दादरच्या पुलाने घेतला मोकळा श्वास, फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 12:58 PM2017-10-07T12:58:38+5:302017-10-07T13:02:26+5:30

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाला अखेर जाग आली असून रेल्वे पुलावर आणि पुलाखाली बसणा-या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी रेल्वेचा 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.

पश्चिम आणि मध्य रेल्वेने कारवाईला सुरुवात केल्याने प्रवाशांकडून कौतुक होत आहे. फेरीवाल्यांमुळे नेहमी गजबजलेला असणारा दादर पश्चिमेकडील संपुर्ण परिसर मोकळा झाला असून, यामुळे आता प्रवाशांनाही चालताना त्रास होत नाहीये.

दादर, बोरीवली, वसई, वांद्रे, ठाणे, कल्याण, कुर्ला, परळ, चिंचपोकळी, डोंबिवली आदी विविध स्थानकांवर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

एरव्ही दादर पश्चिमेला जायचं म्हटलं तर तिथे असणा-या फेरीवाल्यांचा गर्दीतून वाट काढणे खूपच कष्टाचं काम होऊन बसायचं. रस्त्याच्या दोन्ही कडेला सोबतच मधोमध फेरीवाले असल्याने प्रवाशांना चालताना खूप त्रास व्हायचा.

मध्य रेल्वेवर आरपीएफने दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, परळ, चिंचपोकळी, करीरोड स्थानकांवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र ही कारवाई तात्पुरती नसावी अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.