राज्यातील १४ मतदारसंघांसह देशात ११७ जागांवर आज होणार ‘टफ फाइट’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 06:16 AM2019-04-23T06:16:12+5:302019-04-23T06:16:57+5:30

देशभरात १,६१२ उमेदवार : सुमारे १९ कोटी मतदार ठरविणार भवितव्य

Tough fight will be held in 117 seats in the country including 14 constituencies. | राज्यातील १४ मतदारसंघांसह देशात ११७ जागांवर आज होणार ‘टफ फाइट’

राज्यातील १४ मतदारसंघांसह देशात ११७ जागांवर आज होणार ‘टफ फाइट’

googlenewsNext

नवी दिल्ली/मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य उद्या, मंगळवारी ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. भाजपची फाइट बऱ्याच ठिकाणी काँग्रेसप्रणित आघाडीशी तर काही ठिकाणी माकप, तसेच प्रादेशिक पक्षांशी असेल.

मतदानाच्या तिसºया टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान होणार असून, त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. यात मंत्री गिरीश बापट, सुजय विखे-पाटील, तसेच राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आदी दिग्गज रिंगणात आहेत. या टप्प्यात १९ महिला उमेदवार रिंगणात असून, सर्वाधिक ४ महिला बारामतीतून भाग्य आजमावत आहेत. पुणे व बारामतीमध्ये प्रत्येकी ३१ उमेदवार आहेत. या टप्प्यासाठी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अनेक सभा घेतल्या. २0१४ साली या ११७ पैकी ७१ जागा भाजपप्रणित रालोआने जिंकल्या होत्या. त्या कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. गुजरातच्या सर्व २६ व केरळमधील सर्व २0 जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे. उद्या मतदानामुळे कर्नाटकातील मतदानही पूर्ण होईल. केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी प्रथमच निवडणूक लढवत असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील ज्या १४ ठिकाणी मतदान होणार आहे, त्यातील ६ जागा २0१४ साली भाजपने जिंकल्या होत्या. शिवसेनेला तीन, राष्ट्रवादीला चार तर एक स्वाभिमानीला मिळाली होती. भाजप-शिवसेना युतीला ज्या ९ जागा मिळाल्या होत्या. त्यात यंदा वाढ होणार की असलेल्यापैकी काही जागा विरोधकांकडे जाणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. गेल्या वेळी येथील एकही जागा काँग्रेसने जिंकली नव्हती.
मावळ मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू पार्थ पवार व बारामतीतून कन्या सुप्रिया सुळे रिंगणात असल्याने या जागा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. मावळची जागा गेल्या वेळी शिवसेनेला मिळाली होती. ती आपल्याकडे यावी, यासाठी राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. बारामतीत अमित शहा यांनी भाजपसाठी सभा घेतली आणि पवार घराण्याला उखडून टाकण्याची घोषणा केली. तिथे सुप्रिया सुळे यांनी मोठ्या मताधिक्याने निवडणून यावे, असे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत.

माढामधून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याऐवजी संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यामुळे विजयसिंह यांचे पुत्र रणजीतसिंह थेट भाजपमध्ये गेले. पंतप्रधान मोदी यांनी माढाधील जाहीर सभेत व्यासपीठावर स्वत: विजयसिंहही दिसले. त्यामुळे माढा स्वत:कडे ठेवण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. अहमदनगरमधून काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळणे शक्य नाही आणि ती जागा राष्ट्रवादीला जाणार, हे स्पष्ट होताच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपची वाट धरली आणि तेथून उमेदवारीही मिळवली. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही आणि काँग्रेसने त्यांना बोलावलेही नाही.

शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील चौदा जागांपैकी ७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी दोन ठिकाणी पवार कुटुंबातील आहेत. त्यामुळे शरद पवारांची जादू किती चालते, हे या टप्प्यातील निवडणुकीतून दिसून येईल.

२०१४ची स्थिती
रालोआ : ७१
भाजप : ६७, शिवसेना : ३, लोजपा : १
संपुआ : १८
कॉँग्रेस : १२, राजद : २, राष्टÑवादी : ४
इतर :२८
सपा : २, बीजद : ६, माकपा : ७, भाकप : १, आरएसपी : १, पीडीपी : १, तृणमूल : १, एआययूडीएफ : २, मुस्लीम लीग : २, अपक्ष : ५

२ केंद्रशासित प्रदेश,
१३ राज्ये, ११७ जागा
आसाम (४), बिहार (५), छत्तीसगड (७), गुजरात (२६), गोवा (२), जम्मू-काश्मीर (१), कर्नाटक (१४), केरळ (२०), महाराष्टÑ (१४), ओडिशा (६), त्रिपुरा (१), उत्तर प्रदेश (१०), पश्चिम बंगाल (५), दादरा नगर हवेली (१), दमण आणि दीव (१).

यांच्या भवितव्यावर आज मतदारांचा निर्णय
राहुल गांधी । वायनाड
अमेठी या आपल्या नेहमीच्या मतदारसंघाबरोबरच केरळमधील वायनाड मतदारसंघातून कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे निवडणूक लढवित आहेत.
जमेची बाजू : सलग दोनदा येथून कॉँग्रेसने विजय मिळविला आहे. भाजपचे येथे अस्तित्व नसल्याने भाजपने हिंदुत्ववादी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
आव्हान कोणाचे : डाव्या आघाडीचे पी. पी. सुनीर यांनी आव्हान दिले आहे. बसप, सोशल डेमॉक्रेटिक पार्टी आॅफ इंडिया, भाजपचा पाठिंबा असलेली भारत धर्म जन सेना, तसेच अन्य पक्षांचे व १४ अपक्ष उमेदवारही आहेत.

अमित शहा । गांधीनगर
गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून यावेळी भाजप
अध्यक्ष अमित शहा हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी निवडणूक लढवित आहेत.
जमेची बाजू : हा मतदारसंघ १९९६ पासून सातत्याने भाजपच्या ताब्यात आहे. शहा हे यापूर्वी विधानसभेमध्ये सरखेज येथून निवडून आले होते. हा मतदारसंघ गांधीनगर लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे शहा यांचा संपर्क, भाजपच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे.
आव्हान कोणाचे : कॉँग्रेसचे आमदार सी. जे. चावडा मैदानात आहेत.

मुलायमसिंह यादव । मैनपुरी
उत्तर प्रदेशचा मैनपुरी मतदारसंघ हा समाजवादी पार्टीचा गड आहे. यावेळी ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव हे उमेदवार आहेत. 
जमेची बाजू : चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या विरोधात कॉँग्रेसने उमेदवार उभा केलेला नाही.
आव्हान कोणाचे : भाजपने येथून प्रेम सिंह शाक्य यांना निवडणूक मैदानामध्ये उतरविले आहे.

Web Title: Tough fight will be held in 117 seats in the country including 14 constituencies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.