कृषीव्यवस्था आणि तिचा विकास शाश्वत ठेवणे आव्हानात्मक : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 06:19 PM2018-06-21T18:19:21+5:302018-06-21T18:19:21+5:30

शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता: व्यंकय्या नायडू  

It is challenging to keep agriculture devlopment sustainable : Vice President Venkaih Naidu | कृषीव्यवस्था आणि तिचा विकास शाश्वत ठेवणे आव्हानात्मक : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  

कृषीव्यवस्था आणि तिचा विकास शाश्वत ठेवणे आव्हानात्मक : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  

Next
ठळक मुद्देकृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर चर्चासत्राचे उदघाटनशाश्वत शेतीसाठी शेती आणि शेतकऱ्यांसमोर मार्केट लिंकेज हे सगळ्यात मोठे संकट

पुणे : देशातील शेतीशी संबंधित उद्योगांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी विचार केल्यास आलेख उंचावत आहे. मात्र, दुसरीकडे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, उद्योगपतीचा मुलगा उद्योगात लक्ष घालतो. याउलट शेतक-याचा मुलगा शेतीव्यवसायाकडे वळताना दिसत नाही. या परिस्थितीमुळेच भविष्यात कृषीव्यवस्था व तिचा विकास शाश्वत ठेवणे आव्हानात्मक होणार आहे,  असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी व्यक्त केले. पायाभुत सुविधा, गुंतवणूक, विश्वासार्हता आणि सिंचन या चतुसुत्रीचा अवलंब केल्यास परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
  वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये आयोजित कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर बनविण्याविषयी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन, एस. के. पट्टनायक, आय. व्ही. सुब्बा राव, टी. चटर्जी, आंध्रप्रदेशचे माजी कृषीमंत्री व्ही.  राव, अशोक गुलाटी आदी मान्यवर  उपस्थित होते. यावेळी  डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी ’’ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरइव्हर  ‘‘या विषयावर सादरीकरण केले.  
नायडू म्हणाले,  शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. विपणन व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच फळे, भाजीपाला, मसाले, डाळी, आणि ऊस यांसारख्या उच्च मूल्यांच्या पिकाची लागवड करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. उत्पादन वाढीबरोबरच आपल्याला अन्नधान्याच्या कार्यक्षम वितरणाची गरज आहे. शेतक-यांना पीक पध्दती, कापणीनंतरची प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी अधिक लोकाभिमुखपणे काम करावे.  शेती क्षेत्र सुधारण्यासाठी काही अर्थपूर्ण आणि व्यावहारिक उपाय शोधून सध्याच्या धोरण व कार्यक्रमांचे सुसूत्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. 
फडणवीस म्हणाले,  पावसाच्या अनियमिततेमुळे कृषी क्षेत्रावर मोठा ताण येतो. जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून या समस्येवर मात करता येते. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही शास्त्रशुद्ध प्रक्रीया असणारी चळवळ आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक खेडी जलस्वयंपूर्ण झाली आहेत. शेकडो गावे पाणीदार झाली असून त्याठिकाणी संरक्षीत  सिंचन शेतीसाठी उपलब्ध झाले आहे. शाश्वत शेतीसाठी शेती आणि शेतकऱ्यांसमोर मार्केट लिंकेज हे सगळ्यात मोठे संकट आहे. कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. छोटी जमीनधारणा ही सुध्दा शाश्वत शेतीसमोरील मोठी समस्या आहे. शासन गट शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध योजना आखण्यात आल्या आहेत.
नोटाबंदीचा शेती व्यवसायावर प्रतिकुल परिणाम
शरद पवार म्हणाले, नोटाबंदीच्या काळानंतर शेतीव्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला. त्याचा फटका इतर व्यवसायांना देखील बसला. कौशल्यपूर्ण ज्ञानाचा उपयोग करुन आता शेतीव्यवसायात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहेत. यापुढील काळात शेतीव्यवसायाशी संंबंधित धोरण ठरविताना बाजारपेठेचा विचार करण्याची गरज आहे.  पाणी या शेतीव्यवसायातील सर्वाधिक महत्वाचा घटक असून भविष्यात त्याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने झाल्यास अनेक प्रश्न सुटतील. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील अभिनव कृषीविषयक प्रयोगांची माहिती त्यांनी दिली. 

Web Title: It is challenging to keep agriculture devlopment sustainable : Vice President Venkaih Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.