वाहनाची चावी काढण्याचा पोलिसांना अधिकारच नाही; जाणून घ्या वाहनचालकांचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:06 PM2019-07-01T16:06:31+5:302019-07-01T18:19:41+5:30

बऱ्याचदा वाहतूक पोलिस वाहनचालकांना विशेषकरून दुचाकीस्वारांना थांबून त्यांच्या वाहनाची चावी काढून घेतात किंवा हात पकडतात आणि कागदपत्रे मागतात. पोलिसांचे हे कृत्य चुकीचे आहे. या प्रकाराची तुम्ही तक्रारही करू शकता.

सामान्य तपासणीवेळी पोलिसांना केवळ इशारा करून वाहन रोखण्याचा अधिकार असून पोलिस कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू शकत नाहीत.

शहरामध्ये जेव्हा वाहने चालविताना वाहतूक नियमांची चर्चा होते. तेव्हा सर्वात आधी चलन फाडण्याबाबत बोलले जाते. काही नियम असे असतात जे वाहन चालकांच्या मदतीसाठी असतात. अशा नियमांची माहिती वाहन चालकांना असणे गरजेचे असते.

रस्त्यावर वाहन चालविताना सर्वाधिक वाद पोलिसांसोबत होतो. कारण छोटेसे कारण दाखवत पोलिस वाहने थांबवितात. अनेकदा पोलिस स्कूटर चालवत असताना हात पकडतात किंवा गिअरमध्ये गाडी असताना चावी काढून घेतात. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.

चालत्या गाडीची चावी काढून पोलिस थांबवू शकत नाही

वाहन चालकाला रोखण्यासाठी त्याचा हात पकडू शकत नाही

कार जात असताना त्याच्यासमोर अचानक बॅरिकेड्स लावू शकत नाहीत

जर पोलिसांनी वरीलपैकी कोणतेही कृत्य केल्यास वाहन चालकाला अधिकार असतो की याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करता येते.

सर्वच पोलिसांना वाहन चालकांवर कारवाई करण्याचा अधिकार नसतो. अनेकदा शिपाई किंवा हवालदार, सहाय्यक उप निरिक्षक स्तरावरील अधिकारी हातात चलनाचे पुस्तक घेऊन कारवाई करतात. अशावेळी तुमचा अधिकार काय आहे हे पाहणे गरजेचे आहे.

कोणत्याही तपासणीच्या ठिकाणी उप निरिक्षक किंवा त्याच्या वरचा अधिकारी चलन करत असेल तर योग्य आहे. अन्य पोलिसांना हा अधिकार नाही. यामुळे तपासणीच्या ठिकाणी उप निरिक्षक किंवा त्यांच्या वरच्या पदाचा अधिकारी उपस्थित असतो. त्याशिवाय चलन फाडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.