भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घातले- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:49 AM2019-01-24T04:49:11+5:302019-01-24T04:49:22+5:30

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घालण्याचे काम केले आहे.

BJP-Shiv Sena Government mobilized Maharashtra: Ashok Chavan | भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घातले- अशोक चव्हाण

भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घातले- अशोक चव्हाण

Next

महाड : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घालण्याचे काम केले आहे. या सरकारच्या अपयशाविरोधात काँग्रेसने संघर्षाचा अग्नी पेटविला आहे. आता महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-सेनेचे हे सरकार चुलीत घालण्याचे काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या महाड येथील सभेत ते बोलत होते. या सभेला काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. आझाद मैदान अपुरे पडल्याने हजारो लोकांना मैदानाबाहेर उभे राहावे लागले.
या वेळी चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात टीकास्त्र सोडले. शेतकरी कर्जमाफी असो, महिला सुरक्षा असो, नोटाबंदी असो, जीएसटी, गंगा स्वच्छता असो, या सर्व आघाड्यांवर सरकार फेल झाले आहे. देशातील जनता आता ‘अब की बार बस कर यार’ असेच म्हणते. चाय आणि गाय म्हणणाऱ्यांना आता बाय म्हणायची वेळ आल्याचे ते म्हणाले.
या सभेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान, काँग्रेसचे कोकण विभागाचे निरीक्षक बी. एम. संदीप, खासदार हुसैन दलवाई, आ. सुभाष चव्हाण, आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माणिक जगताप आदी पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसिम खान यांनी खोटे बोला आणि रेटून बोला हेच या सरकारचे धोरण असल्याची टिका केली. ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला कोकणाचा प्रदेश या सरकारने विकासापासून वंचित ठेवला आहे. या देशाची घटना बदलण्याचा त्यांचा डाव आहे. हा डाव हाणून पाडायचा आहे, असे आवाहन खान यांनी केले.
माजी आमदार माणिक जगताप यांनी शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष म्हणजे दोन बोके आहेत. सत्तेसाठी त्यांचे भांडण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आज कोकणात कोणत्याही पक्षात असलेला कार्यकर्ता हा मूळचा काँग्रेसचाच आहे. प्रदेश काँग्रेसने आम्हाला साथ द्यावी, संपूर्ण कोकण आम्ही काँग्रेसमय करू, अशी ग्वाही त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिली.
>‘महिलाच सरकार उलथवतील’
आमदार भाई जगताप यांनी भाषणात, काँग्रेस सरकारच्या काळात सिलिंडरचे दर चारशे, साडेचारशे रुपये झाल्यानंतर आंदोलने करणाºया स्मृती इराणी, हेमामालिनी, सुषमा स्वराज आज सिलिंडरचे दर ९६० रुपयांवर गेले असताना गप्प का? असा प्रश्न त्यांनी केला. या महागाईविरोधात आता महिलाच रस्त्यावर उतरल्या असून, त्याच हे सरकार उलथवून टाकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बुधवारी दुपारी १२च्या सुमारास या जनसंघर्ष यात्रेचे महाडमध्ये आगमन झाले. नांगलवाडी फाटा येथून युवक काँग्रेसच्या ५०० बाइक्सच्या रॅलीत ही यात्रा महाड शहरात आली. त्यानंतर, छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.
त्यानंतर, ही रॅली शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक- दस्तुरी नाका मार्गे चवदार तळ्यावर गेली. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

Web Title: BJP-Shiv Sena Government mobilized Maharashtra: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.