Lok Sabha Election 2019 : जाणून घ्या, मतदानादरम्यान बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:05 PM2019-03-11T13:05:16+5:302019-03-11T13:28:21+5:30

लोकसभानिवडणूक कधी होणार?, या देशवासीयांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर रविवारी (10 मार्च) मिळालं. लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून मतदान 11 एप्रिल ते 19 मे या काळात सात टप्प्यांमध्ये होणार आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 23 मे रोजी निकाल जाहीर होईल. 16व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून रोजी संपणार आहे. त्यामुळे त्याआधी देशात नवं सरकार स्थापन होईल.

देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि अधिकाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. बनावट मतदानाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने बोटावर लावण्यात येणारी शाई शोधली. या शाईबाबत काही गोष्टी जाणून घेऊया.

निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या शाईमागचे श्रेय देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचे आहे. सुरुवातीच्या काही निवडणुकांमध्ये शाई नाही तर डायचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर शाईचा शोध लावला आणि त्याचा वापर केवळ निवडणुकांमध्ये होऊ लागला.

कागदावर लिहिण्यासाठी शाईचा वापर केला जातो. मात्र निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी शाई ही वेगळी असते. यामध्ये सिल्वर नायट्रेट असते. त्यामुळेच ती शाई जेव्हा बोटावर लावली जाते. तेव्हा त्वचेवर असलेल्या सॉल्टसोबत प्रक्रिया होऊन ती गडद होते.

1962 मध्ये पहिल्यांदा या खास शाईचा वापर करण्यात आला. त्यानंतर ही शाई प्रत्येक निवडणुकीचा महत्त्वाचा भाग झाली. शाईचा डाग 15 दिवसांत पुसट होतो पण तो पूर्णपणे निघून जाण्यास तीन महिने लागतात.

निवडणुकीची ही खास शाई जगातील अनेक देशांमध्ये वापरली जाते. भारताप्रमाणे जवळपास सर्वच देशांत ही जांभळ्या रंगाची शाई वापरली जाते. सुरीनाममध्ये एकदा नारंगी रंगाच्या शाईचा वापर करण्यात आला होता. पण त्यानंतर कधीच तशा शाईचा वापर करण्यात आला नाही.

भारतात ही शाई एकाच ठिकाणी तयार होते. Mysore Paints & Varnish Ltd (MVPL) या कंपनीत तयार होणारी शाई भारतीय निवडणूक आयोगाशिवाय इतर देशांकडूनही खरेदी केली जाते. यात कॅनडा, कंबोडिया, मालदीव, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या देशांचा समावेश आहे. मात्र, कोणत्याही बाजारात ही शाई विकत मिळत नाही.