राष्ट्र सेवा दल पर्यायी माध्यमं बनू शकेल : डॉ. गणेश देवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 07:00 AM2019-06-16T07:00:00+5:302019-06-16T07:00:06+5:30
ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांची राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबददल लोकमत ने त्यांच्याशी संवाद साधला.
- नम्रता फडणीस
* राष्ट्र सेवा दलाची निर्मिती झाली तो काळ आणि आजचा काळ यात फरक जाणवतोय का?
- तो काळ असा होता की खेड्यापाड्यातील मुलं नुकतीच शाळेत जायला लागली होती. आधुनिकतेबद्दलची भारतातील लोकांची कल्पना ही विशिष्ट प्रकारची होती. आज संपूर्ण सामाजिक उलथापालथ होऊन शहर व खेड्यांचे स्वरूप बदलले आहे. सामाजिक तज्ञ म्हणतात की दर बारा वर्षांनी तरूणपिढी बदलते. त्यांची अभिरूची बदलते त्याप्रमाणे राष्ट्र सेवा दलात 100 वर्षात 6 वेळा बदल व्हायला हवे होते ते आता ह्यओव्हरड़्यूह्ण आहेत.
* राष्ट्र सेवा दलासमोरची आव्हाने कोणती?
-ज्या माध्यमात राष्ट्र सेवा दल काम करीत आले ती एकेक माध्यमं एकेकाळी उपयोगी मानली जात. आज ती बदलली आहेत. 1950-60 च्या दशकात माध्यमं बहुतांशी स्वतंत्र होती. जी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जात होती. परंतु आज माध्यमांना सत्ताकेंद्राने मारून टाकले आहे. अशा वेळी एक पयार्यी माध्यम शोधायला हवं. ही गरज पूर्ण करणारी राष्ट्र सेवा दलासारखी दुसरी संस्था डोळ्यासमोर दिसत नाही. ह्यराष्ट्र सेवा दलह्ण हे पयार्यी माध्यमं बनू शकतं.
* तुम्ही कोणत्या मुद्यांवर भर देऊन काम करणार आहात?
- भारतात इतक्या वर्षातही एका गोष्टीचं महत्व घटलेले नाही ते म्हणजे ह्यअस्पृश्यताह्ण. अक्कलकोट जवळच्या गावांमध्ये आजही अस्पृश्यता बघायला मिळते. हॉटेलमध्ये पिण्याची भांडी वेगळी ठेवलेली असतात. जातीनुसार जेवण्याच्या थाळ्या वेगळ्या असतात. महाराष्ट्राचा अस्पृश्यतेचा रिपोर्ट वाचला की ती वाढतच चालल्याचे दिसते. इतके कायदे होऊन, महान व्यक्तींनी आंदोलनं करूनही ही स्थिती आहे. साने गुरूजी, छत्रपती शाहू, महात्मा फुले यांचे अर्धवट राहिलेले काम राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे.
* राष्ट्र सेवा दलाची पुढची वाटचाल कशी राहिल?
- राष्ट्र सेवा दलाचे काम हे राजकीय पक्षाचे नाही. दलाचे काम ज्या समाजातून पक्ष निर्माण होतात तिला ठीक करण्याचे आहे. आजही जुन्या विकृतींची नवी रूपं समोर आलेली दिसतात. धार्मिक, जातीय भेदभाव या सर्व विषयांवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. लोकशाहीला मानणारा सुदृढ समाज कसा निर्मित होईल, या दृष्टीकोनातून सेवा दल पुढे वाटचाल करेल. राष्ट्र सेवा दल जर प्रतिरोधी भूमिका घेऊन जगत राहिला तर समाजाच्या आणि सेवा दलाच्या दृष्टीने ते हिताचे राहाणार नाही. यासाठी प्रगल्भ विचार निर्मितीसाठी आवश्यक कार्यक्रम हाती घेतले जातील.
------(समाप्त)-----