अकेले है, तो क्या गम है!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 02:51 PM2017-12-14T14:51:25+5:302017-12-14T14:51:31+5:30

एकटेपणा म्हणजे काहीतरी भीतिदायक ही गोष्ट मनातून काढून टाकली पाहिजे. एकट्यानं आपण अनेक गोष्टी करतो,

If alone, then what is the gum! | अकेले है, तो क्या गम है!

अकेले है, तो क्या गम है!

Next

-  प्राची पाठक

एकटेपणा म्हणजे
काहीतरी भीतिदायक
ही गोष्ट मनातून काढून टाकली पाहिजे.
एकट्यानं आपण अनेक गोष्टी करतो,
आनंदानं त्यांचा आस्वाद घेतो,
मग एकटेपणाला एवढं का बिचकतो?
एकटं असणं वेगळं,
एकटं वाटणं वेगळं!
तुम्ही एकटे आहात
की तुम्हाला एकटं वाटतंय?
विचारा स्वत:ला...
‘शेवटी एकटंच पडणार..’
‘एकट्याचा निभाव कठीणच..’
‘कोणीतरी जोडीदार हवाच..’
‘बाईचा जन्म आणि त्यात एकटेपण हे तर फारच वाईट..’
‘आज नाही कळणार, पण वेळ आली की कळेल एकटेपणाचा शाप..’
वेळीच भानावर या, नाहीतर एकटे खितपत पडाल..’
ही वाक्यं लोक परस्परांवर क्षेपणास्त्र सोडल्यासारखी सोडतात. एकटेपण शाप की वरदान अशाच बायनरी कोडमध्ये एकटेपण बघितलं जातं. त्यातही एकटेपण एक शापच, असंच बिंबवले जातं.
पूर्वी आपण ‘टीव्ही शाप की वरदान’ असा निबंध लिहित असू. आता ‘इंटरनेट, मोबाइल शाप की वरदान’ असं सुरू झालंय. सगळे एकटे पडलेले लोक त्यांचं मन रमवायला मोबाइल आणि इंटरनेटच्या आहारी जातीलच असं बºयाच दुकट्या, तिकट्या आणि गटागटाने राहणाºयांना वाटत असतं. पण ते खरं आहे की नाही हे शोधायला तर त्यांनाही एकट्या, दुकट्यानं सोशल साइट्सवर जावं लागेल की नाही? हे दुकटेसुद्धा कुठे अ‍ॅक्टिव्ह दिसले की अजून कोणी म्हणतात, ‘कोणी खरोखर एकटं असतं ते एकवेळ बरं. पण असं भरल्या घरात एकटेपण नको यायला.’
‘घरात संवाद नाही, सोशल साइटवर बघा किती बोलतोय.’ खरं तर जी माणसं एरवीही बोलकी असतात, समविचारी लोकांमध्ये, आवडीच्या संगतीत अधिक खुलतात, तीच घरी -दारी सर्वत्र व्यक्त होत राहतात. कधी लिहून, कधी बोलून. जी माणसं एरवीही फारशी व्यक्त होत नाहीत, ती केवळ एक सोशल मीडिया हाताशी आला, म्हणून लगोलग बोलत, लिहित सुटतील असं होत नाही. कोणी कालांतरानं बदलत असतीलसुद्धा. पण एकलकोंडेपणावर मात करण्यासाठी कोणी एकदम अबोल, अव्यक्त ते भसाभस बोलके होत नसते.
एकटेपणाचा शाप फार वाईट, हे सतत हातोडीसारखे डोक्यात मारून मारून कोंबल्यानं आपण मुळातच एकटेपणाचा धसका घेतो. ‘लिव्ह मी अलोन’ म्हणणारी कोणीही व्यक्ती खचून गेलीये, तिचा ब्रेकअप तरी झालाय, काहीतरी दु:ख पचवते आहे, असेच सगळे आपण ताडत बसतो. एकटेपण इतकंही वाईट नसतं आणि शाप वगैरे तर अजिबात नसतं हे आपल्यासमोर विशेष येत नाही.
खरं तर, तुम्ही जुळे, तिळे नसाल तर जन्माला एकटेच येतात आणि शेवटही अनेकदा एकट्यानेच होतो. अगदीच एकत्र अपघाती मृत्यू नसेल तर. वाचन आपण एकट्यानं करतो, गाणी एकट्यानं ऐकतो, चवींचा आस्वाद एकट्यानं घेऊ शकतो, नृत्य एकट्यानं करू शकतो. अशा अनेक आनंदाच्या गोष्टी आपण एकटे असलो तरी आपल्या आपण करू शकतो. तिथे आपल्याला चॉईसदेखील असतो. याच सगळ्या गोष्टी सोबत हवी म्हणून इतरांसोबत करता येतात. एकत्र वाचन करता येईल, गाणी, नृत्य करता येईल, एक पदार्थ चार जणांमध्ये वाटून खाता येईल; पण अनुभूती तर इतरांसोबत असूनही एकट्याचीच असते. एखाद्या आवडत्या पुस्तकावर चार जणांमध्ये चर्चा करता येईल, पण चिंतन, मनन करणं ही बौद्धिक मजा एकट्यालाच विकसित करावी लागेल.
म्हणूनच, एकटेपणा म्हणजे काहीतरी भीतिदायक ही गोष्ट मनातून काढून टाकली पाहिजे. आपल्या हातात इतकी संपर्कसाधने असतात. अगदीच एकटे वाटले तर क्षणात कोणाशी तरी बोलता येण्याची सोय सहज उपलब्ध असते. कोणीच नसतं बोलायला, असंही कोणाला वाटू शकतं. पण एखादं झाड लावतो, जगावतो, तसा घरी, मित्रांमध्ये एखाददोन जणांशी तरी संवाद फुलवता आला पाहिजे. मला लागलीच तर सोबत असेलच, पण मी माझ्या मनातली खळबळ, मनातली आंदोलने यांना माझ्या स्तरावर शांत करू शकतो का, उत्तरं शोधू शकतो का, ते शोधायला एकांत हवा. मन रमवायला, मनाला ट्रेन करायला काय काय करता येईल, हे सगळं जाणून घ्यायची उत्तम संधी म्हणून एकटेपण बघता येतं.
आपलं एकटेपण हाच आपला मित्र होऊ शकतो. तो शत्रू कशाला मानायचा? स्वत:ला विकसित करण्यासाठी एकट्यानं एखाद्या गोष्टीच्या खोलात जाणं फार आवश्यक आहे.
ते केलं तर एकटेपण म्हणजे भयंकर काहीतरी असं वाटणार नाही!

एकटं असणं वेगळं, दिसणं वेगळं!

एकटं असणं आणि एकटं वाटणं यात पण फरक असतो. एकटं असण्यावर चटकन मात करता येते. एकटं वाटत असेल तर त्याला अनेकांगी विचार करून मार्ग शोधावे लागतात. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, व्यक्तिमत्त्वानुसार वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार त्यात येणार. असं एकटं वाटणारे आपण एकटेच नसतो, हे मात्र त्यावेळी समजून घ्यावं लागतं. पण ‘सगळेच कधी ना कधी एकटे असतात’, या डायलॉगचा आपल्या त्या विशिष्ट एकटं वाटण्याच्या परिस्थितीशी सामना करताना उपयोग होतोच असं नाही.

‘सगळ्यांना भूक ही लागतेच’, असं तत्त्वज्ञान कडाडून भूक लागलेली असताना काय कामाचे? तिथं अन्नच मिळाले/मिळवले पाहिजे. ते अन्न एकट्यानंच खावं लागतं. तसंच, आपल्या एकटं वाटण्यावर देखील आपल्यालाच आपल्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार उत्तरं शोधावी लागतील. कोणी अन्न भरवलं अगदी, तरी पोटात ढकलायचे काम आपल्यालाच करावे लागते.

तसंच, एकटेपण इतके काही वाईट, शाप वगैरे नाही आणि एकटं वाटण्यावर आपणच उत्तरे शोधू शकतो, हे स्वत:ला पक्के बजावायचे. गाडीला जसा दिवा असतो आणि गाडी जशी चालवत पुढे जातो, तसतसा रस्ता दिसू लागतो, तसंच खरं तर हे पण असते. एकटं वाटण्यावरचे उपाय असेच आपले आपल्याला जास्त चांगले शोधता येऊ शकतात. स्वत:वर विश्वास मात्र हवा. स्वत: ला स्वत:ची छान सोबत असेल तर एकटं असणं आणि एकटं वाटणं इतकं अंगावर येत नाही.

Web Title: If alone, then what is the gum!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.