अपयशाचा सिक्सर ठोकल्यावर..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 02:50 PM2018-03-22T14:50:16+5:302018-03-22T14:50:16+5:30

सहा अटेम्प्ट दिले. निकाल तोच. अपयश. पण म्हणून स्पर्धा परीक्षेच्या चक्रांत मी हरलो नाही. वेळीच समांतर ट्रॅक चाललो.. आज संशोधनासाठी पोलंडला आलोय. मला वाटतं, कुठवर जायचं आणि कुठं थांबायचं हे तरी आपण ठरवायलाच हवं..

After destroying the coin of failure | अपयशाचा सिक्सर ठोकल्यावर..

अपयशाचा सिक्सर ठोकल्यावर..

Next

- अंकुर गाडगीळ

पोलंड- मी काही कोणी मार्गदर्शक नाही; पण सहावेळा स्पर्धा परीक्षेचे अटेम्प्ट केले आणि अयशस्वी झालो, त्याचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. एका टप्प्यात मी स्पर्धा परीक्षांच्या ट्रॅकसोबत एक दुसरा ट्रॅक सुरू केला आणि त्यातून आज पोलंडला संशोधनासाठी पोहोचलोय. त्यामुळे मी फक्त स्पर्धा परीक्षा आणि करिअर याचा माझा म्हणून एक दृष्टिकोन मांडतो आहे.
स्पर्धा परीक्षा. अनेक अर्थांनी परिपूर्ण असे हे दोन शब्द आहेत असं माझं वैयक्तिक मत. हे शब्द वाचून सर्वसाधारणपणे आपल्या समोर चित्र उभं राहतं ते म्हणजे जीवघेणी स्पर्धा, प्रचंड अभ्यास, खूप खर्च आणि या सगळ्याातून निभावलो की आरामाचं आणि सुखाचं जीवन. सेटल होण्याचा झटपट मार्ग. मीसुद्धा अगदी याच साच्यात विचार करत होतो. पण, अपयशाचे षटकार पूर्ण करताना जाणवलं की, ही स्पर्धा इतरांशी नाही तर स्वत:ला अधिक समृद्ध करण्यासाठी असावी. या वाक्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे स्वत:ला समृद्ध करायचं, तर स्वयंपाकही शिक, तेही जमलं पाहिजे हा माझ्या आईचा आणि आजीचा आग्रह. त्यांच्याकडून मी ते शिकलो आणि आता याच कलेचा मला पोलंडमध्ये नवनवीन माणसं जोडण्यात उपयोग होतोय. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की स्वत:शी स्पर्धा करायला लावते ती स्पर्धा अशी मी स्वत:शीच या परीक्षेची व्याख्या करतो.
या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली ती घरूनच. घरातील पोषक वातावरणामुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे स्पर्धा परीक्षेचा विचार सुरू झाला. स्वा. सावरकरांची पुस्तकं वाचून मनाची तयारी झाली होती. वाचनाचा छंद होता. याच काळात ‘वारस होऊ अभिमन्यूचे’ हे अनुराधा गोरे लिखित पुस्तक वाचलं आणि सुरू झाला कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस अर्थात सीडीएसचा प्रवास. कालांतरानं ‘वाटणं आणि प्रत्यक्षात असणं’ यातला फरक जाणवू लागला.
पहिला आणि दुसरा प्रयत्न
पहिला प्रयत्न मी पदवी शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केला, तर दुसरा प्रयत्न हा पुढच्या सहामाहीत. हे प्रयत्न पदवी आधी देण्याचं कारण एवढंच होतं की स्पर्धा परीक्षा कशी असते, आपली कुवत किती आहे, आपला यात निभाव लागेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती. आणि सराव करायचाच आहे तर सरळ परीक्षा देऊनच सराव करूया या उद्देशाने हे प्रयत्न केले. दोन्ही वेळा लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालो; पण मुलाखतीत अपयशी. सीडीएस म्हणजे संरक्षण क्षेत्रात प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा. बौद्धिक, शारीरिक, मानसशास्त्रीय गुणवत्तेची चाचणी. अपयशयातून पुन्हा उभारी घेण्यासाठी याच काळात लोकमान्य टिळकांचं एक पुस्तक वाचलं. ज्यामधे मांडलेले विचार मला खूपच भावले. अभ्यासासोबतच त्यांनी शारीरिक, मानसिक वृद्धी आणि छंद यावर कसा भर दिला हे नमूद केले होते. मग अभ्यासाव्यतिरिक्त मी डॉ. श्रीदत्त राऊत सोबत किल्ले भ्रमंती, संवर्धन, मोडी लिपी शिकलो. पुढे त्याच्यासोबतच महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना भेटण्याचा योग आला. या इतिहासाच्या गोडीमुळेच आता पोलंडमधल्या शाळेत भारताचा इतिहास या विषयावर व्याख्यान देण्याची संधी मिळाली. या दोन अपयशानंतर खरं तर मी पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेची तयारी करायची याच भूमिकेत होतो. पण घरच्यांनी सुचवलं की पदव्युत्तर शिक्षण सुरू ठेव आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कर. पास झालास तर उत्तमच नाहीतर वर्ष तरी फुकट जाणार नाही. पुढे जाऊन हाच सल्ला खूप कामी आला.
तिसरा, चौथा आणि पाचवा प्रयत्न
हे प्रयत्न मी शिक्षण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना दिले. या प्रयत्नांतसुद्धा सर्व लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो; पण मुलाखतीमधे अपयशी. आमचे पदव्युत्तर शिक्षणाचे प्रमुख डॉ. घोले यांच्याशी पहिल्याच आठवड्यात संभाषणात समजले की त्यांनीसुद्धा नौदलात जाण्यासाठी प्रयत्न केले होते; पण त्यात निवड नाही झाली. तरी निराश न होता वैज्ञानिक क्षेत्रात त्यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. जाणवलं की सोबत पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय योग्यच होता. या पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन वर्षांत तीनवेळा आलेल्या अपयशामुळे मी सतत भरकटत होतो, पण यात मदत झाली ती माझ्या मित्राची हिमांशू आणि माझे संशोधनाचे मार्गदर्शक डॉ. गोखले, यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांनी वेळ पडताच कान पकडून पुन्हा मार्गावर आणलं. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असल्यामुळे चालू घडामोडी आणि वृत्तपत्र वाचन याची प्रचंड आवड निर्माण झाली होती. हीच आवड आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. वृत्तपत्र वाचनाच्या सवयीमुळे एक बातमी वाचनात आली जी माझ्या विषयाशी निगडित होती. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याकारणाने एक आत्मविश्वास निर्माण झाला होता. याचाच फायदा झाला. त्या बातमीमधील संचालकांना (कंपनी डायरेक्टर ) ई-मेल लिहिला. दोन-चार वेळा भेट होऊन औपचारिक मुलाखतीशिवाय त्यांनी थेट नोकरीची संधीच दिली; पण सांगण्याचा मुद्दा असा की एखाद्या गोष्टीकडे उत्स्फूर्तपणे मार्गक्रमण करणं. नव्या वाट शोधणं (अर्थात हा गुण आत्मसात करायला ट्रेकिंगची आवड जोपासल्याचा खूप उपयोग झाला), त्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, सतत प्रयत्न करण्याची जिद्द या अनुभवाचाही फायदाच झाला.
सहावा प्रयत्न
पाच वेळा अपयशी झाल्यामुळे थोडेफार नैराश्य आलेच होते; पण सुदैव हे होते की सोबतच नोकरी असल्याकारणाने ते इतके जाणवले नाही. याच काळात मग मायकल फेल्प (आॅलिम्पिकपटू) आणि बझ आल्ड्रिन (अंतराळवीर) त्यांचे नैराश्य, त्यातून केलेला आत्महत्येचा प्रयत्न वाचनात आले. सोबत एक उत्तम मार्गदर्शक मला लाभला तो म्हणजे कर्नल गोपीनाथ. किती लिहावं या माणसाबद्दल तेवढं थोडच आहे. आपल्या सैन्यदलाचा एक प्रतिनिधी म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहतो. राखेतून पुन्हा उभं राहण्याचा बाणा प्रत्येक सैनिकात असतो हे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवतं. त्यांनीच इथवर धीर दिला होता. सहावा प्रयत्नही त्यांच्याकडे बघूनच दिला; पण निकाल मात्र तोच राहिला. अपयश.
कुटुंब, मित्रपरिवार, शिक्षक, मार्गदर्शक आणि अर्थातच लोकमत आॅक्सिजन यांची या प्रवासात मला मोलाची साथ लाभली हे मी माझं भाग्यच समजतो. पण त्याच सोबत स्पर्धा परीक्षांच्या काळात आपण स्वत: स्वत:ला किती साथ देतो हे प्रचंड महत्त्वाचं. डॉ. कलाम मला सर्वात प्रिय, त्यामुळे डॉ. कलाम सुद्धा कसे वायूसेनेत निवड होण्यात अपयशी झाले होते आणि कसे पुढे अफाट प्रयत्न करून राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचले हे स्वत:ला समजावलं.
मग वेळीच संशोधनाकडे वळलो. आता पोलंडमध्ये पुढचं संशोधन करतो आहे. स्पर्धा परीक्षेत मला अपयश आलं, सहा वेळा आलं; पण म्हणून मी अपयशी नाही, त्या तयारीनं मला बरंच काही दिलं, कुठवर जायचं आणि कुठं थांबायचं हे मात्र आपल्यालाच ठरवावं लागतं..


(gadgil.ankur@gmail.com)

 

Web Title: After destroying the coin of failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.