भारतीय संघाचे यशस्वी कमबॅक

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ पिछाडीवर आहे. लॉर्ड्स कसोटीतही भारत पराभवाच्या छायेत आहे. पण भारतीय संघाने यापूर्वी अशा अनेक सामन्यांत पराभवाच्या छायेतून स्वतःला बाहेर काढले आहे. भारताच्या या यशस्वी कमबॅकवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

मार्च 2001, वि. ऑस्ट्रेलिया, कोलकाता - भारतीय क्रिकेट इतिहासात हा सामना सुवर्ण अक्षराने लिहला गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 445 धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 171 धावांत गडगडला. त्यानंतर व्ही व्ही एस लक्ष्मण (281) आणि राहुल द्रविड (180) यांनी दुस-या डावात भारताला 7 बाद 657 धावांचा डोंगर उभा केला. 384 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 212 धावांवर माघारी परतला आणि भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. या लढतीत हरभजन सिंग (6 विकेट) आणि सचिन तेंडुलकर (3 विकेट) यांनी गोलंदाजीत प्रभाव पाडला.

लक्ष्मण आणि दी वॉल द्रविड यांनी पाचव्या विकेटसाठी 376 धावांची भागीदारी केली. भारताकडून पाचव्या विकेटसाठीची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली होती.

ऑगस्ट, 1979 वि. इंग्लंड, लॉर्ड्स - या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 96 धावांवरच आटोपला होता आणि त्यात सुनील गावस्कर यांच्या 42 धावा होत्या. इंग्लंडने 9 बाद 419 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर भारतासाठी दुस-या डावात दिलीप वेंगसरकर (103) आणि गुंडप्पा विश्वनाथ (113) यांच्या शतकाच्या जोरावर भारताने ही लढत अनिर्णीत राखली. वेंगसरकर आणि विश्वनाथ यांनी अनुक्रमे 295 व 337 चेंडूंचा सामना केला होता.

नोव्हेंबर 2004 वि. ऑस्ट्रेलिया, मुंबई - मालिकेतील चौथ्या कसोटीत भारताचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला. त्यानंतर अनिल कुंबळेने आपल्या फिरकीच्या तालावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नाचवले. त्याने पाच विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 203 धावांत गुंडाळला. मुरली कार्तिकनेही 4 विकेट घेतल्या. भारताला दुस-या डावात 205 धावा करता आल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. हरभजन सिंग (5 विकेट) आणि कार्तिक (3 विकेट) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 93 धावांत गुंडाळला.

मार्च 1983 वि. वेस्ट इंडीज, पोर्ट ऑफ स्पेन - भारताच्या पहिल्या डावातील 175 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान वेस्ट इंडीजने 394 धावा केल्या. दुस-या डावात मोइंदर अमरनाथ ( 345 चेंडूंत 117 धावा) आणि कर्णधार कपिल देव ( 95 चेंडूंत नाबाद 100 धावा) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 7 बाद 469 धावा करून सामना अनिर्णीत राखला.

जानेवारी 2018 वि. दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेवर 63 धावांनी विजय मिळवला होता. भारताला पहिल्या डावात 187 धावाच करता आल्या. मात्र जसप्रीत बुमरा (5/54) आणि भुवनेश्वर कुमार (3/44) यांनी यजमानांना 194 धावांत गुंडाळले. भारताने दुस-या डावात 247 धावा केल्या. त्यात अजिंक्य रहाणेच्या 48, तर विराटच्या 41 धावा होत्या. आफ्रिकेचा संघ 117 धावांत माघारी धाडून भारताने विजय मिळवला. मोहम्मद शमीने 28 धावांत पाच विकेट घेतल्या.