पाण्यावरून पनवेलचे राजकारण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:26 AM2018-12-14T00:26:56+5:302018-12-14T00:27:20+5:30

महासभेत उमटणार पडसाद; विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Panvel's politics will be fueled by water | पाण्यावरून पनवेलचे राजकारण तापणार

पाण्यावरून पनवेलचे राजकारण तापणार

googlenewsNext

- वैभव गायकर 

पनवेल : महापालिकेने गुरुवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावरून पनवेलमधील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधकांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी भाजपाची कोंडी करण्याची तयारी चालविली आहे.

मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनीदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. त्या वेळी भाजपाने या निर्णयाला विरोध करत हा निर्णय मागे घेण्यास पालिका प्रशासनाला भाग पाडले होते. त्यानंतर शहरात प्रचंड पाणीसमस्या उद्भवली होती. यावर्षी सत्ताधारी भाजपाने अद्याप या निर्णयाला विरोध केला नसल्याने सर्वपक्षीय भाजपाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत.

पनवेल शहराला ३० एमएलडी पाण्याची गरज दररोज भासत असते. मात्र, प्रत्यक्षात २० एमएलडी पाण्यावर पनवेलकरांना आपली तहान भागवावी लागते. पालिका दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेत असेल, तर नागरिकांमध्येही या बाबत प्रचंड नाराजी आहे.
विशेष म्हणजे, पनवेल परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र, आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणाची साठवणूक क्षमता गाळामुळे अपुरी असल्याने पाण्याचा अपव्ययच होत असल्याने पनवेलकरांना पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. पालिका हद्दीतील २९ गावांमध्ये देखील पाण्याची समस्या गंभीर आहे.

शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पाणीपुरवठ्याबाबत पालिकेला ठोस उपाययोजना राबवावी लागणार आहे. विशेष म्हणजे, आगामी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पाणीपुरवठ्याचा विषय चांगलाच गाजणार आहे. भाजपाने महापालिकेच्या स्थापनेपूर्वी दिलेल्या २४ तास पाणीपुरवठ्याचा मुद्दा विरोधक वारंवार उपस्थित करत आहेत. पालिकेच्या महासभेतही हा विषय चांगलाच गाजणार आहे.

पनवेल शहराला मुबलक पाणीपुरवठा कसा करता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी व एमजेपीकडे तशा प्रकारची बोलणीदेखील सुरू आहेत. अमृत योजनेअंतर्गत २० एमएलडी पाण्याची तरतूद आहे. ज्या तरतुदीची अंमलबजावणी करता येणार आहे का? याची चाचपणीही सुरू आहे.
- विक्रांत पाटील, उपमहापौर

पालिकेमार्फत उद्भवलेल्या या समस्येला सत्ताधारी जबाबदार आहेत. या संदर्भात ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. महासभेत या संदर्भात मुद्दा उपस्थित करणार आहोत.
- सतीश पाटील, नगरसेवक, रायगड जिल्हाध्यक्ष

दिवासाआड पाणीपुरवठा हा काय तोडगा असू शकत नाही. पाणीचोरी, टँकर लॉबी यांच्याविरोधात पालिकेने सर्वप्रथम कठोर कारवाई करावी. प्रत्येक वेळेला नागरिकांना वेठीस धरले जात असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून या निर्णयाचा विरोध करू, पालिकेने हे निर्णय त्वरित मागे घ्यावेत.
- रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख, पनवेल

दिवसाआड पाणीपुरवठा भाजपाचे अपयश आहे. हा निर्णय घेण्याऐवजी पालिकेने पाण्याचे इतर स्रोत जिवंत करावेत. पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने विहीर, तलाव आहेत. त्या पाण्याला कशाप्रकारे वापरात आणता येईल, या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
- हरेश केणी, नगरसेवक, शेकाप

Web Title: Panvel's politics will be fueled by water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.