किवी, पपईचा केवळ मार्केटिंग फंडा, डेंग्यूला घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 03:08 AM2019-03-23T03:08:28+5:302019-03-23T03:09:54+5:30

डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर किवी हे फळ किंवा पपईच्या पानांचे सत्व घेण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण हा केवळ मार्केटिंगचा फंडा असून या फळांमुळे प्लेटलेट्सवर फारसा परिणाम होत नाही.

do not be afraid of dengue - doctor | किवी, पपईचा केवळ मार्केटिंग फंडा, डेंग्यूला घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन

किवी, पपईचा केवळ मार्केटिंग फंडा, डेंग्यूला घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन

Next

पुणे - डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर किवी हे फळ किंवा पपईच्या पानांचे सत्व घेण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण हा केवळ मार्केटिंगचा फंडा असून या फळांमुळे प्लेटलेट्सवर फारसा परिणाम होत नाही. तसेच डेंग्यूला घाबरून जाण्याची गरज नाही. पुरेशी विश्रांती, सकस आहार व भरपूर पाणी यामुळे डेंग्युला रोखणे शक्य आहे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.

पूना सिटीजन डॉक्टर फोरम (पीसीडीएफ) आणि सार्थक वेलफेअर फाउंडेशनतर्फे ‘डेंग्यू : समज व गैरसमज’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र शाखेचे नियोजित अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. भरत पुरंदरे यांनी सहभाग घेतला. यावेळी ‘पीसीडीएफ’च्या समन्वय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अरुण गद्रे, आनंद आगाशे, रवींद्र गोरे, सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर स्वाती नामजोशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अनंत फडके यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

डॉ. भोंडवे म्हणाले, तीव्र ताप आणि अंगदुखी हे डेंग्यूचे लक्षण आहे. पण यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही. मागील १० वर्षांत माझ्याकडे आलेला एकही रुग्ण डेंग्यूमुळे दगावलेला नाही. त्यामुळे डेंग्यूला घाबरण्याची अजिबात गरज नाही. केवळ प्राथमिक औषधोपचाराने ९० टक्के रुग्ण बरे होतात.
काही रुग्ण भीतीमुळे रुग्णालयात भरती होण्याचा आग्रह करतात. आयुर्वेद हे चांगले शास्त्र असले तरी काही बाबींचे केवळ मार्केटिंग केले जात आहे.

प्लेटलेट्सला अवास्तव महत्त्व
प्लेटलेट्सला अवास्तव महत्त्व दिले जात असल्याचे डॉ. पुरंदरे यांनी स्पष्ट केले. प्लेटलेट्स कमी होणे हे डेंग्यूचे लक्षण असले तरी त्यामुळे लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. सामान्यपणे प्लेटलेट्सची संख्या दहा हजार होईपर्यंत आम्ही बाहेरून प्लेटलेट देण्याचा सल्ला देत नाही. त्याचे आयुष्य १-२ दिवसाचेच असते.
योग्य आहार, भरपूर पाणी, विश्रांती आणि औषधोपचारामुळे प्लेटलेट्स वाढतात. पण प्लेटलेट्स जर एकाच दिवशी ५० हजाराने कमी होत असतील तर चिंतेची बाब आहे. रुग्ण दगावण्यामागे काहीवेळा इतर आजारही कारणीभुत ठरतात. डेंग्यू हे केवळ निमित्त असते. पपईमुळे प्लेटलेट्सचे प्रमाण काही प्रमाणात वाढत असले तरी ते योग्य आहार घेतल्यानेही वाढते.

डॉक्टर सांगतात...
डेंग्यूला घाबरू नका
विश्रांती, आहार व भरपूर पाणी घ्या
अ‍ॅन्टीबायोटिक
घेण्याची गरज नाही

डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार, तपासण्या करा
९० टक्के पेशंट नियमित औषधाने होतात बरे
प्लेटलेट्सला
अवास्तव महत्त्व नको

Web Title: do not be afraid of dengue - doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.