Children's Day : बालपणी तुम्हीदेखील ऐकल्या असतील 'या' धमक्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 03:58 PM2018-11-14T15:58:06+5:302018-11-14T16:28:24+5:30

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. लहान मुले ही अत्यंत निरागस असतात. मात्र मुलांना शिस्त लागावी, त्यांच्या वाईट सवयी बदलाव्या यासाठी बालपणी प्रत्येक आई-वडील मुलांना अनेक गोष्टींची भीती दाखवत असतात किंवा मग धमक्या देत असतात. अशाच काही धमक्यांविषयी जाणून घेऊया.

आपल्या मुलांनी खोटं बोलू नये यासाठी प्रत्येक लहान मुलाला 'खोटं बोललं की देवबाप्पा कान कापतो' अशी धमकी हमखास पालकांकडून दिली जाते.

कधी कधी मुलं बाहेर जाण्याचा खूप हट्ट करतात. त्यावेळी 'बाहेर जाऊ नको, लहान मुलांना पकडायला म्हातारी आलीय' असं सांगितलं जाते.

अभ्यास करायचा कंटाळा हा प्रत्येक मुलाला येतच असतो. त्यावेळी हमखास आई-वडील 'अभ्यास केला नाही तर तुला बोर्डिंगमध्ये पाठवणार' अशी धमकी देतात.

लहान मुलं अनेकदा आई-वडिलांना त्रास देत असतात. तर कधी कधी लवकर झोपत नाहीत त्यावेळी 'लवकर झोप नाही तर राक्षस येईल' अशी धमकी दिली जाते.

फळं खाताना मुलं बिया खाऊ नयेत यासाठी पालक 'फळांच्या बिया खाल्ल्या तर पोटात झाड येतं' असं चिमुकल्यांना सांगतात.

लहान मुलं जेवताना खूप नाटक करतात. टाळाटाळ करतात. त्यावेळी आई-बाबा 'पटापट सगळं जेवण संपवलं नाही तर शक्ती येत नाही' असं सांगतात.

लहान मुलं म्हटली की मस्ती आलीच मात्र काही लहान मुलं खूप मस्ती करतात त्यावेळी मोठी माणसं त्यांना 'जास्त मस्ती केली की देव शिक्षा करतो' हे आवर्जून सांगतात.

खेळताना बच्चेकंपनी सतत धडपडत असते. पडल्यावर काही मुलं पटकन रडायला सुरुवात करतात त्यावेळी आई-बाबा 'पडल्यावर माणूस लवकर मोठा होतो' असं सांगतात.

लहान मुलं कधी कधी पालकांना न सांगता घराबाहेर जातात. त्यामुळे 'अंधारात जाऊ नको बुवा (भूत) पकडेल' असं सांगितलं जातं.