तरुण मुलांची लग्न का रखडली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 06:00 AM2018-10-04T06:00:00+5:302018-10-04T06:00:00+5:30
तिशी उलटून गेली तरी बोहल्यावर चढू न शकलेल्या तरुण मुलांच्या अस्वस्थ जगात.
नम्रता फडणीस
कॉलेजमधील सहा जणांच्या ग्रुपमधल्या आणखी एका मित्रा च्या लग्नाचा बार
परवा धूमधडाक्यात उडाला. तो उडणारच होता म्हणा, कारण अनेक वर्षापासून
ते दोघं प्रेमाच्या बंधनात अडकले होते. त्यामुळे कधीतरी बार उडणार हे
गृहीतच होतं..
पण एकजण ग्रुपमध्ये पटकन म्हणाला, कशी काय यांची प्रेम जुळतात आणि इथं आम्हाला प्रेम तर सोडा पण दहा ठिकाणी नाव नोंदवूनही मुलगीदेखील मिळत नाही.
त्याची चिडचिड सुरू होती. अलीकडे त्याचा स्वभाव खूपचं तिरसट झाला होता..कुणालाही फटकन बोलायचा. रागाने आदळआपट करायचा. पाच वर्षापासून तो लग्नासाठी मुली शोधत होता. रितसर कुटुंबाच्या सल्ल्यावरून त्याचं नावही नोंदविण्यात आलं होतं. अत्यंत नावाजलेल्या वधू-वर सूचक मंडळात भरभक्कम पैसे भरून नाव नोंदवलं. ऑनलाइन संकेतस्थळावरही नोंदणी झाली. या काळात बर्याच मुली पाहिल्या; पण मुलींच्या अपेक्षांपुढे काही टिकाव लागला नाही असं तो सांगतो. तो नैराश्येच्या गर्तेत नकळतपणे ओढला गेला होता.
हे आजच्या घडीला काही त्याचं एकटय़ाचं उदाहरण नाही. विवाहोच्छुक अनेक तरुण मुलांची लगA जमत नसल्याची आणि मध्यमवर्गात हे प्रमाण वाढल्याची चर्चा गेले अनेक दिवस आहे. वयाची तिशी ओलांडली तरी त्यांची लग्न काहीकेल्या जमतचं नाहीयेत.
त्यांच्यामध्ये काही कमी आहे का? ही मुलं शिकलेली नाहीत का? तर ते आहेच, पण लग्नासाठी मुली मिळत नाहीत. पसंती होता होत नाही कारण ‘वेल सेटल्ड’ या दोन शब्दांत अपेक्षा ठासून भरू लागल्या आहेत आणि त्याचमुळे तरुण मुलांची लग्न ठरत नाहीत असं अनेक वधू-वर सूचक मंडळांचं चित्र आहे.
सहज ढोबळ अभ्यास म्हणून अनेक वधू-वर सूचक मंडळांत जाऊन विचारलं की, काय आहे मुलींच्या अपेक्षा? ज्या वाढल्या आहेत, अतीच आहेत असे शेरे आताशा सर्रास मारले जाऊ लागले आहेत? तर त्या अपेक्षा साधारण अशा दिसतात.
* तरुण उच्चशिक्षितच हवा.
पुण्या-मुंबईत त्याचा स्वतर्चा/स्वतर्च्या मालकीचा फ्लॅट हवा.
*तो आर्थिक स्थैर्य देणारा हवा.
* शक्यतो एकुलता एक, कसलीही जबाबदारी नसणारा हवा.
या तरुणींच्या अवाजवी अपेक्षाच.
त्यातून आज अनेक मध्यमवर्गीय तरुणांची ‘लग्नगाठ’ जुळणंच अवघड होऊन बसलं आहे. ‘कुणी मुलगी देता का मुलगी? अशी तरुणांची गत झाली आहे.
खरं तर आपला भावी जोडीदार कसा असावा हे लग्नाच्या बोहल्यावर चढणार्या तरुण-तरुणींनी आधीपासूनच मनात पक्कं केलेलं असतं. परंतु जशी स्वप्न पाहिलेली असतात तसं घडतंच असं नाही. पूर्वीच्या काळी कुटुंबामध्ये मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना भावी वराच्या बाबतीत तडजोड करण्याशिवाय गत्यंतर नसायचं. इंजिनिअर मुलाला इंजिनिअर, डॉक्टरला डॉक्टरच मुलगी हवी असा एक ट्रेण्ड निर्माण झाल्यामुळे तरुणींची लग्न जुळणंच अवघड होऊन बसलं होतं. मग मुलगा कसा का असेना? तो आपणहून उंबरठय़ार्पयत आलाय ना? मग बाई ‘हो’ म्हण त्याला, उगाचच नखरे करू नकोस, असे म्हणून पालक तरुणींची लग्नासाठी मनधरणी करायचे. कित्येक तरुणींची लग्न अशाच तडजोडीमधून झालेली आहेत.
पण कालपरत्वे कुटुंबांना मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटू लागलं आणि शिक्षणाच्या स्वातंत्र्यामुळे तरुणीदेखील आज तरुणांच्या खांद्याला खांदा लावून कमवू लागल्या. त्या स्वतर् तरुणांपेक्षा जास्त कमवू लागल्यामुळं त्यांच्या भावी जोडीदाराबद्दल अपेक्षा वाढणं हे काहीसं स्वाभाविकदेखील आहे. दुसरीकडे फारसं शिक्षण न घेतलेल्या तरुणींच्या देखील त्यांच्या जोडीदाराविषयीच्या संकल्पना आता अधिक क्लिअर झाल्या आहेत. संसारामध्ये आर्थिक स्थैर्याला त्या अधिक प्राधान्य देऊ लागल्या आहेत.
मुलींचा हा अप्रोच पटतोही, पण त्यातून काही नवीन प्रश्नही निर्माण होताना दिसत आहेत.
तरुण मुलं म्हणतात, सगळ्याच मुलींना शहरात नोकरी करणारा मुलगा हवा. शेतीवाला नको. त्यातही वेल सेटल्ड. नोकरीला लागताच कुठून घेणार प्लॅट? मुली स्वतर् बीए किंवा बीकॉम आहेत, पण मुलगा इंजिनिअरच हवा अशी त्यांची अपेक्षा आहे.
एक लग्नाळू रोहन सांगतो, ‘आज मी एका कंपनीत नोकरी करतो. लग्न झाल्यावर नक्कीच चांगलं सुखकर आयुष्य बायकोला देऊ शकतो; पण मुलींना आरामदायी जीवन हवं असल्याने त्या तडजोड करू इच्छित नाहीत. वयाच्या तिसाव्या वर्षी मुलीच्या वडिलांचा तरी पुण्यात फ्लॅट होता का? याचा साधा विचारही त्या करीत नाहीत. मूळ सोलापूरचा पण नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झालेला हा रोहन अत्यंत पोटतिडकीनं आपली मतं मोकळेपणानं मांडत होता.
विवाहाच्या बाजारातील वास्तव सुरजनं सांगितल्यावर तर धक्काच बसला. मुली नावनोंदणी करताना आई-वडिलांची जबाबदारी नको असं स्वच्छ लिहितात असं तो सांगतो. आणि म्हणतो आता पुरुष बदलू लागलेत, ते मुलींच्या आई-वडिलांची जबाबदारी स्वीकारायला तयार होऊ लागलेत, तर मुलीच सांगतात, तुझे आई-बाबा सोबत राहायला नको. अशावेळी काय लग्नाचा निर्णय करणार?
असे अनेक प्रश्न आहेत.
तात्पर्य मात्र एकच, त्यातून मुलांची लग्न जमेनाशी झाली आहेत आणि तिशी उलटली तरी बोहल्याचं दर्शन होणं मुश्किल झालं आहे.