जगातले सर्वात कठोर नियम असलेलं तुरुंग, मेल्याशिवाय बाहेर येत नाहीत लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 02:50 PM2019-01-02T14:50:08+5:302019-01-02T14:56:18+5:30

रशिया नेहमीच जगासाठी उत्सुकतेचा विषय राहिला आहे. एक असा देश जिथे आजही अनेक गुपितं दडलेली आहेत. जगातल्या सर्वात शक्तीशाली गुप्तहेरीपासून ते आपल्या सैन्य ताकदीपर्यंत अमेरिकेला टक्कर देतो. तसे जगातल्या वेगवेगळ्या देशांमधील सर्वात वाईट तुरुंगांचा विषय येतो, तेव्हा रशियातील ब्लॅक डॉल्फिन तरुंगाचं नाव सर्वात आधी घेतलं जातं.

दक्षिण रशियातील ऑरेनबर्ग शहरात असलेल्या या तरुंगातील नियम जगात सर्वात जास्त कठोर आहेत. या तरुंगातून आजपर्यंत एकही कैदी फरार होऊ शकला नाही. गुन्हे विश्वात तर असे म्हटले जाते की, एकदा कुणी या तरुंगात गेलं तर मरेपर्यंत बाहेर येत नाही. जगातील या सर्वात खरतनाक तरुंगातील कैदीही खास आहेत. इथे हत्या, बलात्कार आणि देशद्रोहाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या कैद्यांना ठेवलं जातं.

हे तुरुंग जवळपास १७०० वर्षांपासून वेगवेगळ्या रुपात काम करत आहे. तुरुंगाचं नाव ब्लॅक डॉल्फिन असण्याचं कारण या तुरुंगात एक डॉल्फिनची मूर्ती आहे. या तुरुंगातील कठोर नियमांची कल्पना यावरुन केली जाते की, इथे कैद्यांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बसू दिलं जात नाही. इथे आराम करण्याला मनाई आहे.

या तुरुंगात एकत्र ७०० कैदी ठेवले जातात. ब्लॅक डॉल्फिन हे तुरुंग रशिया आणि कझाकिस्तान सीमेवर आहे. नॅशनल जिओग्राफी चॅनेलने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, त्यात या तुरुंगातील कैद्यांचं जीवन दाखवण्यात आलं होतं. तुरुंगात कैदी २४ तास कॅमेरात कैद होत असतात. प्रत्येक सेलचा रस्ता हा तीन स्टीलच्या दरवाज्यांमधून जातो. इतकेच नाही तर तुरुंगाच्या आतील परिसरात फिरतेवेळी कैद्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते आणि हात बांधलेले असतात.

डोळ्यांवर पट्टी, हात बांधलेले आणि कंबर वाकलेली असल्याने त्यांना तुरुंगाच्या ले-आऊटचा अंदाजही घेता येत नाही. या तुरुंगात कोणतही कॅन्टीन नाहीये. कैद्यांना त्यांच्या सेलमध्येच जेवण दिलं जातं त्यांना जेव्हाही बाहेर काढलं जातं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते.

ब्लॅक डॉल्फिन तुरुंगात ५० स्क्वेअर फूटाच्या सेलमध्ये दोन कैदी राहतात. दर १५ मिनिटांनी सिक्युरिटी गार्ड प्रत्येक सेलची तपासणी करतात. जेव्हा कैद्यांना बाहेर काढलं जातं, तेव्हा त्यांना कंबर वाकवून बाहेर नेलं जातं. त्यांना सरळ होऊन जाण्याची परवानगी नाहीये.

या तुरुंगातील कैदी किती क्रुर आहेत याचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की, ७०० कैद्यांनी ३५०० लोकांची हत्या केली आहे. या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा झालेली असते त्यांना ठेवलं जातं.

या तुरुंगातील एका कैद्याने स्वत:च्या शरीराचा काही भाग खाल्ला आणि शिल्लक राहिलेलं मांस मित्राच्या घरी पाठवलं होतं. त्याच्या मित्राच्या पत्नीला वाटलं की, हे कांगारुचं मांस आहे. त्यामुळे तिने ते शिजवून परिवारातील सदस्यांना खायला दिला.