परभणीत दुष्काळ निवारण संकल्प शिबीर :राजकारणातच काही पक्षांना रस- आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:26 AM2019-01-17T00:26:45+5:302019-01-17T00:27:14+5:30

मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना काही पक्षांना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी राजकारण करण्यातच रस असल्याचा आरोप युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़

Parbhani Drought Redressal Sankalp Camp: In the politics, there are some parties interested in - Aditya Thakre | परभणीत दुष्काळ निवारण संकल्प शिबीर :राजकारणातच काही पक्षांना रस- आदित्य ठाकरे

परभणीत दुष्काळ निवारण संकल्प शिबीर :राजकारणातच काही पक्षांना रस- आदित्य ठाकरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना काही पक्षांना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी राजकारण करण्यातच रस असल्याचा आरोप युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़
पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे बुधवारी दुष्काळ निवारण संकल्प शिबीर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर खा़ बंडू जाधव, संयोजक आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ जयप्रकाश मुंदडा, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, सोपान अवचार, नंदू पाटील, समप्रिया पाटील, अंबिका डहाळे, सखूबाई लटपटे, गजानन काकडे, ज्ञानेश्वर पवार, अर्जुन सामाले आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शिवसेना त्याला तोंड देण्यासाठी खंबीर आहे़ दुष्काळात जनतेला मदत करण्याचे काम पक्षाच्या आमदार, खासदारांकडून सुरू आहे़ त्यामध्ये सातत्य कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली़ शेतीमधलं मला काही कळत नसलं तरी शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र आपणाला कळतात़ त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर करण्यास पक्षाचे प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले़ गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील पिकांची पाहणी करीत असताना आग लागून जळावीत तशी पिके दिसत आहेत़ ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलांतर करीत आहेत; परंतु, नोटाबंदीमुळे शहरातील उद्योगधंदेही बंद पडत आहेत़ अशा अवस्थेत शेतकºयांचे हाल होत आहेत़ त्याला सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी बोलताना संयोजक आ़ डॉ़ पाटील म्हणाले की, जय भवानी महिला सहकारी सूतगिरणी ही १०० टक्के सौर उर्जेवर चालणार असून, अशी ही महाराष्ट्रातील एकमेव सूतगिरणी ठरणार आहे़ या सूतगिरणीच्या माध्यमातून साडेतीन हजार महिलांना रोजगार मिळणार आहे़ दुष्काळात शेतकºयांनी खचून न जाता व आत्महत्येचा मार्ग न अवलंबिता कुटुंबाचा विचार करून संकटांचा सामना करावा, शिवसेना त्यांच्यासोबत आहे़, असे सांगून त्यांनी शिवसेनेची बांधिलकी शेतकरी व सर्वसामान्यांशी आहे़ पोलीस भरतीसाठी शिवसेनेने १०० युवकांना दत्तक घेतले असून, मेगा भरतीसाठी युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचे कामही शिवसेनेकडून सुरू असल्याचे ते म्हणाले़
यावेळी बोलताना खा़ बंडू जाधव म्हणाले की, विधायक कामे करण्यास शिवसेना कधीही मागे हटणार नाही़ सूतगिरणीचे भूमिपूजन हा त्याचाच एक भाग आहे़ जिल्ह्यातील जनता नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी आहे़ त्यामुळे शिवसेनाही दुष्काळग्रस्तांच्या समस्या दूर करण्यासाठी बांधील आहे, असे सांगून त्यांनी आ़ डॉ़ पाटील यांच्या कामाचे कौतुक केले़
शिलाई मशीन, शेळ्या-मेंढ्यांचे वाटप
यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नियोजित जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन करण्यात आले़ तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शेळ्या-मेंढ्यांचे वाटप करण्यात आले़ तसेच महिलांना शिलाई मशीन, मोफत पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झालेल्या १०० युवक, युवतींना साहित्याचे वाटप करण्यात आले़ तसेच जनावरांसाठी खाद्याचे वाटपही करण्यात आले़ यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणे उपस्थिती होती़

Web Title: Parbhani Drought Redressal Sankalp Camp: In the politics, there are some parties interested in - Aditya Thakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.