Kerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 11:30 AM2018-08-18T11:30:25+5:302018-08-18T12:15:14+5:30

मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळमधील पूरप्रकोपात आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख नागरिक बेघर झाले आहेत.

केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने एका दिवसात तब्बल 106 जणांचा बळी घेतला आहे.

जोरदार पावसामुळे आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. केरळमध्ये पुराने थैमान घातले असून, सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये मोदी यांनी केरळला दिली 500 कोटींची तातडीची मदत जाहीर केली.

पुरातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची आणि गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

संततधारेमुळे केरळ राज्याचे कंबरडे मोडले असून, पर्यटन व्यवसायालाही फटका बसला आहे. हजारो एकरातील उभ्या पिकांचे नुकसान झाले असून पायाभूत सुविधांची मोठी हानी झाली आहे.

गॉड्स ओन कंट्री' केरळमध्ये आठवडाभरात थोडाथोडका नव्हे तर साडेतीन पट पाऊस कोसळला आहे. 16 ऑगस्टला दिवसाच्या सरासरीच्या तब्बल दहापट अधिक पाऊस कोसळल्याने हाहाकार माजला आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य सर्वच राज्यांकडून मदत मागितली आहे. या आवाहनानंतर, स्टेट बँकेनं २ कोटी रुपयांची मदत दिली आहे. अन्य कंपन्या आणि संस्थाही केरळमधील पूरग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलण्यास पुढे सरसावल्या आहेत.

आठवडाभर कोसळणाऱ्या पावसाने राज्य पार कोलमडून गेलं असतानाच, 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आयटीबीपीचे जवान पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.

तिन्ही संरक्षण दले तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान केरळमध्ये मदतकार्यात गुंतले आहेत. तिथे लष्कराच्या १२ तुकड्या तर नौदलाच्या ४२ तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करीत आहेत.

पुराच्या पाण्यामुळे घरांच्या गच्च्यांवर अडकून पडलेल्या असंख्य लोकांची सुटका करण्याचे काम या मदतपथकांनी हाती घेतले आहे.

पूरात अडकलेल्या लोकांना संरक्षण बोटीतून तसेच संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी हलविले जात आहे.