सुरुवातीच्या काळात हात नव्हे तर हे होते काँग्रेसचे निवडणूक चिन्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 12:31 PM2019-03-14T12:31:11+5:302019-03-14T13:11:39+5:30

विविध राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे ही भारतातील निवडणुकांचे खास वैशिष्ट आहेत. केवळ चिन्हावरून संबंधित पक्ष आणि त्यांच्या उमेदवाराचा भारतात प्रचार होतो. स्वातंत्रोत्तर काळात देशावर दीर्घकाळ सत्ता राखणाऱ्या काँग्रेसचे हात हे निवडणूक चिन्हही असेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण सुरुवातीच्या काळात हात हे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह नव्हते. काँग्रेसला हात हे चिन्ह मिळण्यामागचा इतिहासही तितकाच रंजक आहे. वैशिष्ट्य म्हणजे निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख पक्षांचे निवडणूक चिन्ह.

स्वातंत्रोत्तर काळातील सुरुवातीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस हाच देशातील प्रमुख पक्ष होता. तत्कालिन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची लोकप्रियता खूप होती. त्याकाळात काँग्रेसची निशाणी दोन बैलांची जोडी ही होती.

पहिल्या लोकसभेपासून चौथ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसने ''दोन बैलांची जोडी'' या चिन्हावर निवडणुका लढवल्या.

मात्र 1967 नंतर काँग्रेसमध्ये दुफळी माजून सिंडिकेट आणि इंडिकेट असे दोन गट झाले. त्यानंतर 1969 साली निवडणूक आयोगाने ''दोन बैलांची जोडी'' हे निवडणूक चिन्ह गोठवले.

पुढे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला गाय आणि वासरू हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले. 1971 च्या लोकसभा निवडणुकीत गाय वासरू या चिन्हासह लढताना इंदिरा गांधी यांनी मोठा विजय मिळवला.

आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी माजली. त्यानंतर निवडणूक आयोगाने गाय वासरू हे निवडणूक चिन्ह गोठवून नवे निवडणूक चिन्ह निवडण्याची सूचना इंदिरा गांधी यांना केली.

त्यानंतर इंदिरा गांधी यांनी अनेकांशी सल्लामसलत करून अखेरीस हात हे निवडणूक चिन्ह निवडले. आणीबाणीनंतरच्या धकाधकीच्या काळात इंदिरा गांधी तत्कालीन शंकराचार्य स्वामी चन्द्रशेखरेन्द्र सरस्वती यांच्या भेटीला गेल्या होत्या तेथे शंकराचार्यांनी आशीर्वादासाठी हात वर करून तेच निवडणूक चिन्ह ठेवण्याची सूचना इंदिराजींना केल्याचाही काही ठिकाणी उल्लेख आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे 1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (रुईकर) या पक्षाने हात या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचे हात हे चिन्ह काँग्रेसच्या आजच्या चिन्हापेक्षा काही वेगळे होते.