...आगे बढते जाना रे

By meghana.dhoke | Published: July 28, 2017 05:50 PM2017-07-28T17:50:42+5:302017-07-28T17:51:14+5:30

महिला क्रिकेट संघानं कोट्यवधी लोकांची मनं जिंकली असं आपण म्हणतो खरं; पण त्यांची लढाई कुणाकुणाशी होती,

indian womens cricket team | ...आगे बढते जाना रे

...आगे बढते जाना रे

Next

महिला क्रिकेट संघानं
कोट्यवधी लोकांची मनं जिंकली
असं आपण म्हणतो खरं;
पण त्यांची लढाई कुणाकुणाशी होती,
काय काय सोसलं त्यांनी
यावर एक नजर घाला..
दिसेल, सातत्य. मेहनत
आणि लढण्याची एक वेगळीच गोष्ट...

जिंकायला हवा होता आपण महिला विश्वचषक !
या वाक्यातला ‘आपण’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. महिला क्रिकेटला हसणारे, महिला क्रिकेट मॅच कधीही टीव्हीवरसुद्धा न पाहणाºया काही कोटी लोकांना भारतीय मुलींनी जिंकावं असं वाटणं आणि त्या वाटण्याला ‘आपण’ जिंकण्या-हरण्याचं, लढण्या-झुंजण्याचं आणि क्रिकेटसह देशावरच्या प्रेमाचं एक रूपडं यावं, हे खरं तर जिंकणंच आहे !
आणि ही जीत विश्वचषक जिंकण्याहूनही खूप मोठी आहे. कधीकाळी कपिलदेवच्या टीमनं जे भारतीय क्रिकेटसाठी केलं होतं, तेच गेल्या रविवारी मिताली राजच्या भारतीय क्रिकेट संघानं केलं आहे. १९८३ ते २०१७ काळ किती मोठा आहे; पण तरी जे घडतंय ते तेच आहे, जगाच्या नकाशावर स्वत:ला सिद्ध करणं. सगळे अडथळे, सर्व प्रकारच्या गैरसोयी, तमाम अपमान सारं सहन करून ‘लॉर्ड्स’ गाठणं काही सोपं नव्हतंच. ते या मुलींनी केलं, आणि जगाला म्हणण्यापेक्षा आपल्याच देशवासीयांना करून दाखवलं!
तशी या उपेक्षेच्या आणि कमी लेखण्याच्या, न मोजण्याच्या गोष्टीची सुरुवात फार जुनी. मात्र फार मागे जायला नको.
सुरुवात करू, कर्णधार मिताली राज आपला संघ घेऊन या वर्ल्डकपला निघाली तेव्हापासून...
त्या पत्रकार परिषदेत तिला एका पत्रकारानं विचारलं की, तुला कुठला क्रिकेटर आवडतो?
प्रश्न वरकरणी साधाच वाटतो. पण तो साधा-सरळ होता का? त्याच्या पोटात मनात कुठंतरी दडलेली ‘पुरुष क्रिकेट आणि क्रिकेटपटू’ सरस असल्याची भावना होतीच.
मितालीनं या प्रश्नाचा चेंडू मात्र भिरकावला. ती म्हणालीच की, तुम्ही कुठल्या पुरुष खेळाडूला कधी असा प्रश्न विचारता का? त्यांना विचारता का तुमची फेवरिट महिला क्रिकेटपटू कोण?
- अर्थातच उत्तर कुणाकडे नव्हतं. कसं असेल. भारतीय पुरुष संघ वर्ल्डकपसाठी निघतो तेव्हा अझरूद्दीन ते तेंडुलकर ते धोनी - ते कोहली कुठल्या कॅप्टनला असे प्रश्न कुणी विचारले का?
तर नाही. मुलींचं क्रिकेट म्हणजे काय लुटुपुटुचं काहीतरी अशा भावनेचं. हा प्रश्न म्हणजे एक दृश्यरूपच होतं.
पण इथंच हे सारं थांबलं नाही.
मितालीच्या या उत्तरावरून बरीच चर्चा झाली. काहींनी तर समाजमाध्यमांत सरळ लिहिलं की, पुरुष खेळाडू आणि संघाला जी लोकप्रियता, जे ग्लॅमर मिळतं ते आपल्याला मिळत नाही या मत्सरापोटी तिनं हे उत्तर दिलं. लाइमलाइटमध्ये येण्यासाठी ती असं बोलली इथवर ही चर्चा गेली.
हे कमीच होतं म्हणून संघातल्या मुलींचे रंग, त्यांचे स्किन टोन वगैरेवर सुद्धा टीका, कमेण्ट्स, टवाळ्या करण्यापर्यंत लोक गेले. हे सारं समाजमाध्यमांत घडत होतं तेव्हा कदाचित कुणाला वाटलंही नव्हतं की या मुली फायनलपर्यंत धडक मारतील!
बायकांचं क्रिकेट? त्यात काय मजा? त्यात काय जोर? सगळंच नाजूकसाजूक अशी शेलकी विशेषणं लावून महिला क्रिकेटच मोडीत काढायला निघालेला आपला समाज या क्रिकेटपटूंना मोजतही नव्हता.
आणि म्हणून अनेकांना धक्के बसले की या मुली इतकं उत्तम क्रिकेट खेळल्या कशा? एकदम ‘चांगलंच’ कसं खेळायला लागल्या?
त्या एकाएकी चांगलं खेळायला लागलेल्या नाहीत, मिताली राज, झुलन गोस्वामीची टीम गेली काही वर्षे सातत्यानं चांगली खेळते आहे.
उदाहरणं द्यायचं तर याचवर्षी पूनम राऊत आणि दीप्ती शर्मानं आयर्लण्डच्या विरोधात ३०० रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली होती. हरमनप्रीतच्या नावावर डबल सेंच्युरी केल्याचं रेर्कार्ड आहे. वन डे सामन्यात डबल सेंच्युरी मारणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू. २०१३ मध्ये तिनं १५० चेंडूत २२४ रन्स केले होते. एवढंच कशाला यंदाच वर्ल्डकप क्वालिफायर राउण्डमध्ये एकता बिश्तने पाकिस्तानच्या विरोधात फक्त ८ रन्स देऊन ५ विकेट काढत सामना जिंकवून दिला.
यंदा या मुली फायनलपर्यंत पोहचल्या म्हणून खूप कौतुक झालं. सारा देश टीव्हीला डोळे लावून बसला. देशभक्तीचा ज्वर चढला हेच या मुलींचं यश. अर्थात अशी कामगिरी भारतीय महिला संघानं २००५ मध्येही केली होती. त्याही वर्षी भारतीय संघानं आॅस्ट्रेलियाला झुंजवलं होतं.
ही सारी आकडेवारी काय सांगते?
- ही सांगते या मुलींचं सातत्य. त्यांची मेहनत. त्यांचं क्रिकेटचं पॅशन. त्यांची जिद्द.
आपल्या देशात मुलानं क्रिकेटर होणं सोपं. त्यात ग्लॅमर आहे, अमाप पैसा आहे, लोकप्रियता आहे. पालक मुलांच्या क्रिकेटर होण्याच्या स्वप्नासाठी जिवाचं पाणी करतात.
मुलीनं क्रिकेटर व्हायचं म्हटल्यावर पालक त्याच जिद्दीनं उभे राहत असतील? काही पालक राहतही असतील, पण या टीममधल्या प्रत्येकीची कहाणी वेगळी आहे. प्रत्येकीनं आपली लढाई मैदानाबाहेरही लढली आहे.
समाजात, घरात, लोकांच्या पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीशी लढत या मुली इथवर पोहचल्या आहेत..
आता तर प्रवास सुरू होतोय..
स्टार स्पोर्टनं अंतिम सामन्यापूर्वी प्रसारित केलेलं गाणं या नव्या प्रवासाची गोष्टच सांगतात. मुलींच्या क्षमतांवर आकाशातसुद्धा मर्यादांच्या सीमारेषा आखणाºया मनोवृत्तींनाच या मुलींनी चोख उत्तर दिलं आहे..
अर्थात त्यानं महिला क्रिकेट पुरुष क्रिकेट इतकं लोकप्रिय होईल आपल्या देशात असं नाही. साºया जिंकण्या-हरण्यापलीकडचं आहे हे उत्तर..

कितनी भी तू खिंच लकीरें
मुझको आगे बढते जाना रे
कितना भी तू बांध ले बंदे
मुझको तो उड जाना रे
आसमॉँ मे खिंच लकीरे
लाइन पार मुझे जाना रे..

विमेन्स आयपीएल?

येत्या काळात विमेन्स क्रिकेट आपल्या घरात टीव्हीवर नियमित दिसू शकेल. कारण आयसीसी. सर्व देशांनी महिला सामने नियमित भरवणं आयसीसीनं सक्तीचं केलं आहे. या विश्वचषकातील सर्व सामन्यांचं थेट प्रक्षेपण आयसीसीनं पहिल्यांदाच सक्तीचं केलं होतं. १३९ देशांत पहिल्यांदाच हे सामने थेट दिसले. भारतात तर लवकरच विमेन्स इंडियन प्रीमिअर लीग सुरू करण्याचं बीसीसीआयचं घाटतं आहे. येत्या काळात महिला क्रिकेटलाही ग्लॅमर आलं तर त्यासाठी हे घटकही पोषक-पूरक ठरतील कारण महिला क्रिकेटची मोठी बाजारपेठ आशियाई देशात आहेच..

Web Title: indian womens cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.