Controversial Statements of 2018: 'या' दहा विधानांवरून २०१८ मध्ये महाराष्ट्रात झाला 'कल्ला'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:22 PM2018-12-25T12:22:04+5:302018-12-25T13:17:31+5:30

'घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द, बोलण्यापूर्वी' असं संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं असलं, किंवा 'शब्द शब्द जपून टाक' असं ज्येष्ठ मंडळी वारंवार सांगत असली, तरी हे सल्ले हल्ली ऐकतंय कोण राव? मनाला येईल तसं बोलण्याचा, करण्याचा आजचा जमाना आहे. पण, हीच बेफिकिरी अनेकदा घात करते, याचा प्रत्यय २०१८ या वर्षातही आला. राजकारणात, समाजकारणात काम करणाऱ्या मंडळींची जीभ घसरल्यानं मोठे वाद निर्माण झाले. एक दृष्टिक्षेप अशाच वादग्रस्त विधानांवर....

'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन.' - राम कदम

'शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे.' - संभाजी भिडे

'संत तुकाराम महाराजांचा खून झाला होता.' - जितेंद्र आव्हाड

'सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे.' - प्रशांत परिचारक

'गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता' - संभाजी भिडे

श्रीपाद छिंदमने केला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. शिवजयंती उत्सवाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान.

'आपल्या देशात जेव्हा महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्याची हत्या करण्यात आली, तेव्हा काही लोक आनंद उत्सव साजरा करत होते. आज तेच लोक सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात डांबणार आहोत का? - स्वरा भास्कर

'उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल. जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नाही' - संजय निरुपम

'काही शाळा सरकारकडे आर्थिक मदत मागण्यासाठी भीकेचा कटोरा घेऊन येतात. मात्र ते माजी विद्यार्थ्यांकडे सहज आर्थिक मदत मागू शकतात. आपल्या शाळेला किंवा महाविद्यालयाला मदत करणं हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे.' - प्रकाश जावडेकर

'कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी प्रामाणिकतेची नवीन व्याख्या तयार केली आहे. म्हणून देशातील प्रत्येक जण आपल्या कुत्र्याचं नाव वजुभाई वाला ठेवतील. कारण यापेक्षा प्रामाणिक कोणीच होऊ शकत नाही' - संजय निरुपम