आठ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८५ % मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 02:08 AM2019-06-24T02:08:37+5:302019-06-24T02:08:58+5:30

रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि १३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले.

85% polling for eight Gram Panchayats | आठ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८५ % मतदान

आठ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८५ % मतदान

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि १३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६८.६५ टक्के मतदान झाले होते. रात्री उशिरापर्यंत मतदानाची सरासरी घेण्याचे काम सुरू होते. त्यामुळे सुमारे ८५ टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अलिबाग तालुक्यातील चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीमधील ३३ जागांसाठी ६७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
काही तुरळक प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सोमवारी संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. निकालानंतरच कोणत्या उमेदवारांचे राजकीय नशीब फळफळणार आहे हे समोर येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला रविवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरुवात झाली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांसह वृद्धांनी मतदान केंद्रावरती गर्दी केल्याचे दिसून आले. शेकाप आणि चेंढरे परिवर्तन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. मात्र, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सोमवारी साधारणत: १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पुढील तीन तासांत संपूर्ण जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मतदान प्रक्रि या शांततेत होण्यासाठी पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात पाच अधिकाऱ्यांसह ५७ कर्मचारी आणि एक स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आली होती.
अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाºया चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये ३.३० वाजेपर्यंत ५७.०३ टक्के मतदान झाले तर वरसोलीत ६३.१० टक्के मतदान झाले. चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी दोन उमेदवारांमध्ये लढत झाली. दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये राजकीय पक्षांनी सुरुवातीपासूनच निवडणूक प्रतिष्ठेची केली
होती.
दरम्यान, १३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७६.६६ टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

वडखळ पंचायत समिती गणासाठी ५८ टक्के मतदान


पेण : पंचायत समिती वडखळ गण निवडणुकीसाठी रविवारी १३ हजार ९०९ मतदारांपैकी दुपारी ४.०० वाजेपर्यंत ३,४५० महिला तर ३,५४९ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अशाएकूण ६,९९९ मतदारांनी हक्क बजावला. त्याची टक्केवारी ५०.३५ टक्के इतकी आहे. मतदान संपेपर्यंत ५८ टक्के मतदान होण्याची शक्यता असून आघाडी विरुद्ध युती अशी ही चुरशीची लढत आहे.
वडखळ पंचायत समिती गण पोट निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे भाजपचे उमेदवार प्रथमेश जांभळे विरुद्ध शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप म्हात्रे यांच्यात ही लढत असल्याने व दोन्ही उमेदवारांना राजकीयदृष्ट्या वारसा लाभल्याने ही लढत प्रतिष्ठेची ठरली आहे. वडखळ, बोरी, मसद, शिर्की, उंबर्डे या पाच ग्रामपंचायतीचा समावेश या गणात असून एकूण १३९०९ मतदार या वडखळ पंचायत समिती गणात आहेत. सरासरी ५८ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. रावे ग्रामपंचायत सरपंच निवडणूक ६५ टक्के मतदान झाले. रावे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले. सोमवारी निकाल घोषित करण्यात येणार आहे, त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.


चेंढरे ग्रामपंचायतीत राजकीय संघर्ष


अलिबाग : तालुक्यातील चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. चेंढरे ग्रामपंचायतीवर विजय मिळवण्यासाठी शेकाप आणि चेंढरे परिवर्तन विकास आघाडी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू होते. गेले काही दिवस शांततेमध्ये सुरू असलेल्या प्रचाराला शनिवार आणि रविवारच्या घटनेने गालबोट लागले. विकास आघाडीमधील आपापसातील मतभेद आणि शेकापसोबतचा संघर्ष उफाळून आल्याने तणावाचे वातावरण होते.
चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये शेकापला सत्तेतून खाली खेचण्यासाठी शिवसेना, भाजप आणि दत्ता ढवळे गट यांनी एकत्र येत चेंढरे परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली, त्यामुळे या ठिकाणी शेकाप विरोधात विकास आघाडी अशी सरळ लढत होत आहे. सुरुवातीपासूनच दोन्हीकडून प्रचाराचे रान चांगलेच पेटवण्यात आले होते. विविध राजकीय पक्ष, गट एकत्र येऊन आघाडी केली जाते. त्यामुळे प्रत्येकाचे रुसवे-फुगवे संभाळताना आघाडीतील सर्वांचीच दमछाक झाली. आघाडीमध्ये प्रत्येकाच्या मनाप्रमाणे घडणारे नसल्यानेच शनिवारी आघाडीतील संघर्ष चव्हाट्यावर आला. भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते आणि आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्यात वाद झाला. प्रकरण यावरच थांबले नाही, तर धक्काबुक्कीही करण्यात आली. मात्र, त्यानंतर काही कालावधीत अ‍ॅड. मोहिते आणि पाटील यांनी वाद मिटल्याचे सांगत एकमेकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर
केला.
अ‍ॅड. मोहिते आणि शेकापचे सवाई पाटील यांच्याही एका राजकीय पोस्टमुळे वाद झाल्याचे बोलले जाते. अ‍ॅड. मोहिते यांनी शेकापच्या बाबतीमध्ये पोस्ट टाकली. त्यावर कमेंटमध्ये सवाई पाटील यांनी प्रतिउत्तर केले. त्यानंतर रविवारी सकाळी चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील संत रोहिदास नगर येथे अ‍ॅड. मोहिते आणि सवाई पाटील यांच्यात वाद झाला. प्रकरण हाताबाहेर जाण्याआधीच ते मिटले.

चर्चा रंगली

दोन्ही घटना या राजकीय असल्याने अलिबागमध्ये वाºयासारख्या पसरल्या. शनिवार आणि रविवारच्या घटनेची चर्चा चांगलीच रंगली होती. या दोन्ही घटनेची नोंद पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: 85% polling for eight Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.