एकतर्फी वाटणारी लढत अखेर झाली दुरंगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:30 AM2019-04-16T04:30:02+5:302019-04-16T04:30:25+5:30

सातारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातच मुख्य लढत होत आहे.

The one-off fight ended at the end of the run udayan raje | एकतर्फी वाटणारी लढत अखेर झाली दुरंगी

एकतर्फी वाटणारी लढत अखेर झाली दुरंगी

- दीपक शिंदे
सातारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातच मुख्य लढत होत आहे. दोघांच्याही हटके स्टाईलचीच मतदारांमध्ये जास्त चर्चा आहे. त्याबरोबरच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे. उदयनराजे यांनी नरेंद्र मोदींवर टाकी केली आहे. कधी-कधी ते नरेंद्र पाटील यांच्या फर्राटेदार मिशी आणि माथाडी कामगारांवरील अन्यायावरही बोलतात. तर नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे यांनी गेल्या दहा वर्षांत दहशतीचे राजकारण केले, जिल्ह्याचा विकास केला नाही, उद्योग आणले नाहीत. त्यामुळे आता लोकांनी नवीन पर्याय निवडला पाहिजे, असे आवाहन करतात.
जिल्ह्याच्या एका भागात प्रचंड पाऊस पडतो, तर दुसरीकडे दुष्काळ, जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होत नाही. कोयना, उरमोडी, धोम - बलकवडी या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्यातील तरुण युवक पुणे आणि मुंबईकडे वळू लागले आहेत. नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी काही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि स्थानिकांना गावातच रोजगार मिळला, तर उमेदवारांना मते मागायला मतदारांनाकडे याचना करावी लागणार नाही.


सध्या केवळ एकमेकांवर आरोप करून आता मला निवडून द्या, मी तुमच्यासाठी नक्की काम करतो, असे म्हणून काहीच उपयोग होताना दिसत नाही. खासदार उदयनराजेंसाठी सुरुवातीच्या टप्प्यात ही निवडणूक अगदी सहज सोपी होती. फारसा तगडा उमेदवार नसल्याने उदयनराजेंनी मागील दोन निवडणुकांत चांगले मताधिक्य घेतले, पण यावेळी स्वत: उदयनराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अपार मेहनत घ्यावी लागत आहे. नरेंद्र पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचारासाठी चांगली यंत्रणा उभी केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजेंसोबत असले, तरी मनाने अजूनही मदत करताना दिसत नाहीत. प्रत्येक जण आपली विधानसभेची तयारी या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहत आहे.

>गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात विविध विकास कामे केली आहेत. पुढील काळातही जिल्ह्यातील अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. केवळ घोषणा करून थांबत नाही, तर प्रत्यक्षात काम केले जाते. विरोधकांना आमची कामे दिसत नाहीत. कारण ते यात्रेपुरते जिल्ह्यात येतात.
- उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी
>गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात कोणतीही कामे झालेली नाहीत. केवळ दहशतीच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. त्यामुळे आता लोकांना विकास हवा आहे. जिल्ह्यात अनेक कामे करण्यासारखी आहेत, पण त्याकडे लक्ष्यच दिले गेले नाही. त्यामुळे या कामांकडे प्राधान्याने पहायला हवे.
- नरेंद्र पाटील, शिवसेना
>कळीचे मुद्दे
जिल्ह्यात दहशतवाद आणि रोजगाराचा प्रश्न आहे, पण याबाबत उपाययोजना उमेदवारांकडून होत नाही.
उमेदवारांनी विकासाच्या मुद्दांवर बोलण्याऐवजी वैयक्तिक आरोपांवर अधिक भर दिला आहे.

Web Title: The one-off fight ended at the end of the run udayan raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.