लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या कलांमधून मिळताहेत हे 10 राजकीय संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 12:46 PM2019-05-20T12:46:59+5:302019-05-20T12:58:31+5:30

रविवारी आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता विचारात घेता या कलांमधून काही महत्त्वपूर्ण राजकीय संकेत मिळत आहे. त्यातील काही मह्त्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कितीही टीका होत असली तरी ते देशातील सर्वात प्रबळ नेते म्हणून समोर आले आहेत. त्यांच्यासमोर इतर मातब्बर नेत्यांचा टिकाव लागताना दिसत नाही आहे. त्यामुळे पुढची पाच वर्षेही त्यांचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या आक्रमक राष्ट्रवादासमोर विरोधी पक्ष भुईसपाट झाले. पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या एअर स्ट्राइकमुळे जनतेचा सरकारवरील विश्वास वाढला.

आता लोकसभा निवडणुकीचा निकाल एक्झिट पोलमधील अंदाजांनुसार लागला तर राहुल गांधींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. तसेच ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांचाही प्रभाव पडलेला नाही. त्यामुळे काँग्रेसचा पाया अजून कमकुवत होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये म्हणावे तसे ऐक्य दिसून आले नाही. आता निकालांनंतर भाजपा सक्षमपणे समोर आल्यास विरोधी पक्षांमध्ये फूट पडू शकते. अशा परिस्थितीत कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये काठावरच्या बहुमतावर चालत असलेली काँग्रेस आणि जेडीएसची सरकारे कोसळण्याची शक्यता आहे.

अपवाद वगळता बहुतांश एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशमधील सपा-बसपा आघाडीला फारसे यश मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता हा अंदाज निकालांमध्ये परिवर्तीत झाल्याच सपा आणि बसपामध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम ही महाआघाडी तुटण्यामध्येही होऊ शकतो.

एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार निकाल लागल्यास भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे पक्षामधील स्थान भक्कम होणार आहे. तसेच त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही निष्प्रभ होणार आहेत.

एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतरही भाजपाला भरभक्कम जागा मिळाल्यास भाजपाचे मित्रपक्ष सरकारमध्ये असले तरी त्यांचे स्थान पूर्वीप्रमाणेच राहील. तसेच त्यांना स्वत:च्या नव्हे तर भाजपाच्या अटीशर्तींवर एनडीएमध्ये राहावे लागणार आहे.

एक्झिट पोलमधील कलांनुसार निकाल लागल्यास भाजपा आणि प्रादेशिक पक्षांमध्ये सुरू असलेले मतभेद काही प्रमाणात कमी होती. तसेच काही प्रादेशिक पक्ष भाजपाशी जवळीक साधू शकतात. मात्र पश्चिम बंगालसारख्या राज्यात काय परिस्थिती असेल हे प्रत्यक्ष निकालांनंतरच समजू शकेल.

लोकसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलनुसार लागल्यास त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसणार आहे. काँग्रेसने मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये काठावरच्या बहुमतावर स्थापन केलेली सरकारे अडचणीत येऊ शकतात. तसेच काँग्रेसच्या पक्षविस्तारालाही धक्का बसू शकतो.

भाजपाचा प्रभाव पश्चिम बंगाल आणि ओदिशासारख्या राज्यांमध्ये वाढत असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत आहे. तसेच उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांमध्येही भाजपाने आपला प्रभाव कायम राखला आहे. त्यामुळे या प्रदेशात भाजपाविरोधात असलेले पक्ष कमकुवत होत आहेत.