सावधान! पेपरात गुंडाळून खाद्यपदार्थ नव्हे, कॅन्सर घरी नेताय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 02:41 PM2018-11-12T14:41:39+5:302018-11-12T14:49:43+5:30

अनेकदा बाहेरुन नाश्ता मागवला, की तो कागदात बांधून दिला जातो. मात्र असा नाश्ता चवीनं खाणं आरोग्याच्या दृष्टीनं महाग पडू शकतं. कारण वृत्तपत्राच्या छपाईसाठी वापरली जाणारी शाई शरीरासाठी घातक असते.

छपाईसाठी वापरण्यात येणारी शाई केमिकलपासून तयार केली जाते. डाय आइसोब्यूटाइल फटालेट आणि डाइएन आइसोब्यूटाइल या केमिकल्सचा वापर छपाईसाठी करतात. ही केमिकल्स शरीरात गेल्यावर ती धोकादायक ठरु शकतात.

अनेकदा लोक दुकानात गरमागरम पदार्थ न्यायला येतात. हे पदार्थ कागदात बांधून दिले जातात. मात्र हे गरमागरम पदार्थ जास्त धोकादायक ठरतात. कारण छपाईसाठी वापरली जाणारी केमिकल्स गरम पदार्थांमुळे लगेच सक्रीय होतात. ही केमिकल्स पदार्थांसोबत शरीरात जातात.

लोकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाननं मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. खाद्यपदार्थ कागदात बांधून देऊ नका, अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. मात्र हा नियम सर्रास धाब्यावर बसवला जातो.

देशात दररोज हजारो वृत्तपत्रं छापली जातात. वर्तमानपत्रं दुसऱ्या दिवशी रद्दी होतात. त्यामुळे स्वस्तात उपलब्ध होतात. याशिवाय प्लेट्स धुण्यात बराच वेळ वाया जातो. त्यामुळे अनेक दुकानदार खाद्यपदार्थ कागदात बांधून देतात.

छपाईसाठी वापरली जाणारी शाई अतिशय घातक असते. या शाईतील केमिकलमुळे कर्करोग आणि अनेक मानसिक आजार होऊ शकतात.