Indian Air Strike on Pakistan: 21 मिनिटं, 12 मिराज, 1000 किलोचे बॉम्ब अन् 300 दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 08:07 PM2019-02-26T20:07:07+5:302019-02-26T20:19:36+5:30

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना अवघ्या 100 तासांमध्ये यमसदनी पाठवल्यानंतर आज भारतीय सैन्यानं मोठी कारवाई केली. हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडत बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी भागात बॉम्बफेक केली.

मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान भारतीय हवाई दलानं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बहल्ला चढवला. 12 मिराज 2000 विमानांनी 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. यामध्ये जवळपास 300 दहशतवादी मारले गेले आहेत.

बालाकोटमध्ये भारतानं केलेला हल्ला सर्वाधिक यशस्वी ठरला. बालाकोट जैशचा सुरक्षित आणि सर्वात मोठा बालेकिल्ला मानला जातो. बालाकोटवर हवाई दलानं अचूक निशाणा साधला. यात मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर ठार झाला.

विशेष म्हणजे अवघ्या 21 मिनिटांमध्ये हवाई दलाच्या वैमानिकांनी रात्रीच्या मिट्ट अंधारात अचूक हल्ले केले. पाकिस्तानला प्रतिहल्ल्याची कोणतीही संधी न देता सर्व 12 विमानं अगदी सुरक्षितपणे माघारी परतली.

भारतीय हवाई दलाचा आक्रमक अवतार पाहून पाकिस्ताननं एफ-16 लढाऊ विमानं असूनही प्रतिहल्ला केला नाही. यामुळे गेल्या 11 दिवसांपासून ज्या मोहिमेची तयारी सुरू होती, ती अतिशय यशस्वी झाली.

2016 मध्ये भारताच्या उरीतील तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याचं उत्तर भारतानं सर्जिकल स्ट्राइकनं दिलं होतं. आता पुलवामातील हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइकनं जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे.