पनवेलकरांना आजपासून दिवसाआड पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:09 AM2018-12-13T00:09:20+5:302018-12-13T00:09:39+5:30

संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना, शहरवासीयांकडून विरोध होण्याची शक्यता

Panvelkar water from day to day | पनवेलकरांना आजपासून दिवसाआड पाणी

पनवेलकरांना आजपासून दिवसाआड पाणी

Next

पनवेल : शहरवासीयांना गुरुवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यादृष्टीने महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. परंतु महापालिकेच्या या निर्णयाला शहरवासीयांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी व देहरंग धरण मिळून एकत्रितपणे महापालिकेच्या माध्यमातून शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एमआयडीसीचा प्रत्येक रविवार व सोमवार शटडाउन घेतला जातो. त्यामुळे पाणी कमी मिळते. त्यामुळे महापालिकेने देहरंग धरणातून पाणी घेवून त्याचा पुरवठा सुरू केला आहे. परंतु सध्या देहरंग धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.

धरणाची पातळी खालावल्याने १५ जून २0१९ पर्यंत पाणीपुरवठा करण्याचे आवाहन प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १३ डिसेंबरपासून शहरवासीयांना दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

त्यानुसार उद्यापासून शहरात उंच जलकुंभनिहाय दोन झोनमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागू नये, यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांना या काळात पाणी साठवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

जलकुंभनिहाय पाणीपुरवठ्याचा तपशील
झोन १ : लोकमान्य नगर, रेल्वे मालधक्का झोपडपट्टी, शिवाजीनगर झोपडपट्टी, विसावा हॉटेललगत झोपडपट्टी, पंचायत समितीलगत झोपडपट्टी, सुभेदार वाडा, संपूर्ण लाइन आळी, सावरकर चौक, परदेशी आळी, पटेल पार्क, अशोका गार्डन परिसर, श्री लॉज ते नीलेश गार्डनपर्यंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, रोज बाजार परिसर, शिवाजी रोड, केतकी हॉटेल ते आदर्श हॉटेल ते विरु पाक्ष मंदिर ते जयभारत नाका परिसर, विरु पाक्ष मंदिर ते धूतपापेश्वर कारखाना परिसर, जयभारत नाका ते मिरची गल्ली परिसर, जयभारत नाका ते मांडवकर वाडा, जयभारत नाका ते गोखले हॉल ते प्रज्ञा सोसायटी परिसर, रोटरी सर्कल ते सरस्वती विद्यामंदिर ते बालाजी मंदिर ते पंचमुखी मारु ती मंदिर, आदित्य श्रीराम सोसायटी, जैन मंदिर, भुसार मोहल्ला परिसर, कोहिनुर टेक्निकल ते रोटरी सर्कल इत्यादी. संपूर्ण पटेल मोहल्ला, कोळीवाडा वाणी आळी, धोबी आळी, पांजरपोळ, मिरची गल्ली, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा, भारत नगर झोपडपट्टी, कच्छी मोहल्ला, बंदररोड, बावन बंगला(काही भाग), मार्केट यार्ड ते पाटील यांच्या घरापर्यंत, रजदा सोसायटी, हिबा अपार्टमेंट, ताज सोडा फॅक्टरी परिसर, कोळीवाडा-उरण रोड ते जरीमरी देवी मंदिरपर्यंत, एमएसईबी कार्यालय ते बागवान मोहल्ला, उरण रोड सर्कल ते मंचामुखी सोसायटी (भारत गॅस) इत्यादी.

झोन-२ : आझादनगर झोपडपट्टी, नवनाथ नगर झोपडपट्टी, तक्का गाव, तक्का संपूर्ण कॉलनी, संपूर्ण मिडलक्लास सोसायटी, टेलिफोन आॅफिस मागील सोसायट्या, न्यू पंजाब हॉटेल ते विश्राळी नाका, विश्राळी तलावलगत झोपडपट्टी व परिसर, जानेवकर वाडा परिसर, अशोक बाग झोपडपट्टी, वाल्मीकीनगर, पायोनियर परिसर, हरिओम नगर परिसर, एचओसी कॉलनी, गजानन सोसायटी, एचओसी कॉलनी ते प्रांत आॅफिसपर्यंत, ठाणा रोड टाकी ते उर्दू शाळेपर्यंत, बुशरा पार्क, संपूर्ण साईनगर, भाजी मार्केट उंच जलकुंभ ते रु पाली टॉकीज, शनी मंदिर ते रोहिदासवाडा, शनी मंदिर ते पंचरत्न हॉटेल ते विश्राळी नाका, पंचरत्न हॉटेल ते डॉ. हळदीपूरकर हॉस्पिटल, शनी मंदिर ते मिरची गल्ली (एक बाजू), हरे माधव सोसायटी परिसर, आदेश सॉ मिल ते वसंत आलाप सोसायटी परिसर. गुरु शरणम सोसायटी व परिसर, रॉयल रेसिडेन्सी, तिरु पती सोसायटी परिसर.

दिवसाआड पाणी धोरणाला शिवसेनेचा विरोध
पनवेल महानगरपालिकाअंतर्गत पनवेल शहर विभागात पालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. महापालिकेने बुधवारी हा निर्णय जाहीर करताच शिवसेनेचे संघटक अ‍ॅड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महापालिकेवर धडक दिली.

पनवेलमधील पाण्याची समस्या ही अत्यंत गंभीर आणि जटील स्वरूपाची आहे. दरदिवसाला २७ ते २८ एमएलडी इतके पाणी पनवेल शहराला लागते. पाण्याची ही गरज मागील अनेक वर्षांपासून येथील सत्ताधारी व प्रशासनाला माहीत आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी दरवर्षी पाणीकपात किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. देहरंग धरणाचा गाळ काढून त्याची क्षमता वाढवावी, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वापरात नसलेली दोन धरणे पालिकेने हस्तांतरित करून घ्यावीत, जीवन प्राधिकरण व सिडको, एमआयडीसी यांच्याकडून आवश्यक तेवढा पुरवठा वाढवून घेणे आदी उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल शिवसेनेने केला आहे. मोठा गाजावाजा करून पनवेलमधील रस्ते खोदून सुरू केलेली अमृत योजना नक्की कुठे अडली? असा सवाल सोमण यांनी उपस्थित केला आहे. हा निर्णय टँकर माफियांच्या पथ्यावर पडणारा आहे. त्यामुळे आवश्यक उपाययोजना करून हा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा सोमण यांनी दिला आहे. या वेळी अच्युत मनोरे, भरत कल्याणकर, आनंद घरत, किसन राउंढळ, प्रसाद सोनवणे, मंदार काणे, भास्कर पाटील उपस्थित होते.

Web Title: Panvelkar water from day to day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.