टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं

न्यूझीलंडने गुरुवारी हॅमिल्टन येथे झालेल्या वन डे सामन्यात भारतावर 8 विकेट व 212 चेंडू राखून विजय मिळवला. भारताने विजयासाठी ठेवलेले 93 धावांचे माफक लक्ष्य न्यूझीलंडने 14.4 षटकांत सहज पार केले. भारताचा हा चेंडूंच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव ठरला. याआधी श्रीलंकेने 2010 मध्ये भारतावर 209 चेंडू राखून विजय मिळवला होता.

ट्रेंट बोल्टची भेदक गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. बोल्टने सलग 10 षटकं टाकत 21 धावांत पाच फलंदाजांना माघारी पाठवले. ग्रँडहोमने 26 धावांत 3 बळी घेतले. त्यामुळे भारताचा संपूर्ण संघ 30.5 षटकांत 92 धावांत तंबूत परतला.

टॉस हरणे पडले महागात : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर किवी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल किवींसाठी निर्णयाक ठरला.

विराट कोहलीची अनुपस्थिती : विराट कोहलीच्या अनुपस्थितीचा सर्वात मोठा फटका आज बसला. रोहित शर्मा व शिखर धवन लवकर माघारी परतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर डाव सावरणाऱ्या कोहलीची उणीव प्रकर्षाने जाणवली.

महेंद्रसिंग धोनीचे नसणं महागात पडले : संघ अडचणीत असताना महेंद्रसिंग धोनी नेहमी संघाच्या मदतीला धावून आला आहे. त्याच्या अनुभवाच्या संघाला नेहमी फायदा झाला आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या व केदार जाधव फलंदाजीची पडझड रोखू शकले नाही.

शुबमन गिलने निराश केले : कोहलीच्या अनुपस्थितीत युवा फलंदाज शुबमन गिल याला संधी मिळाली. त्याच्याकडून फार अपेक्षा होता, परंतु त्याला पदार्पणाच्या सामन्यात अपयश आले. शुबमन 9 धावांवर माघारी परतला.