याचे डाव, उखाणे, वाद्याच्या तालावर थिरकणे दहा दिवस चाललेल्या मौजमस्तीला अखेर बाप्पाला निरोप देताना सर्वांना गहिवरून आले.

मुरुडमध्ये रांगोळ्यांच्या पायघड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : एक दोन तीन चार... गणपतीचा जयजयकार... गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर... अशा जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम-झांज वादनाच्या झंकारात, रंगीबेरंगी फटाक्यांची आसमंतात उधळण करीत मंगलमय वातावरणात भक्तांनी परिसरातील १७९० बाप्पाला निरोप दिला. मुरुडनगरीत रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. सकारात्मक ऊर्जा व आनंद देणाºया गणरायाला निरोप देताना गणेशभक्त हळवे झाले असले तरी त्यांच्या जल्लोषाला उधाण आले होते.

म्हसळ्यातील ४५ बाप्पांना निरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : शहरासह गौळवाडी येथील ४५ गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात परिसर दुमदुमला होता. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने विसर्जनासाठी नद्यांमध्ये पाणी खूपच कमी होते. हिंगुळडोह येथे या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय कर्णिक यांनी विसर्जन घाटापर्यंत विजेची पुरेशी व्यवस्था केल्याने भक्तांना काहीही अडचण निर्माण झाली नाही. तहसीलदार रामदास झळके,पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: Raigad Ganesh Visarjan News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.