देश व लोकशाही वाचविण्यासाठी विरोधकांचा एकजुटीचा निर्धार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 06:40 AM2019-01-20T06:40:46+5:302019-01-20T06:42:06+5:30

दंगली व विद्वेष पसरविणाऱ्या, देशातील घटनात्मक संस्था मोडून टाकणा-या मोदी सरकार व भाजपाला धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवे.

Decision to unite opponents to save the country and democracy | देश व लोकशाही वाचविण्यासाठी विरोधकांचा एकजुटीचा निर्धार!

देश व लोकशाही वाचविण्यासाठी विरोधकांचा एकजुटीचा निर्धार!

googlenewsNext

कोलकाता : दंगली व विद्वेष पसरविणाऱ्या, देशातील घटनात्मक संस्था मोडून टाकणा-या मोदी सरकार व भाजपाला धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवे. तसे न केल्यास भाजपा लोकशाहीदेखील पायदळी तुडवेल. त्यामुळे देश व लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून, जनतेनेही दुसºया स्वातंत्र्यासाठी तयार राहावे. औषधांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुदत आता संपली आहे. येत्या लोकसभा निवडणुकांनंतर देशाला नवा पंतप्रधान मिळेल, हे नक्की. तो कोण असेल, याचा विचार नंतर करता येईल, असे सांगत, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर सारे विरोधक प्रथमच एकत्र आले होते. त्यामुळे ही जाहीर सभा २२ विरोधी पक्षांच्या ऐक्याचे दर्शनच होते. परेड ग्राउंडवर ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने झालेल्या सभेला सुमारे ८ लाख लोक हजर होते. भाजपाचे खा. शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह वाजपेयी सरकारधील अरुण शौरी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांनीही मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी नव्हे, तर जनतेचे प्रश्नच अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सिन्हा यांनी केले, तर जीएसटी घाईघाईत लागू केल्याने अर्थव्यवस्था कोलमडल्याची टीका अरुण शौरी यांनी केली. खरे बोलणे ही बंडखोरी असेल, तर होय, मी बंडखोर आहे, असे शत्रुघ्न सिन्हा ठामपणे म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपामुळे लोकशाही धोक्यात आल्याची टीका केली, तर दंगली पसरविण्याचे काम भाजपा करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. शरद पवार यांनी आपल्याला आता राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, असे सांगतानाच, लोकशाही व घटनात्मक संस्था बळकट ठेवण्यासाठी राजकीय परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. देवळांद्वारे भाजपा धार्मिक विद्वेष व तणाव पसरवत असल्याची टीका चंद्राबाबू नायडू यांनी केली. हार्दिक पटेल यांनी ‘सुभाषचंद्र बोस गोºयांशी लढले, तर आता आपल्याला चोरांशी लढायचे आहे, असे उद्गार काढले.
देश अखंड ठेवण्यासाठी मोदी सरकार हटविणे गरजेचे आहे, असे फारुक अब्दुल्ला म्हणाले. देशाला मोदी हुकूमशाहीकडे नेत असून, जनतेने दुसºया स्वातंत्र्यासाठी तयार राहावे, असे स्टॅलिन म्हणाले. गेगांग अपांग व झोराम नॅशनल फ्रंटचे लालडुहावमा यांनी नागरिकत्व विधेयकामुळे ईशान्येकडील राज्ये वेगळी पडत असल्याचा इशारा दिला. रोजगार देण्यातील अपयश, नोटाबंदी व जीएसटीमुळे गेलेल्या नोकºया, अल्पसंख्यांक व दलितांवरील अत्याचार, राफेल घोटाळा, विरोधी सरकारे पाडण्याचा प्रयत्न यांवरूनही या नेत्यांनी टीकेची झोड उठविली.
>व्यासपीठावर नेत्यांची मांदियाळीच
काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे व अभिषेक मनु सिंघवी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, सपाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय लोक दलाचे अजित सिंग, द्रमुकचे एम. के. स्टॅलिन, अलीकडेच भाजपातून बाहेर पडलेले अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग, पाटीदारांचे नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवाणी, बसपाचे नेते सतीशचंद्र मिश्रा, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, आसामच्या युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे बद्रुद्दिन अजमल, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर हल्ला चढविताना, पंतप्रधानपदाबाबत मतभेद नसल्याचा दावा केला.

Web Title: Decision to unite opponents to save the country and democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.