भाजपच्या 'या' 09 दिग्गजांची लोकसभा रिंगणातून माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 07:55 PM2019-03-26T19:55:31+5:302019-03-26T20:31:32+5:30

अर्थमंत्री अरुण जेटली हेही यंदा निवडणूक लढवणार नाहीत. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जेटलींचा पराभव झाला होता. त्यानंतर, ते राज्यसभेवर खासदार बनून संसदेत गेले.

माजी मेजर जनरल बीसी खंडुरी यांनीही यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. खंडुरी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सध्या प्रकृती स्वास्थतेमुळे ते यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत.

भाजपाचे 77 वर्षीय नेते कलराज मिश्र यांनीही यंदा लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, पक्षासाठी आपण काम करत राहणार असल्याचे मिश्र यांनी सांगितले आहे.

भाजपाचे दिग्गज आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेही यंदा निवडणुकांच्या रिंगणात नाहीत. गेल्या 30 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ते प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी होत नाहीत.

अभिनेता परेश रावल यांनाही यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी अहमदाबाद पूर्व निवडणुकांमधून 3.25 लाखांचे मताधिक्य घेऊन परेश रावल निवडून आले होते.

उत्तर प्रदेशच्या कानपूर जागेवरुन निवडणूक लढविणारे मुरली मनोहर जोशी 2019 ची लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत. यंदा पक्षाने त्यांना उमेदवारीच दिली नाही.

परराष्ट्रमंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी यंदा निवडणुकीतून माघार घेतली आहे. सध्या सुषमा स्वराज या मध्य प्रदेशातील विदिशा येथून लोकसभा खासदार आहेत.

भाजपा प्रवक्ता शाहनवाज हुसैन हेही यंदाच्या निवडणुकांमध्ये सक्रीय उमेदवार नसणार आहेत. गेल्या निवडणुकीत भागलपूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.

राम मंदिर आंदोलन आणि गंगा नदीचे शुद्धीकरण यामुळे चर्चेत असलेल्या नेत्या उमा भारती याही यंदा निवडणूक लढणार नाहीत. 16 मार्च 2019 रोजी अमित शहांना पत्र लिहून उमा भारतींनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं.