कल्याण-भिवंडीपर्यंत धावणार मेट्रो रेल्वे, मेट्रो-५ आणि मेट्रो-६ ला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 10:08 PM2017-10-25T22:08:58+5:302017-10-25T22:16:27+5:30

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो-५ आणि मेट्रो-६ या नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या मेट्रो-५मुळे मुंबईतील मेट्रोचे जाळे कल्याणपर्यंत जाणार असून अंधेरी पश्चिम-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६मुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी आणखी एक मेट्रो रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

स्वामी समर्थ नगर (अंधेरी पश्चिम)-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६च्या सविस्तर प्रकल्प अहवालास व त्याच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एकूण १४.४७ किलोमीटर लांबीच्या या उन्नत मेट्रो मार्गामुळे स्वामी समर्थ नगर, सीप्झ, एल अ‍ॅण्ड टी यासारखी वाणिज्यिक क्षेत्रे तसेच आयआयटी पवईचा परिसर मेट्रोच्या नकाशावर येणार आहे.

२०२१मध्ये ६.५० लाख तर २०३१पर्यंत ७.७० लाख प्रवासी या मार्गाशी जोडले जातील.

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गामुळे भिवंडी आणि कल्याणचा परिसर मुंबई महानगराशी जोडला जाणार आहे. या मार्गामुळे २०२१मध्ये २.३ लाख तर २०३१पर्यंत रोज तीन लाखांहून अधिक प्रवासी असतील. या दोन्ही मेट्रो प्रकल्पांचे काम मार्च २०२१पर्यंत म्हणजे ४१ महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

टॅग्स :मेट्रोMetro