परभणीत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:43 PM2018-02-20T19:43:07+5:302018-02-20T19:43:43+5:30

केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकर्‍यांमधून केला जात आहे. 

In Parbhani Ignorance towards damaged crops due to rain fall | परभणीत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष 

परभणीत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष 

googlenewsNext

परभणी : आठ दिवसांंपूर्वी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिके आडवी झाली. प्रशासनाने या पिकांचे पंचनामे सुरू केले खरे. मात्र केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकर्‍यांमधून केला जात आहे. 

मागील आठवड्यात ११, १२ व १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यात जिंतूर, सेलू, पूर्णा, पालम आणि गंगाखेड तालुक्यामध्ये गारपीट झाली. तर परभणी तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नोंद महसूलच्या अधिकार्‍यांनी घेतली आहे.  दुसरीकडे अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे झालेल्या नुकसानीकडे चक्क कानाडोळा करण्यात आला आहे. परभणी तालुक्यात गारपीट व वादळी वार्‍याने रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, महसूल प्रशासनाने ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे त्या ठिकाणचेच पंचनामे केले आहेत. 

मात्र वादळी वार्‍याने तालुक्यातील आर्वी, टाकळी कुंभकर्ण, शहापूर, तुळजापूर, कुंभारी बाजार, डिग्रस, मांडवा, कारला, काष्टगाव आदी गावातील गहू, ज्वारी ही पिके भूईसपाट झाली आहे. मात्र महसूल प्रशासनाने या पिकांचे अद्याप पंचनामे केले नाहीत. मोठा खर्च करून रबी हंगामात पेरणी केलेल्या शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळी वार्‍याने हिरावून घेतला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने वार्‍याने भूईसपाट झालेल्या पिकांचेही पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

हे पिकांचे नुकसान नव्हे का?
जिल्ह्यात सलग तीन दिवस वादळी वार्‍यांसह पाऊस झाला. जोराने आलेल्या वार्‍यामुळे उभी पिके आडवी झाली. त्यात अवकाळी पाऊस पडल्याने या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे या पिकांचेही पंचनामे करणे अपेक्षित असताना ते केले जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आडवे झालेल्या पिकांचे नुकसान नव्हे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title: In Parbhani Ignorance towards damaged crops due to rain fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.