सायन-पनवेल मार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:06 AM2018-06-18T03:06:09+5:302018-06-18T03:06:09+5:30

१२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

Sion-Panvel route becomes the trap of death | सायन-पनवेल मार्ग बनला मृत्यूचा सापळा

सायन-पनवेल मार्ग बनला मृत्यूचा सापळा

Next

- वैभव गायकर 
पनवेल : १२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावरील अर्धवट कामे, बंद पथदिवे तसेच अस्तित्वात नसलेल्या लेनच्या पट्ट्या आदीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील दीड वर्षात या मार्गावर तब्बल २५० अपघात झाले असून, यात जवळपास १०३ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेला हा महामार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
१८ किलोमीटरच्या सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करताना दोन्ही बाजूंना पाचपदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. देशातील सर्वात व्यस्त महामार्गापैकी सायन-पनवेल महामार्ग हा एक आहे. या मार्गावरून दररोज पाच लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याचा ढोबळ अंदाज वर्तविला जातो. या मार्गावर सानपाडा, नेरु ळ, उरणफाटा, कामोठे व खारघर अशा पाच उड्डाणपुलाचा समावेश आहे. मागील वर्षी पहिल्या पावसातच या सर्व उड्डाणपुलांवर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले होते. वाहनधारकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. आता पहिल्याच पावसात मार्गावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांत या मार्गावर अधिक अपघात घडतात. आरटीआय कार्यकर्ता दीपक सिंग यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून २०१६-१७ या वर्षात या मार्गावर तब्बल २४२ लहान-मोठे अपघात झाले आहेत. तर चालू वर्षात म्हणजेच मागील सहा महिन्यांत जवळपास ५० अपघात घडले असून, यात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पनवेल, कळंबोली, खारघर, बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले आहेत. यापैकी सर्वाधिक अपघात वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. उड्डाणपूल व रस्त्याच्या दुभाजनाबाबत अनेक ठिकाणी कोणत्याच सूचना अथवा उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यामुळे उड्डाणपुलाला धडकणाऱ्या वाहन अपघातांचे प्रमाण अधिक आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल टोलवेज प्रा. लि. या कंपनीला टोलवसुलीसाठी ठेका दिलेला होता. या कंपनीचा ठेका रद्द करून सध्याच्या घडीला सार्वजनिक बांधकाम खातेच या मार्गावरून टोल वसूल करीत आहेत. याकरिता इगल इन्फ्रा ही खासगी कंपनी टोल वसूल करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे. दररोज लाखो रु पयांची टोल वसूल करूनदेखील या मार्गावरील समस्या वाढतच चाललेल्या आहेत. अनेक ठिकाणी उडाणपुलाखालील भुयारी मार्ग बंद असून, त्यामध्ये पाणी शिरले आहे. मार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसल्याने एक लेन पूर्णपणे पाण्यात जाते. खारघर टोलनाक्यावर पावसाळ्यात अशाप्रकारे पाणी नेहमीच साचलेले पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, अपघातांच्या संख्येत वाढ होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत योग्य पावले उचलताना दिसून येत नाही.
दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी एक कन्सल्टन्सी नेमलेली आहे. त्यावरून कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते मंजुरीसाठी पुढे पाठविले जाईल, तसेच बंद असलेले पथदिवे सुरू करण्यासाठी विद्युत विभागाशी पत्रव्यवहार केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न छापण्याची अटीवर दिली.
>या मार्गावरील अर्धवट कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला २०पेक्षा जास्त पत्रे लिहिली आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. दररोज अपघातांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नजीकच्या काळात याबाबत सुधारणा झाली नाही, तर उच्च न्यायालयात जनिहत याचिका दाखल करणार.
- दीपक सिंग,
माहिती अधिकार कार्यकर्ता
>मागील सहा महिन्यांत दहा जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर अपघातांची संख्या ५०च्या वर गेलेली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
>२०१६-१७ मधील अपघातांचा आढावा
अपघात मृत
पनवेल ३९ १४
कळंबोली १८ ०९
खारघर ५० २५
बेलापूर १८ ०७
नेरु ळ ३४ १४
सानपाडा ०७ ११
वाशी ७६ १३

Web Title: Sion-Panvel route becomes the trap of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.