LMOTY 2019 : देश सुधारण्यासाठी मानवतेचा धर्म पाळा; आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'गुरूमंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 05:56 PM2019-02-21T17:56:04+5:302019-02-21T18:04:47+5:30

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित होते. आप्पासाहेब यांना ‘समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुरस्कार स्वीकारल्यावर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शनही केले.

देशातील बऱ्याच व्यक्ती जात-पात, धर्म या गोष्टींमध्ये अडकलेली आहेत. त्यामुळेच सध्या देशामध्ये माणूस म्हणून जगणे कठीण झाले आहे. पण प्रत्येकाने आपला धर्म पाळला तर देश सुधारण्यास मदत होईल, असे मत ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी 'लोकमत'च्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेले हजारो अनुयायांनी आप्पासाहेब यांना आपल्या जागी उभे राहून मानवंदना दिली. त्यांच्या प्रत्येक वाक्याला उपस्थित अनुयायी टाळ्यांचा कडकडाट करीत होते.

आरोग्य शिबीर, वृक्षारोपण व संवर्धन, स्मशानभूमी नूतनीकरण, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदी कामे धर्माधिकारी प्रतिष्ठान करत आहे. मी कोणी महाराज नाही. मी सर्वसामान्य माणूस असून चांगले विचार देण्याचे काम मी करतो. मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या माणसाचे कार्य काय, याची जाणीव मी करून देतो असे धर्माधिकारी म्हणाले.

आपण आपल्या अनुयायांना संत वाङमयाचा अभ्यास करण्याचा सल्ला देतो. आपण ज्या देशात राहतो त्याचे ऋण फेडण्याकरिता काय केले पाहिजे ते सांगतो. द्वेष, परस्पर तिरस्कार अंत:करणातून काढून टाकणे, मतभेद दूर करणे हे महत्त्वाचे आहे, असंही ते म्हणाले.

राष्ट्र सुधारण्याकरिता आपला सहभाग काय, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. सर्व शासनाने करावे ही अपेक्षा चुकीची आहे. राष्ट्र समृद्ध करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशाला घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पण त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे मन चांगले असायला हवे. मनामध्ये चांगले विचार असायला हवेत. मनाला स्थिर करण्यासाठी चांगले विचार असणे महत्वाचे आहे. मन उत्तम असेल तर देशही चांगला घडू शकतो. आपण प्रत्येक जण अडचणींवर मात करायला शिकलो तर ते देशाच्या हिताचे असेल," असे धर्माधिकारी यांनी सांगितले.

आम्ही झाडे लावण्याचे काम करतो, तेव्हा फक्त झाड कसे लावावे, हे सांगत नाही, तर त्याची जोपासना शिकवतो. त्याचपद्धतीने सुसंस्कारी समाज निर्माण व्हावा, यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आम्ही प्रयत्न करत गेलो. जीवनाच्या शेवटापर्यंत आम्ही माणूसपण जपण्याचे हे काम याच पद्धतीने करत राहू, असे भावपूर्ण उद्गारही आप्पासाहेबांनी काढले.

महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या, समाजासाठी सर्वस्व वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना लोकमत समूहाच्या वतीने 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला हा नेत्रदिपक सोहळा वरळी येथील एनएससीआय डोममध्ये रंगला असून या सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.