दोन टँकरची धडक, आठ तास वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 05:10 AM2018-06-16T05:10:03+5:302018-06-16T05:10:03+5:30

सायन-पनवेल महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी या मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला होता.

 Two tankers accident, eight hours traffic cones | दोन टँकरची धडक, आठ तास वाहतूककोंडी

दोन टँकरची धडक, आठ तास वाहतूककोंडी

googlenewsNext

पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी या मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला होता. अगदी याच घटनेची पुनरावृत्ती शुक्र वारी पहाटे ५.३० च्या दरम्यान घडली. डिझेल व डांबराची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरमध्ये धडक बसल्याने खारघर टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणारा मार्ग ठप्प झाला होता. या अपघातांमुळे टँकरमधील डांबर रस्त्यावर सांडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.
विशेष म्हणजे, या मार्गाच्या मधोमध अपघातग्रस्त टँकर बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. खारघर स्पेगेटी बस स्थानकापासून हिरानंदानी उड्डाणपुलापर्यंत सुमारे तीन कि. मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर डांबर सांडल्याने दुचाकींचाही या वेळी अपघात झाला. याच मार्गावर हिरानंदानी उड्डाणपुलावर कारने टेम्पोला धडक दिल्याने नजीकच्या अंतरावर अपघाताची दुसरी घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी कारचे नुकसान झाले. महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. २०१६ ते २०१८पर्यंत अद्याप ९५ जणांना या मार्गावर अपघातांमुळे आपले जीव गमवावे लागल्याची माहिती, माहिती अधिकारात दीपक सिंग या आरटीआय कार्यकर्त्याने उघड केली. विशेष म्हणजे, या मार्गावर पथदिवे नसल्याने अनेक अपघात रात्री व पहाटेच्या सुमारास घडत असतात. वाहनचालकांना समोरील वाहने अंधारामुळे दिसत नसल्यानेच अशाप्रकारे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातामुळे वाहतूककोंडी सुरळीत होण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागला. खारघर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे हे पहाटेपासून घटनास्थळी उपस्थित होते.

सिग्नल यंत्रणा बंद
सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाºया ठेकेदाराने अद्याप सिग्नल बसविले नाहीत. सानपाडा, नेरूळ, सीबीडी, खारघर येथे सिग्नल नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. खारघरमध्ये सकाळी व सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी होत असून वाहतूक पोलिसांना जादा मनुष्यबळ उपलब्ध करावे लागत आहे. सिग्नल नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

महामार्ग अंधारात
महामार्गावरील बहुतांश विद्युत दिवे बंद आहेत. अंधार असल्यामुळे वाहनचालकांना समोरील वाहनांचा व रोडवरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अंधारामुळे पहाटेच्या वेळी अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. खारघरमध्ये झालेला अपघातही अपुºया प्रकाशामुळे झाल्याचे बोलले जात आहे.

अर्धवट राहिलेली कामे
महामार्गावर तुर्भे येथील उड्डाणपुलाचे काम अर्धवट राहिलेले आहे. नेरूळ ते उरण फाटा दरम्यानच्या पादचारी भुयारी मार्गांचे काम महापालिकेने केले आहे; परंतु सीबीडीच्या पुढील भुयारी मार्गांचे काम रखडले असून नागरिकांना धोकादायकपणे रोड ओलांडावा लागत आहे.

पावसाळ्यात अपघात वाढणार
पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात महामार्गावर दोन गंभीर अपघात झाले आहेत. महामार्गावरील रखडलेली कामे. सिग्नल यंत्रणेचा अभाव व अंधारामुळे पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Two tankers accident, eight hours traffic cones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.