गाव तर सोडलं पण शहर स्वीकारणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 05:26 PM2019-07-18T17:26:16+5:302019-07-18T17:27:55+5:30

एमबीए करायला पुण्यात आलो, या शहरात सारंच नवं; पण शिकलो हळूहळू. एक मात्र खरं, आता गाव सुटलं आणि शहरानं अजून आपलं म्हटलेलं नाही.

The story of the young man Who leave his village. but the town has not yet accept him | गाव तर सोडलं पण शहर स्वीकारणार कधी?

गाव तर सोडलं पण शहर स्वीकारणार कधी?

googlenewsNext

संदीप मराठे
मु.पो. रोटवद, ता. धरणगाव, 
जि. जळगाव (सध्या पुणे)

‘स्वदेस’ चित्रपटातील ‘ये जो देस है मेरा’ हे गाणं ऐकलं की, माझ्या स्थलांतराचा प्रवास झर्रकन माझ्या नजरेसमोरून जातो. मला माझा गाव आठवतो, संघर्षाच्या काळात विश्वासानं पाठीवर ठेवलेले हाथ आठवतात. ज्यांनी माझ्या पंखांना बळ दिले तो प्रत्येक स्रोत आठवतो, त्यात माझ्या आई-वडिलांचा संघर्ष,  स्नेही मंडळींचा विश्वास व ‘लोकमत मैत्र’ (आताचा ऑक्सिजन) यांचं योगदान अमूल्य आहे. त्यावेळेस मी ‘लोकमत मैत्र’ची आतुरतेने वाट पाहत असे. गावातल्या टपरीवरून रात्री घेऊन मी ती पूर्ण वाचत असे. त्यात येणा-या माझ्यासारख्या मुलांच्या गोष्टी मला प्रेरणा देत. मोठी स्वप्न बघण्यासाठी ऊर्जा देत असत. किशोरवयात येत असलेली आव्हानं, त्यात घराची प्रतिकूल परिस्थिती, उच्चशिक्षण व करिअर यात पुढं काय करावं? कसं करावं? सुरुवात कुठून करावी? आणि ते का करावं? यासारख्या असंख्य प्रश्नांनी मानसिक स्तरावर गुदमरलेल्या अवस्थेत ‘लोकमत मैत्र’ माझ्यासाठी त्यावेळेस ‘ऑक्सिजन’ ठरला होता.

मी मूळचा खान्देशचा. धरणगाव तालुक्यातील रोटवद माझं गावं. गावातील 90 टक्के लोक हे अल्पभूधारक. माझ्या गावातील प्रत्येक तरुणाच्या वाटेला तोच संघर्ष होता जो माझ्या वाट्याला आलेला. माझे वडील अत्यल्पभूधारक असल्यानं येईल त्या उत्पन्नात घरखर्च भागत नसे. आईला सोबत घेऊन कांदे लागवड झाल्यावर ते त्यात मुळा, मेथी, पालक व कोथिंबीर असे आंतरपीक घेत. शेतजमीन फक्त कमी असल्याने उत्पन्न तुलनेत कमी येई, त्यात पीक चांगलं आलं तर रास्त भाव मिळत नव्हता. भाव असेल तेव्हा पीक कमी येत होते. घरखर्च व आम्हा दोन भावांचा शिक्षणासाठी वडील गावातून व्याजाने पैसे घेत व पुढील हंगाम येईल तोपर्यंत आमचा उदरनिर्वाह त्यावर चाले. दरम्यान, मजुरांची गरज असे तिथे आईवडील कामाला जातं.

माझं दहावीपर्यंतच शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झालं. पुढील शिक्षणासाठी मी तालुक्याला धरणगाव येथे प्रवेश घेतला. दरम्यान, मी अन माझा भाऊ आम्ही आईवडिलांना शेतीत मदत करत. रात्री मी मुळा व भाजी विकायला चोपडा मार्केटला जात असे. वडील रात्री शेतात पाणी द्यायला जात असत. सकाळी 4 वाजता उठून मी आमचा माल शिस्तीत लावायचा मग अडत्या येऊन लिलाव करत असे. घरी आल्यावर शाळा नंतर पुढे कॉलेज असा प्रवास सुरू होता. नंतर मी पदवीसाठी चोपडा, जि. जळगाव येथे प्रवेश घेतला व यशस्वीपणे पदवी घेतली.

परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे आईवडिलांचं एकच स्वप्न होतं की आम्हाला खूप शिकवायचं. आम्ही जे कष्ट करतोय ते तुम्हाला नाही करायचे म्हणून अभ्यास करा, असं ते सतत सांगत. शैक्षणिक कामासाठी जेव्हा पैशांची गरज असे तेव्हा वडील घरात पैसे नसले तरी, गावातून घेऊन आम्हाला पुरवत असत. पदवीला असताना मी सकाळी सहाच्या बसने जात असे. आई दिवसभर शेतात दमून आल्यावरसुद्धा दुसर्‍या दिवशी सकाळी 5 वाजता डबा बनवत होती. पदवीपर्यंत मी गावातून ये-जा करून शिक्षण पूर्ण केलं.
‘आपली परिस्थिती बदलायचीच’ हा विचार माझ्या स्वप्नांची उंची वाढवत होता. आता उच्चशिक्षणासाठी गाव सोडावं लागणार होतं. एमबीएसाठी पुण्याला जायचं मी मनाशी निर्धार केला अन् तयारीला लागलो, सभोवताली एमबीए करून नोकरी न लागलेली पोरं होती; पण माझी लढाई ही स्वतंत्र आहे हे डोक्यात होतं. अर्थातच पैसे नव्हते; पण आईवडील म्हटले, ‘तू कर आम्ही ते बघून घेऊ.’ सुदैवाने पुण्यात एका कॉलेजला प्रवेश मिळाला. त्यावेळेस घरात प्रवेश घेण्यासाठी पैसे नव्हते वडिलांनी गावातून थोडे घेतले, आईने कानातले दिले अन मी गावातल्या मित्राकडे जाऊन त्याच्या मदतीने प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मी शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केले. तात्पुरता आर्थिक प्रश्न सुटला होता.

पुण्यात आल्यानंतर माझ्यासाठी सर्व नवीन होते, येथे लोकांचे चेहरे आणि रस्ते माझ्या लक्षात राहात नव्हते. येथील खानपान, जगण्याची रित, कॉलेजमधील मित्रांची भाषा हे सर्व अंगीकारायला वेळ लागणार होता.  छोट्या गावातून आलेल्या मुलांसोबत माझी मैत्री झाली होती. गावाची अन् घराची खूप आठवण येत होती, आईवडील गरज पडली की, पैसे पाठवत असत. यशस्वीरीत्या मी माझं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत होतो/सोबत नोकरीसाठी प्रयत्न सुरू होते. चेतन पाटीलसर मार्गदर्शन करत होते. मला प्रथम वर्ष संपल्यावर कॉलेजकडून शेअर मार्केटच्या कंपनीमध्ये मुलाखतीला पाठवलं व सुदैवाने मला नोकरी मिळाली. आईवडिलांना फोन करून सांगितले, ते शेतात होते त्यांना खूप आनंद झाला होता. कारण त्यांच्या कष्टाच चीज झालं होतं. मी कॉलेज अन् जॉब सोबत करत होतो त्यात मला माझे बॉस यांची अनमोल साथ होती. मी कॉर्पोरेटमध्ये नवीन होतो. मला माझे बॉस सम्राट जाधव यांनी शून्यापासून शिकवलं. फॅ्रन्चाइसी मॅनेजरची जबाबदारी सोपवली. 
माझे वरिष्ठ सहका-यानी मला शक्य तेवढी मदत केली. स्थलांतराने माझ्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल आणला. फक्त अर्थार्जन करण्यासाठी जगण्यापेक्षा अर्थपूर्ण आयुष्य कसं जगता येईल हे या प्रवासानं शिकवलं. अजून मोठा पल्ला गाठायचाय, प्रवास तर सुरूच राहणार.

स्थलांतरामुळे मला गावाने परका केलाय तर शहराने ही अजून मला आपलं नाही मानलं. गावी गेलो की ‘परत कधी जाणार’, असं गाव विचार असतं अन ‘गावी कधी जाणार’ हा प्रश्न शहर विचारत असतं.

 

Web Title: The story of the young man Who leave his village. but the town has not yet accept him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.