जोहान्सबर्ग कसोटीत भारत ६३ धावांनी विजयी!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेवर ६३ धावांनी मात करत मालिकेचा अखेर गोड केला आहे.

कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-१ अशा फरकाने जिंकली असली, तरीही कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी केलेली कामगिरी आणि शेवटच्या कसोटी सामन्यातला विजय हा भारताला वन-डे आणि टी-२० मालिकेत प्रेरणादायी ठरणार आहे.

दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे भारताने कसोटीच्या चौथ्या दिवशीच सामना खिशात घातला.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी आफ्रिकेने एक गडी गमावला होता. मात्र अखेरच्या षटकांमध्ये खेळपट्टीतल्या अनपेक्षित उसळीमुळे खेळ थांबवण्यात आला.

इशांत शर्माने हाशिम आमलाला बाद करुन आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली. यानंतर आफ्रिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकले नाहीत.