अतिवृष्टीमुळे खचतोय वेळास-आदगाव रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:04 AM2019-07-16T00:04:19+5:302019-07-16T00:04:28+5:30
वेळास - आदगाव मार्गावरील रस्ता खचत जात असल्याचे दिसते.
गणेश प्रभाळे
दिघी : तालुक्यातील वेळास - आदगाव मार्गावरील रस्ता खचत जात असल्याचे दिसते. सध्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याला पाच इंच साइडपट्टी राहिल्याने या खड्ड्यांत दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने याची त्वरित दखल घेण्याची मागणी होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन दृष्टिकोनातून प्रमुख असे समुद्रकिनारे विशेषत: प्रसिद्धीस आले आहेत. त्यामध्ये श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, कोंडविल या किनाऱ्यांचा समावेश आहे. त्यातच, वेळास व आदगाव समुद्रकिनारा देखील पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. कारण या समुद्र किनाºयाचे वैशिष्ट्य म्हणजे हा खडकाळ समुद्रकिनारा आहे. खडकावर आपटणाºया सागरलाटा पर्यटकांस आकर्षित करतात. त्यामुळे पावसाळी पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांचीही गर्दी या ठिकाणी होते. दिवेआगरहून मुरुड जंजिºयाकडे जाताना दिघी रस्त्याला अलीकडेच वेळास फाटा येथून दोन कि.मी.वर हा समुद्रकिनारा आहे. या किनाºयालगत रस्त्याला पावसाळी हंगामात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. मात्र, सद्यस्थितीत वेळास - आदगाव या मार्गावर संरक्षण भिंत नसल्याने हा रस्ता खचण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
वेळासपासून आदगाव हा मार्ग पूर्ण समुद्रालगत आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्हसारखे आकर्षण या ठिकाणी दृष्टिक्षेपात येते. विस्तीर्ण समुद्र किनारा असल्याने पर्यटक देखील या ठिकाणी भेट देतात. रस्त्यालगत समुद्र धूपप्रतिबंधक बंधारा आहे मात्र, तोही काही अंतराचा आहे. समुद्राच्या जोरदार लाटांमुळे रस्त्याची आणखी दुर्दशा होत आहे. जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण पडण्याची भीती आहे. वेळीच दुरुस्ती झाली नाही तर वेळास व आदगाव या दोन्ही गावांचा संपर्क तुटू शकतो. आदगावकडे जाणाºया मार्गातून प्रवास करताना वाहन चालकाला रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा पाच ते सहा फूट खोल असताना त्याच खड्ड्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेवरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अनर्थ घडू शकतो. यामुळे चालक, प्रवाशांकडून संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
।सूचना फलक नाही
सागरी मार्ग म्हटल्यावर समुद्राची भरती ओहोटी लाटांचा मारा या गोष्टी लक्षात घेतल्यास रस्त्याची वारंवार करावी लागणारी देखभाल न झाल्याने वेळास-आदगाव रस्ता पूर्णपणे खचला आहे. मुख्य जिल्हा मार्ग असल्याने रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे.
विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना या रस्त्याची कल्पना असून देखील तात्काळ दुरुस्ती किंवा धोकादायक सूचना फलक लावले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही दिवसातच पडणाºया पावसामुळे साइडपट्टी खचलेल्या ठिकाणी रस्ता खचला आहे. रस्त्याची दुरुस्ती होवून संरक्षक कठड्यांची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
>अपघाताची जास्त शक्यता
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणारा हा रस्ता वेळास ते आदगाव हा तीन किलोमीटर अंतराचा रस्ता असून रस्त्याच्या कडेला खोल खड्डे आहेत. समोरून येणाºया वाहनांना साइडपट्टी खचल्यामुळे एकमेकांची धडक लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यालगत संरक्षक कठडे तेही पूर्ण मोडकळीस आल्याने व साइडपट्टी खचल्याने वाहन खड्ड्यात पडून दुर्घटना होऊ शकते. वाहनचालकांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून वाहने चालवावी लागत आहेत. काही दिवसातच मुसळधार पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
>वेळास येथील खचलेल्या रस्त्यावर दरवर्षी सार्वजनिक बांधकाम खाते माती टाकून भराव करते. मात्र, पावसाळ्यात पुन्हा पुन्हा रस्ता खचतो. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कायमस्वरूपी संरक्षण भिंतीसह पक्के रस्ते व्हावे.
- धवल तवसालकर,
ग्रामस्थ, वेळास
वेळास - आदगाव रस्त्याला ७०० ते ८०० मीटर लांबीची संरक्षण भिंत होण्यासाठी वरिष्ठांना पत्रक दिले आहे. सध्या उपाययोजना करण्यात येईल.
- श्रीकांत गनगणे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन.